गेल्यावर्षी पायी वारी नव्हती म्हणून राडा करणारे तुषार भोसले यंदा मात्र वारीकडे फिरकले नाहीत
विधानपरिषद निवडणूक, त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी पुकारलेला बंड यामुळे यंदा पायी वारीकडे माध्यमांचे लक्ष गेलेच नाही. कोरोनामुळे दोन वर्ष पंढरपूरच्या पायी वारीत खंड पडला होता. यंदा मात्र कोरोना रुग्णाची संख्या नियंत्रणात असल्याने पायी वारीला परवानगी देण्यात आली.
आषाढी पायी वारीसाठी २० जून पासून आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू संत तुकाराम महाराज यांची पालखी निघाला आहे. राज्यभरातील लाखो वारकरी यात सहभागी झाले आहे. कोरोनामुळे सलग दोन वर्ष पंढरपूची पायी वारी रद्द झाली होती.
यंदा पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेता येणार असल्याने वारकरी खुश आहेत.
मात्र कोरोनामुळे सलग दोन वर्ष आषाढीची पायी वारी रद्द करण्यात आली होती. याला वारकरी संप्रदायातील काही संघटनांनी विरोध केला होता. त्याही पेक्षा भाजपची अध्यात्मक आघाडी सरकार विरोधात रस्त्यावर उतरली होती.
त्यावेळी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले म्हणाले होते,
आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. मी स्वत: यंदा पायी पंढरपूरला जाणार आहे. वारकरी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ भाजपशी आहे, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे.
वारकरी संप्रदायाची मर्यादित संख्येत निर्बंधासह पायी वारीची मागणी धुडकावून वारीची परंपरा खंडीत करणारे महाविकास आघाडी सरकार हे महाराष्ट्र द्रोही सरकार असल्याची टिका आचार्य भोसले यांनी केली होती.
गेल्यावर्षी कोरोनामुळे वारी रद्द करण्यात आल्याने सरकार वर टिका करणारे आचार्य तुषार भोसले यंदा कुठल्या वारीत सहभागी आहेत असे प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येत आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या टिकेबद्दल जाणून घेण्यासाठी बोल भिडूच्या वतीने आर्चाय तुषार भोसले यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
ते म्हणाले की,
मी कधीच पायी वारीत सहभागी होत नाही. जे परंपरेने वारी करतात, ज्यांच्या मागच्या ४- ५ पिढ्या पायी वारी करत आहे. हेच वारकरी दरवर्षी पायी वारी करतात. वारकरी संप्रदायात अनेक प्रसिद्ध कीर्तनकार, व्याख्याते, संत साहित्याचे अभ्यासक आहेत. यातील सगळेच पायी वारीत सहभागी होत नाहीत.
बहुतांश कीर्तनकार, व्याख्याते दशमी ते पौर्णिमा या काळात पंढरपूरला आषाढीच्या सोहळ्याला जमत असल्याचे भोसले यांनी सांगितले.
वारकरी संप्रदायाचे काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार यांचा मी शिष्य आहे. पूर्वी पासूनच कीर्तन आणि प्रवचन करत आलो आहे. त्यांच्या परंपरेची कीर्तने माझ्याकडे असतात. पैठणच्या यात्रेत पारनेरकर फडावर सुद्धा माझे कीर्तने असते.
मी वर्षानुवर्षे दशमीला पंढरपुराला जातो. वाखरी तळावर पालख्या आल्या की त्यांचे दर्शन घेतो. आणि नंतर पंढरपूर मधील विष्णू सहस्त्रनाम मातृ पितृ सेवा मंदिर येथे दशमी ते पौर्णिमा दरम्यान तिथे कीर्तन होतात. पौर्णिमे नंतर काला होतो आणि मग आम्ही परत येतो.
मी दशमी ते पौर्णिमा पंढरपूरला असतो आणि तिथे कीर्तन, प्रवचने होतात. पायी वारी पंढरपूरकडे जात असतांना महत्वाच्या ठिकाणी पालखीचे दर्शन घ्यायला जात असल्याचे आचार्य तुषार भोसले यांनी सांगितले. पंढरपूरला दशमीला येतो आणि पौर्णिमे पर्यंत असल्याचेही आचार्य तुषार भोसले यांनी सांगितले.
२२ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू संत तुकाराम महाराज पालखी पुण्यात आली होती. त्यावेळी आचार्य भोसले यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सोबत पालखीचे स्वागत करून दर्शन घेतल्याचे सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने तत्कालीन राज्य सरकारने पायी वारीला परवानगी दिली नव्हती. सरकाराच्या विरोधात बंड पुकारणारे आचार्य तुषार भोसले पायी वारीत कधीच सामील होत नसल्याचे समोर आले आहे.
हे ही वाच भिडू
- आचार्य तुषार भोसले कोण आहेत? त्यांना आचार्य ही पदवी कोणी दिली ?
- शीख समुदायात नामदेव महाराजांना खूप मानतात, राष्ट्रपतींचा हा प्रसंगच पुरेसा बोलका आहे
- नित्यनेमाने आषाढी वारी आणि मतांसाठी मुस्लिम तुष्टीकरण, दिग्गीराजा कोणाला समजतच नाहीत