ऊसतोड मजूर व सिक्युरिटी गार्डची नोकरी केलेला तरुण आज सहकार खात्यात उपसंचालक झालाय
एकच जागा आहे मग कशाला भरायची म्हणून स्पर्धा परीक्षा देणारे अनेकजण त्या परीक्षेचा फॉर्म भरतचं नाही. तर परीक्षांमध्ये सततच्या अपयशामुळे अनेकजण अभ्यास करायचे सोडून देतात. त्यालाही कधी काळी असेच वाटले. आपल्याला प्रयत्न करून काहीही हाती लागत नाही. त्यामुळे अभ्यास सोडलेलाच बरा.
कोरोनामुळे लॉकडाऊन लागले, नोकरी गेली त्यामुळे त्याला सांगली जिल्ह्यातील आपल्या मूळगावी जावे लागले. प्रसंगी उसतोड कामगार म्हणून काम सुद्धा करावे लागले ३ महिन्यानंतर लॉकडाऊन हटला आणि तो परत पुण्यात आला.
त्यानंतर त्याने परत अभ्यासाला सुरुवात केली. दरम्यान राष्ट्रीय सहकार निगम सहकार मंत्रालय खात्यात मार्फत उपसंचालकाच्या एका पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून देशभरातून एकच पद भरण्यात येणार होते. यात सांगलीच्या संदीप पवारने नंबर काढला. कमी अधिक नाही तर ५०० पेक्षा अधिक उमेदवार या परीक्षेला बसले होते.
संदीप पवार हा मूळचा सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पुदेवाडी गावचा. घरी आई वडील मोठा भाऊ, वहिनी असा परिवार आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी शेतीचे. दहा एकर शेती असून ती सगळी जिरायती आहे. प्राथमिक शिक्षण गावात झाल्यानंतर ११ वी, १२ वीचे शिक्षण इस्मापूर येथे झाले. यानंतर मोठा भाऊ शेतीकडे वळल्याने आपण काही तरी करायला हवं म्हणून संदीपने पुणे २००८ साली पुणे गाठले.
२०११ मध्ये एमआयटी कॉलेज मधून बी.टेक फूड टेक्नॉलॉजी डिग्री पूर्ण केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो नवी पेठेत राहायला आला आणि एकीकडे नोकरी दुसरीकडे अभ्यास असाच दिनक्रम संदीपचा होता.
२०१८ व २०२० मध्ये सततच्या अपयशामुळे संदीपने स्पर्धा परीक्षांचा पूर्णपणे अभ्यास बंद केला होता. मध्यंतरी अभ्यास करायचा म्हणून खासगी नोकरी सोडली आणि त्यातच लॉकडाऊन लागले. त्यामुळे संदीपला गावाकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. घरची शेती जिरायती असल्याने लॉकडाऊनमुळे गावाकडेही कामाची बोंबाबोंब होती.
यामुळे संदीपने मिळेल ते काम करायचे ठरविले होते. सांगलीतील दालमिया कारखाना येथे ऊस तोड मजूर म्हणून तीन महिने संदीपने मजुरी केली. गावावरून परत आल्यानंतर पुन्हा अभ्यास सुरू केला. परीक्षा जवळ आल्याने अगोदरच संदीपने नोकरी सोडली होती. त्यामुळे संदीपचे खर्चाचे गणित जरा बिघडले होते.
त्यामुळे संदीपने पुण्यातील नवी पेठेत एमटीएमवर सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीला कराय लागला होता. सिक्युरिटी गार्डची नोकरी आणि अभ्यास असे दोन्ही काम संदीपचे सुरु होते.
२०२१ मध्ये राष्ट्रीय सहकार निगम सहकार मंत्रालय खात्यात मार्फत डेप्युटी डायरेक्टर फुड प्रोसेसिंग वर्ग-१ (उपसंचालक,अन्न तंत्रज्ञान) या पदासाठी जाहिरात देण्यात आली होती. या परीक्षेसाठी देशातून ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा केवळ एका जागेसाठी घेण्यात आली होती.
१५० मार्कांचा थेरी पेपर आणि ५० मार्क मुलाखतीसाठी होते. मुलाखतीसाठी ३ जणांना बोलविण्यात आले होते. उत्तरप्रदेश आणि बिहार दोघे होते. तर महाराष्ट्रातून सांगलीच्या संदीपला बोलविण्यात आले होते. या सगळ्यातून संदीपची निवड झाली.
एवढ्या महत्वाचं पद मिळविणाऱ्या संदीपने कुठलेही क्लास जॉईन केले नव्हते. सेल्फ स्टडी करूनच त्याने हे यश मिळविले आहे. जिद्दीच्या जोरावर संदीपची थेट देशात प्रथमच तयार आलेल्या राष्ट्रीय सहकार निगम मंत्रालय खात्यात उपसंचालक पदावर निवड झाली आहे. तयार कधी काळी ऊसतोड मजूर, एटीएमवर सिक्युरिटी गार्ड म्हणून काम केले होते.
एकच जागा आहे कुठं आपला नंबर लागणार म्हणून अनेकजण फॉर्म भरत नाही. मात्र संदीपला वाटले एवढे वर्ष अभ्यास केला आहे परीक्षेत नक्कीच यश मिळेल असे त्याला वाटायचे. त्यामुळे त्याने फॉर्म भरला आणि एकच जागा असणारी नियुक्ती आपल्या पदरात पाडून घेतले.
तसेच संदीपने केंद्र सरकारच्या पाच विविध पदांच्या मुलाखती देखील दिलेले आहेत. यात फूड सेफ्टी ऑफिसर,आयबी, कोकण रेल्वे, आरसीएफ,फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा समावेश आहे.
सोमवारी संदीपचे सहकार विभागात जॉईंग आहे. संदीपचा पुदेवाडी ते दिल्ली हा प्रवास सोपा नव्हता. मात्र, सगळ्या गोष्टींवर मात करत संदीपने जे यश मिळविले त्याला तोड नाही.
हे ही वाच भिडू
- आईला दिलेलं वचन पोरग्यानं पहिल्याच फटक्यात फौजदार होवून पुर्ण केलं.
- सायकल रिपेअर करणाऱ्याच्या मुलाने न्यायाधीश होत नाव काढलं
- त्यांना गावाकडच्या पोरांना “उत्तम अधिकारी” करायचं होतं म्हणून “यशदा” उभारलं…!