या मराठी माणसामुळे तुम्ही रविवारची सुट्टी एन्जॉय करताय.
रविवारची साप्ताहिक सुटी सर्वप्रथम मंजूर झाली ती १० जून १८९० रोजी. याच दिवसापासून भारतात कामगारांना हक्काची साप्ताहिक सुटी मिळाली. ही सुटी मिळवून देण्यात सर्वात महत्वाचा वाटा होता तो नारायण मेघाजी लोखंडे यांचा.
कोण होते नारायण मेघोजी लोखंडे ?
कामगारांना करावी लागणारी अपार मेहनत, त्याबदल्यात कायद्याचे कुठलेही संरक्षण नसणे आणि कामाच्या ठिकाणी असणारे अनारोग्यदायी वातावरण यामुळे कामगारांचे हाल-हाल होत असतं. हे बघून नारायण लोखंडे अतिशय व्यथित झाले आणि त्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मांडवी मिलमध्ये स्टोअरकीपरची नोकरी करण्याचा निर्णय घेतला.
याचदरम्यान त्यांनी कामगारांच्या समस्यांना हात घालायला सुरुवात केली, त्याचवेळी ते महात्मा फुलेंच्या संपर्कात आले. १ डिसेंबर १८७३ रोजी लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुलेंचे व्याख्यान आणि मुंबईत सत्यशोधक समाजाची स्थापना करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
फुलेंच्या सहवासाने प्रभावित झालेल्या लोखंडेंनी आपलं उर्वरित आयुष्य सामाजिक सुधारणांसाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी १८७३-७४ च्या दरम्यान आलेल्या ‘फॅक्टरी अॅक्ट’मुळे त्यांच्या जीवनात अभूतपूर्व बदल घडून आला.
तत्कालीन शासकीय कागदपत्रानुसार २८०० स्त्रिया व २५०० बालकामगार गिरण्यांमधील शोषणाचे बळी होते. त्यांचे संरक्षण करावे, असा आग्रह मँचेस्टर येथील गिरणी मालकांनी धरला. त्यांच्याविरोधात २ फेब्रुवारी १८७५ रोजी भारतातील पहिली गिरणी मालकांची संघटना असणाऱ्या “बॉम्बे मिल ओवनर्स असोशिएशन”ची स्थापना करण्यात आली.
गिरणी कामगारांचा लढा अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी लोखंडे यांनी पुण्यातील बंद पडलेले ‘दीनबंधू’ हे वृत्तपत्र नव्याने मुंबईतून सुरु केले. या पत्रातून त्यांनी मोफत व सार्वत्रिक शिक्षणाची, शेतकरी व शुद्रातीशुद्र, गरीब व होतकरू मुलांसाठी फ्रीशिप देण्याची तसेच ५ % जागा राखीव ठेवण्याची मागणी लोखंडे यांनी केली.
“बॉम्बे मिल हँड्स असोशिएशन” संघटनेची स्थापना.
२४ एप्रिल १८९० रोजी लोखंडे यांनी मुंबई येथील महालक्ष्मीच्या रेसकोर्स मैदानावर १० हजार गिरणी कामगारांची सभा बोलावली. या सभेत २ महिला कामगारांनी भाषण केले. ही आधुनिक भारताच्या इतिहासातील क्रांतिकारक घटना ठरली. या विराट सभेत कामगारांनी आपला आवाज दाखवून दिला. सर्व कामगारांनी आपल्याला रविवारची सुटी देण्यात यावी, अशी मागणी एकमुखाने केली.
या प्रश्नाचा विचार करण्यासाठी इंग्रज सरकारने सर जॉर्ज कॉटन यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. कॉटन यांनी १० जून १८९० रोजी रविवारच्या सुटीस मंजुरी देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. हा नारायण मेघाजी लोखंडे आणि कामगार चळवळीचा मोठाच विजय ठरला.
- आमची माती आमची माणसंच्या मागे आहे हा आपला माणूस
- मराठी माणसाच्या अपमानाचा बदला म्हणून मुंबईत वानखडे स्टेडियम उभ राहिलं.
- मराठी नाटकासाठी फिरता रंगमंच बनवला तो कोल्हापूरच्या म्हादबा मिस्त्रींनी