‘अ केस ऑफ जस्टीस’ मधून सीमाभागाची मूळं मराठी मातीशी किती घट्ट होती हे समजतं
आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात एक पेन ड्राइव्ह सादर केलं. पेन ड्राइव्ह सादर करताना ‘अलीकडे विरोधी पक्षात असलेल्यांना पेन ड्राइव्ह मिळण्याचा पायंडाच पडलाय.’ असा मिश्किल टोला त्यांनी लावला.
परंतु या पेन ड्राइव्हमध्ये कोणत्याही मंत्र्याचे घोटाळे किंवा सरकारवर आरोप करणारे पुरावे नाहीत. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर बनवण्यात आलेली एक डॉक्युमेंट्री आहे.
‘अ केस फॉर जस्टीस’
आज उद्धव ठाकरे यांनी सभागृहात सादर केलेली डॉक्युमेंट्री फक्त आजच नाही, तर यापूर्वी देखील चर्चेत आली होती. जानेवारी २०२१ मध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुंबई कर्नाटकला देण्यात यावी असं वादग्रस्त विधान केलं होतं.
तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकातील मराठी भागावर बनवण्यात आलेली ५० वर्ष जुनी डॉक्युमेंट्री ‘अ केस फॉर जस्टीस’ महाराष्ट्र डीजीपीआर च्या यु ट्यूब चॅनेलवर प्रकाशित केलं होतं.
सीमाभागाच्या मराठीपणावर बनवण्यात आलेल्या डॉक्युमेंट्रीची निर्मिती स्वतः महाराष्ट्र सरकारने केली आहे.
सीमाभागातील गावांमध्ये मराठीची सध्याची स्थिती आहे आणि इतिहासात या भागात मराठी भाषा किती प्रमाणात प्रचालनात होती, हे दाखवण्यासाठी १९७१ मध्ये महाराष्ट्र सरकारने या डॉक्युमेंट्रीची निर्मिती केली होती.
या डॉक्युमेंट्रीमध्ये सीमा भागातील आणि बेळगाव शहरातील लोकजीवन, व्यापारी आणि अन्य व्यवहार, रोजची भाषा, वृत्तपत्रांचा वापर, शाळा, देवळे, मठ, पोथ्या, मराठी गाणी, भजन/कीर्तने, नगरपालिकेचे दस्तऐवज, व्यापारी चोपड्या, खतावणी, शीलालेख असे अनेक संदर्भ देण्यात आलेले आहेत.
यात कारवारच्या शाळेतील एक शिक्षक इंग्रजी, मराठी आणि कोकणी शिकवत असल्याचं दृश्य दाखवण्यात आलं आहे. तर दुसऱ्या दृश्यात एनसीसी बटालियनचेफलक मराठीत लिहिल्याचं दाखवण्यात आलंय. स्थानिक मराठी वृत्तपत्र ‘विचारी’, कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा १९१२ सालचा मराठीतील अहवाल आणि १८९० मध्ये बांधलेल्या बेळगावातील पुलावर लिहिलेला मराठी भाषेतील फलक देखील या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मार्गदर्शनात या डॉक्युमेंट्रीची निर्मिती करण्यात आली होती.
मुख्यमंत्र्यांसोबत शिवाजीराव गीरधर पाटील आणि शरद पवार यांनी देखील या डॉक्युमेंट्रीसाठी मार्गदर्शन केलं होतं. मुख्यमंत्र्यांचे तत्कालीन जनसंपर्क अधिकारी मधुमंगेश कर्णिक यांची डॉक्युमेंट्रीची संकल्पना, संहिता लिहिली होती. तर चित्रपटतज्ज्ञ कुमारसेन समर्थ यांनी याचं दिग्दर्शन केलं होतं.या डॉक्युमेंट्रीसाठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक विश्राम बेडेकर, निवृत्त मुख्य सचिव एम.डी. भट आणि ना.ग. नांदे यांचा सल्ला
निर्मितीसाठी तत्कालीन मराठी कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी त्यावेळच्या बेळगावच्या नगराध्यक्षा श्रीमती इंदिराबाई खाडे, शिवाजीराव काकतकर, बळवंतराव सायनाथ, बाबुराव ठाकूर, नीलकंठराव सरदेसाई तसेच सर्वश्री मनसे मुचंडी, जुवेकर आणि याळगी यांनी निर्मितीसाठी सहकार्य केले. तत्कालीन आमदार बापुसाहेब एकंबेकर यांनीही त्यावेळी मदत केली.तर ज्ञानेश्वर नाडकर्णी आणि निवेदन बर्कली हिल यांनी इंग्रजी संहितेचं लेखन केलं होतं.
सीमाभागाचं अस्सल मराठीपण दाखवणारी ही डॉक्युमेंट्री महाराष्ट्र डीजीपीआर च्या यु ट्यूब चॅनल वर उपलब्ध आहे.
हे ही वाच भिडू
- सगळ्या राड्याचं मूळ असलेल्या ‘महाजन आयोगात’ नक्की काय आहे ?
- असा आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संपूर्ण इतिहास…
- महाराष्ट्राचा १४०० वर्ष जुना उल्लेख असलेलं कर्नाटकातलं मंदिर