माणसाला घेऊन उडणारा ड्रोन तयार करणाऱ्यात बुलढाण्याच्या तरुणाचा मोठा वाटा आहे
आपल्या देशांसाठी आपण काहीतरी भन्नाट करावं अशी प्रत्येकांची अपेक्षा असते. प्रत्येकाला सीमेवर जाऊन लढणं शक्य होतं नाही, पण काही मात्र आपल्या कामाच्या माध्यमातून देश सेवा करतात. आता हेच पहा मानवी वाहतूक करणारा पहिला संपूर्ण भारतीय बनावटीचा वरूणा ड्रोन तयार झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर या ड्रोनचे प्रात्यक्षिक देखील दिले गेले. आणि देशभरात एकच विषय गाजला, हा ड्रोन बनविला कोणी? पण तुम्हाला हे माहिती आहे का? हा ड्रोन पुण्यात तयार झाला आहे. चाकण येथील सागर डिफेन्स इंजिनीअरिंग या कंपनीने हा ड्रोन तयार केला आहे.
सागर डीफेन्सच्या टीममध्ये एक तरुण इंजिनियर आहे सौरभ पाटील.
सौरभ बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर येथील नूतन विद्यालय येथे मराठी माध्यमात शिक्षण घेऊन ,उच्च शिक्षणासाठी पुण्यात आला. विमानवालं कॉलेज म्हणून फेमस असलेल्या एस.एस.पी एम एसच्या आयओआयटीमधून त्याने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग केले. पुढे काही दिवस विविध ठिकाणी नोकरी केली. अनुभव घेतला, पण सौरभला रस होता तो रिसर्चमध्ये, पुढे सागर डिफेन्सच्या कॅप्टन निकुंज परशार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला सुरुवात होती.
सागर डिफेन्स समोर नौदला मार्फत एक आव्हान आलं, ते म्हणजे मानवी वाहतूक करणारं पहिलं भारतीय बनावटीचा ड्रोन बनविण्याचे.
मागील चार वर्षांपासून सागर डिफेन्स आणि टीम दिवसरात्र एक करून हा ड्रोन बनवीत होती. या ड्रोनची सर्वात भारी वैशिष्टे म्हणजे हा ड्रोन १३० किलो वजनासह उड्डाण करू शकतो. २५-३० मिनिटांत तो २५ किलोमीटर अंतर कापू शकतो. या ड्रोनमुळे नौदलाला मोठी मदत होणार आहे.
सैनिकांना एका जागेवरुन दुसरीकडे नेण्यासाठी, नौदलाला वेगवेगळी ऑपरेशन करण्यासाठी लागणारे साहित्य एका जागेवरून दुसऱ्याजागी घेऊनजाण्यासाठी हा ड्रोन अतिशय उपयुक्त आहे. नौदलाच्या लढाया पाण्यात चालतात,अशा वेळी हेलिकॉफ्टरद्वारे सामान पाठविले जाते, पण हेलिकॉफ्टर लँड करणे अवघड होते. अशा वेळेस ड्रोन अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
या ड्रोनचे रिमोटद्वारे किंवा संगणकाद्वारे देखील नियंत्रण केले जाऊ शकते.
हवेत जर तांत्रिक बिघाड झाला तर ड्रोन सुरक्षित लॅंडींग करता येणार आहे. या ड्रोनमध्ये पॅराशूट असणार आहे. जे आपत्कालीन किंवा खबरदारी दरम्यान आपोआप उघडेल. त्यामुळे ड्रोन सुरक्षित खाली उतरेल. या बरोबरच या वरूणा ड्रोनचा वापर एअर ॲम्ब्यूलन्ससाठी देखील केला जाऊ शकतो.
५७ कर्मचाऱ्यांरी सागर डिफेन्स इंजिनीअरिंग मध्ये काम करतात. या आधी कोविड काळात तेलंगामध्ये दुर्गम भागात लस पोहचवण्यासाठी ड्रोन वापरले गेले होते. ड्रोनचा मुख्य उद्देश तर निगरानी, टेहळीकरणे, फोटो काढणे असा होतो. पण या ड्रोनचा वापर नौदला सोबतच सर्वसामान्य नागरिकांना देखील होणार आहे. दुर्गम भागात, अजून देखील वैद्यकीय मदत पोहचलेली नाही, अशा ठिकाणी देखील हा ड्रोन अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
जमिनीवरील लँड करतानाच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत, आता लवकरच समुद्रात यांच्या चाचण्या घेण्यात येणार आहे.
समुद्रामध्ये बोटीवर ड्रोनद्वारे सामान आणि मानवी वाहतूक करून यांच्या चाचण्या घेतल्या जातील. या ड्रोनची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे युद्ध बोट चालत असताना हा ड्रोन तेथे थांबवता येणे शक्य होणार आहे. मानवी जीवाला अतिशय कमी धोका यातून आहे.
वरुण राजा म्हणजेच पाऊस यावरून या ड्रोनला वरूणा हे नाव दिले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या समोर देखील या ड्रोनचे प्रात्यक्षिक देण्यात आले. संपूर्णपणे नैदलासाठी बनविलेलेला ड्रोन जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर प्रात्यक्षिके सादर करत होता, तेव्हा सागर डिफेन्समधील प्रत्येकाचा उर अभिमानाने भरून आला होता. हा मानवी वाहतूक करणारा ड्रोन फक्त नौदलालाच नव्हे तर समस्त मानवजातीस उपयुक्त आहे.
याबाबत बोल भिडू बोलतांना सौरभ म्हणाला की,
बुलढाणा जिल्हातील मलकापुर सारख्या छोट्याश्या गावातून येऊन, मराठी माध्यमांतून शिकून आज आपण देशाला काहीतरी उपयुक्त देत आहोत, त्यामध्ये आपला छोटासा तरी वाटा आहे, या गोष्टीचा मला प्रचंड आनंद वाटत आहे.
१०० % संपूर्ण भारतीय बनावटीचा ड्रोनचे प्रात्यक्षिक जेव्हा पंतप्रधानांनी स्वता पाहिले आणि त्यांना ते आवडले तेव्हा आमच्या सर्वांच्या डोळ्यात आनंद अश्रु होते. आता वरूणा ड्रोनवर आणखी काम सुरू आहे. एकावेळी दोन व्यक्तीची वाहतूक करता येईल असा ड्रोन आम्ही बनवत आहोत. आता बनविलेल्या ड्रोनचे पुढील तीन महीने समुद्रातील चाचण्या सुरू राहतील.
सौरभ पुढे म्हणतो, माझे आई-वडील दोघे देखील शिक्षक आहेत, एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन, आज आपण देशांच्या आणि विशेषता नौदलासाठी काही तरी करू शकतो, या गोष्टीचे मला स्वताला आणि आई- वडिलांना प्रचंड समाधान आहे. आपण स्वता सीमेवर जाऊन लढू शकत नाही. पण ड्रोनच्या माध्यमातून आपण नक्कीच मदत करू शकू ही गोष्ट आनंददायी असल्याचे सौरभ ने सांगितले.
हे ही वाच भिडू
- बजेटमध्ये ज्या किसान ड्रोनचा उल्लेख केला आहे ते महाराष्ट्रासाठी नवीन नाही भिडू
- गाड्या नाय पोहोचत म्हणून लोड नाही, महाराष्ट्रानं ड्रोननं लशी धाडल्यात
- जम्मूमध्ये झालेला पहिलाच ड्रोन हल्ला भारताच्या सुरक्षायंत्रणेसाठी धोक्याची घंटा ठरू शकतोय