हात मोडका आचारी आणि दात नसलेला राजा एकत्र आले, तेव्हा बनला अस्सल भारतीय कबाब…
या लॉकडाउनच्या काळात सगळ्यात जास्त ऑर्डर केला गेलेला पदार्थ म्हणजे कबाब. म्हणजे घरी बसून जास्त कामं नसतात आणि रिकामा वेळ कारणी लावण्यासाठी म्हणा किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणा आपले काही लोकं घरीच बंगल्याच्या टेरेसवर कबाबची भट्टी लावतात आणि आपल्या आवडत्या पेयासोबत कबाबची मजा घेतात.
म्हणजे कबाबला खायला काहीतरी स्पेशल पाहिजे, एखादा सणवार पाहिजे अशा भानगडी बंद झाल्या आणि लोकं रोजचं ऑर्डर करून खाऊ लागले. म्हणजे मांसाहारी लोकांमध्ये कबाब खाण्याचं प्रमाण जास्त असलं तरी शाकाहारी [ विगन ] कबाबसुद्धा तितक्याच आवडीने लोकं खाताना दिसतात. हा झाला सर्वे पण या कबाबचा शोध नक्की कसा लागला, कोणी पहिल्यांदा बनवला, कधी बनवला याचा किस्सा जर ऐकला तर तुमची तब्येत खुश होणार.
थोडक्यात कबाब म्हणजे विस्तवावर किंवा आगीवर भाजलेलं मांस. चिकन/ मटण यांचा एकदम बारीक किस/ भुगा केला जातो, त्यात मीठ मसाले व्यवस्थित प्रमाणात घालून एका लोखंडी सळईवर ते भाजले जातात. यात वेगवेगळे आकारही असतात छोट्या तुकड्यांमध्ये कट केलेले कबाब , चपटा आकार, खिमा अशा अनेक प्रकारात कबाब बाजारात मिळतात.
खरंतर अगदी प्राचीन काळाशी कबाबचा संबंध आहे. प्राचीन काळात लोकं जनावरांचं मास आगीवर भाजून खात असत त्याचंच हे मॉडर्न व्हर्जन. म्हणजे संदर्भ द्यायचा झालाच तर महाभारतात सुद्धा याचा उल्लेख आहे. ११ व्या शतकात कल्याणी चालुक्य राजा सोमेश्वर तृतीय याने लिहिलेल्या संस्कृत ग्रंथ मानसोलसामध्ये आगीवर भाजल्या गेलेल्या मांसाच्या तुकड्यांबद्दल लिहिलेलं आहे.
आपल्याला इतकंच माहिती आहे कि भारतात कबाब तुर्कीस्तान किंवा दुसऱ्या देशातून आला पण भिडू हा शोध भारतात लागला आहे. कबाब या शब्दाचा अरबी अर्थच भाजलेलं मांस असा होतो.
कबाब हा पदार्थ उपमहाद्विपांमधे सैन्यांमार्फत मध्य आशियातुन आला. आचाऱ्यानी आपल्या मालकाला खुश करण्यासाठी त्याचे आवडीचे मसाले वापरून तो बनवू लागला. मुघल काळात कबाब जास्तच प्रिय होते. हळूहळू भारतीय आचाऱ्यानी या कबाबचा चेहरामोहरा बदलून टाकला.
१७७५-१७९७ या काळात आसफ-उद-दौला एवढं प्रांताचा नवाब वजीर होता. खादाड राजा म्हणून त्याची ओळख होती, या नादात या वजिराने चरबी वाढवून घेतली होती. तब्येत जशी जशी खालावू लागली तसे तसे त्याचे दात पडू लागले आणि शेवटी सगळेच दात पडले.
पण आचाऱ्यापुढे मोठं संकेत होतं कि राजाला मांस तर प्रिय आहे पण दात पडल्यामुळे त्याला कसं खायला द्यायचं. आचाऱ्याने आयडिया केली कि खिमा अजून बारीक केला इतका बारीक कि सगळे मसाले त्यात व्यवस्थित एकजीव होईल इतकाका बारीक. मग त्यात अदरक, लसूण आणि इतर मसाले घालून गोल किंवा त्याचा रोल करून ते भाजले. चवीला कुरकुरीत आणि खमंग कबाब खाऊन राजा खुश झाला.
पण पुढच्या काळात हाजी मुराद अली यांनी खऱ्या अर्थाने हे कबाब प्रकरण लोकप्रिय केलं. टुंडे कबाबचे जनक म्हणून ते ओळखले जातात.
मागील ११५ वर्षांपासून हाजी मुराद यांचं कबाबचं दुकान चालू आहे. त्यांचे सध्याचे वारसदार आणि दुकान मालक मुहम्मद उस्मान यांनी सांगितलेला हा किस्सा सुद्धा मजेदार आहे.
छतावर पतंग उडवीत असताना हाजी मुराद अली हे खाली पडले त्यांचा हात तुटला, व्यवस्थित उपचार न घेतल्यामुळे त्यांच्या एक हात कायमचा निकामी झळा. पण ते आचारी होते आणि जेवण बनवायचं खूळ काय त्यांच्या डोक्यातून जाईना. पुढे एका हातानेच ते कबाब बनवू लागले, ते मांस एकाच हाताने बारीक करायचे , एकाच हाताने कांदे कापायचे आणि कबाब बनवायचे.
ज्यावेळी नवाब वाजिद-अली-शाह याने तुपात तयार केलेलं कबाब ज्यावेळी खाल्ले त्यावेळी त्याने विचारलं कि हे कोणी बनवलंय त्यावेळी एका हाताने स्वयंपाक करणारे हाजी मुराद अली त्याला दाखवण्यात आले.
यात कबाबचे पुढे अनेक प्रकार आले काकोरी कबाब, नर्गिस कबाब, शामी, सिक, टुंडे. अगदी विदेशातही कबाब प्रसिद्ध आहेत. आजही जगभरात कबाबची क्रेझ तुफ्फान आहे. एक हात मोडका असलेल्या आचाऱ्याने जगाला कबाबची ओळख करून दिली आणि दात नसलेल्या राजाच्या खाण्याच्या हट्टातून कबाबचा जन्म झाला.
हे हि वाच भिडू :
- पाकिस्तानच्या सिक्युरीटीला गंडवून कबाब खाणाऱ्या दादाला पत्रकारानं ओळखलं आणि राडा झाला !!
- बर्ड फ्लू सोडा पण चिकुनगुनियाच्या भीतीने लोकांनी चिकन खायचं सोडून दिल होतं
- कोणत्याही धर्माचा माणूस मरो, जेवू घातल्याशिवाय भारतात मुक्ती भेटत नाही असं का?
- शेव सारख्या पदार्थातून वर्षाला ७ हजार कोटी कमावणारा ब्रॅण्ड म्हणजे हल्दिराम