महाराष्ट्रातील २५ किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेल, लग्नस्थळामध्ये रुपांतर करण्यात येणार.
महाराष्ट्रातील गडकोट म्हणजे मराठा दौलतीची शान. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. इथेच अनेक शूरवीर मावळ्यांनी आपलं स्वराज्यासाठी रक्त सांडल. अतिशय दुर्गम असलेल्या या किल्ल्यांच्या जीवावरच दिल्लीच्या सुलतानी संकटाला लढा देण्याचं बळ महाराष्ट्राला मिळालं. प्रत्येक मराठी मनाचा अभिमान म्हणजे हे गडकिल्ले.
इंग्रजांनी भारतीयांना स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू नये यासाठी यातले अनेक किल्ले उध्वस्त केले. मध्यंतरीच्या काळात दुर्लक्ष झाल्यामुळे देखील बऱ्याच किल्ल्यांची पडझड झाली. गेल्या काही वर्षात ट्रेकिंगच्या निमित्ताने वगैरे लोकांची पावले या किल्ल्यांकडे वळली. काही किल्ल्यावर स्मारके देखील उभारली आहेत, शाळा कॉलेजच्या सहली आपला इतिहास समजावून घ्यायला येथे येतात. काही वेळा हौशी पर्यटक, तर काही वेळा मौजमजा करायला येणारे पर्यटक देखील येऊन या किल्ल्यांवर आपला उद्दामपणाची ठसे सोडून जातात.
महाराजांच्या मावळ्यांनी प्राणप्रणाला लावून जपलेल्या किल्ल्यांची स्थिती आजची स्थिती अतिशय भयावह अशी बनली आहे. इतक्या वर्षात प्रशासनाला या किल्ल्यांची देखभाल कशी करायची याचा आराखडा अजूनही बनवता आलेला नाही.
सध्या जगभर हेरिटेज हॉटेल, हेरिटेज वेडिंग डेस्टीनेशन यांची टूम निघालेली आहे. युरोपात जुन्या गढ्या यादृष्टीने विकसित केल्या. त्यांची लोकप्रियता पाहता भारतातही राजस्थानमधील अनेक संस्थानिकांनी आपले राजवाडे हॉटेलमध्ये बदलून टाकले. जगभरातील अतिश्रीमंत लोक ऐतिहासिक काळातील राजेशाही थाट अनुभवण्यासाठी, त्याच ऐटीत आपलं लग्न करण्यासाठी प्रचंड पैसे मोजून या हेरिटेज हॉटेल मध्ये येतात.
याच धर्तीवर राज्यातल्या गडकिल्ल्यांना हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर केल्यास बराच महसूल गोळा करता येईल असा अभ्यास रिपोर्ट महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सादर केला. ३ सप्टेंबरला झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या योजनेला हिरवा कंदील दाखवण्यात आला.
यासंदर्भातील बातमी आज इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रात छापून आली आहे. त्यांच्याशी बोलताना राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वैद-सिंघल यांनी सांगितलं की,
“नवीन धोरणाला मंत्रीमंडळाने पाठींबा दिल्यावर ही योजना प्रत्यक्षात राबवण्यासाठी आपला प्लॅन तयार आहे.”
महाराष्ट्रात जवळपास ३५३ गडकिल्ले आहेत, यापैकी १०० किल्ले पुरातत्वखात्याने ऐतिहासिक मोन्यूमेंट म्हणून घोषित केले आहेत, हे १०० किल्ले वगळता बाकीच्या किल्ल्यांना हेरिटेज हॉटेल म्हणून करण्यासाठी ६० ते नव्वद वर्षांसाठी खासगी गुंतवणूकदारांना भाडे तत्वावर चालवण्यास देण्यात येणार आहे. हेरिटेज हॉटेल, वेडिंग डेस्टिनेशन, वेगवेगळे एंटरटेनमेंट इव्हेंट्स यानिमित्ताने किल्ल्यावरच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे असे मत MTDC ने व्यक्त केले. याचाच पहिला टप्पा म्हणून २५ किल्ल्यांची यादी सुद्धा बनवण्यात आली आहे.
या गडकिल्ल्याच्या सौंदर्याला व ऐतिहासिक वारसाला धक्का बसू नये म्हणून कोणतेही पक्के बांधकाम करण्यास परवानगी देण्यात येणार नाही असेही सरकारी सूत्रांनी सांगितलं.
मात्र तरीही गौरवशाली इतिहासाच्या खुणा असलेल्या या किल्ल्यांना एवढ्या मोठ्या काळासाठी लीजवर हॉटेल म्हणून चालवण्यासाठी परवानगी देण्याच्या निर्णयावर विरोधकांबरोबर इतिहासतज्ञांनीदेखील विरोध दर्शवला आहे.
हे ही वाच भिडू.
- महाराष्ट्रात आहे ३८२ एकरावर पसरलेला प्रचंड मोठा किल्ला !
- कोण होता फिरोजशहा कोटला ज्याच नाव बदलून स्टेडियमला अरुण जेटलींच नाव देण्यात आलंय?
- मराठा सैन्याने शपथ घेतली, आत्ता किल्ला घेतल्याशिवाय अन्नग्रहन करणार नाही..
- स्वराज्याचा दूसरा सिंह नावाजी बलकवडे ज्यांनी सिंहगड पुन्हा स्वराज्यात आणला.
निषेध या निर्णयाचा