पायाखालचा रस्ता झिजेल पण अभ्यंकर चप्पल कधी झिजणार नाही.
कोल्हापुरी चप्पलच्या जन्मभूमीत राहून स्वतःचा चप्पलचा ब्रँड तयार करायला डेरिंग लागतंय बॉस. डेरिंग बरोबरच तशी क्वालिटीदेखील लागते. अभ्यंकर असं साधं सरळ नाव असलेल्या चपलेने गेली पन्नास वर्ष आपली क्वालिटी आणि आपली स्टाईल दोन्ही जपली.
कोल्हापुरात असं म्हणतात कि सूर्याची लाईट डिम होईल, समुद्राचं पाणी आटेल, पाया खालचा रस्ता झिजेल पण अभ्यंकरची चप्पल कधी झिजणार नाही.
अभ्यंकर फूटवेअरची सुरुवात करणारे विष्णू गणेश अभ्यंकर यांच मूळ रत्नागिरीतल्या राजापुरातलं. तेव्हाच व्हर्नाक्युलर सातवीपर्यंत त्यांनी शिक्षण तर घेतलं पण त्यांच्या डोक्यात फक्त एकच होत, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय…
‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले’
काय करायचं, कस करायचं काहीच माहित नाही.मोठ्ठं तर व्हायचंय पण पुढं शाळेत शिकायचं ही नाही असं त्यांनी मनाशी ठरवलं. आणि लागलीच आठवीतनं शाळाच सोडून दिली. पुढं हाताला काम मिळविण्यासाठी त्यांनी दर्यापूर, अमरावती असा प्रवास केला. बऱ्याच शहरांचा अनुभव घेऊन त्यांनी शेवटी नागपूरचा स्टॉप घेतला.
इकडची तिकडची बारीक सारीक काम करता करता त्यांनी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट मध्ये लेदर टॅनिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. बर त्यावेळी हाच विषय घ्यायचा असं ही काही ठरलं नव्हतं. जो विषय मिळाला तो त्यांनी घेतला आणि पूर्ण पण केला. पुढं त्याच इन्स्टिटयूट मध्ये त्यांना लेदर टॅनिंग डिपार्टमेंट मध्ये टेक्निकल इन्स्ट्रक्टर म्हणून नोकरी लागली.
पुढं नागपुराच्या गर्मीत त्यांचं मन रमेना आणि त्यांनी थेट मुंबई गाठलं. मुंबईतल्या स्वस्तिक रबर कंपनीत अवघ्या दीड वर्षात टेक्निशियनपासून ते प्रोडक्शन मॅनेजर पर्यंत झेप घेतली. पण नव्याचे नऊ दिवस म्हणीप्रमाणे त्या कंपनीत ही त्यांचं मन रमेना. काहीतरी स्वतःच उभं करायचंय हा विचार त्यांना काही स्वस्थ बसू देईना. झालं तर मग…आपल्या त्यांनी मुंबईला ही रामराम ठोकला.
आता मुंबई सोडली पण पुढं काय हा प्रश्न होताच आणि त्यात पाठीवर विंचवाच बिऱ्हाड.
काहीतरी तरी करायलाच पाहिजे होत. त्यावेळी पुढारलेल्या शहरांमध्ये कोल्हापूरचं नाव घेतलं जाई. म्हणूनच कोल्हापूर शहरात जाऊन काहीतरी करता येईल असा विचार अभ्यंकरांनी केला. एका पाहुण्याच्या मदतीने ते आपल्या कुटुंबासोबत कोल्हापुरात आले. ते साल होत १९६६ च. बाबूजमाल परिसरात भाड्याचं घर घेतलं. त्या दोन छोट्या खोल्यांतच आपला उदयॊग सुरु केला.
उद्योग होता चपलांचा
आज २१ व्या शतकात ही जातीधर्माची दरी समाजात अस्तित्वात आहे. मग ६६ सालात तर बघायलाच नको. त्यात ब्राम्हण व्यक्तीने चपला बनविणे, विचार करा , कसला क्रांतिकारी निर्णय असेल. हाच क्रांतिकारी निर्णय घेतला होता विष्णू अभ्यंकरांनी.
५० वर्षांमागे चपलांच एवढं फॅड नव्हतं. म्हणजे आज चप्पल ही गरजेची गोष्ट झाली आहे तस त्यावेळेस तरी नव्हतं. हेच हेरलं अभ्यंकरांनी. चामड्याच्या व्यवसायात काम करीत असताना विष्णू अभ्यंकरांना असं वाटलं सामान्य लोकांसाठी ही टिकाऊ आणि कमी किमतीतल्या चपला तयार झाल्या पाहिजेत. आणि इथंच पायाभरणी झाली अभ्यंकर फुटवेअरची.
सुरुवातीला बाबूजमाल इथल्या घरातच त्यांनी चपला बनवायला सुरुवात केली. त्यावेळी ना कामगार होते ना अद्ययावत मशिनी. सुरुवातीच्या टप्प्यात सर्व काम एकटे विष्णू अभ्यंकरच करीत असत. आता चप्पल तर बनली पण विकायची कोणाला असा प्रश्न पुढं आला. मग यातून मार्ग काढत, प्रत्येकाच्या घरात जाऊन त्यांच्या पायाची मापं घेऊन ते चपला बनवू लागले. अभ्यंकरांच्या प्रमाणिकपणामुळ अभ्यंकर फूटवेअर थोड्याच दिवसात फेमस झालं.
त्यावेळी कोल्हापुरात ‘स्पेशल चप्पल बनवणारे कोण, असं विचारल्यानंतर अभ्यंकरांच्या घराकडं बोट दाखवलं जायचं.’
व्यवसाय स्थिरस्थावर होऊ लागला. १९६९ ला बिनखांबी गणेश मंदिर परिसरात शोरूम सुरु झालं. चपलांच्या स्टॅण्डर्डायझेशन झाल्यानंतर अभ्यंकर फूटवेअरने तटाकडील तालीमी लगत १९७४-७५ दरम्यान चप्पल कारखाना सुरु केला. आज कळंब्यात असलेला कारखाना १९८४ साली सूरु करण्यात आला होता.
अभ्यंकरांनी स्वतःला कामात इतकं झोकून दिल होत की, १९९४ ला पिरवाडीत दुसरा चप्पल कारखाना सुरु झाला. या कारखान्यातून १००च्या वर डिझाइन्स बाजारात आल्या. विष्णू अभ्यंकरांच्या दुसऱ्या पिढीने ही यात लक्ष घातलं आणि २००० साली अभ्यंकरांच फूटवेअर प्रायव्हेट लिमिटेड झाल.
नाव मोठं होऊ लागलं पण जातीबाहेर काम करतायत म्हणून त्यांचेच नातेवाईक, समाजातले तथाकथित मोठे लोक हिणवू लागले. विशेष म्हणजे चपला तयार करणारे चर्मकार लोक ही म्हणत की, ‘हा बामणाचा माणूस कुठं चपला शिवणार, आपला पूजापाठाचा धंदा सोडून कशाला नसते उद्योग करायचे.’ पण अभ्यंकरांनी आपल्या कामातून दाखवून दिल होत की, जातीवर काही अवलंबून नसत. कामात डिव्होशन पाहिजे, मग यश आपलंच असत.
हे ही वाच भिडू.
- एका गावातून १० टनापर्यन्त भडंग विकला जातो, असा असतो बिझनेस भावांनो !
- कोल्हापूरची वैशिष्ट्ये वाचली तर एशियन पेंन्टचे पण कान गच्च हुतील
- सायकलवरून पाव विकणाऱ्याचा ऑडी कारपर्यंतचा प्रवास
- तेव्हा घोडावत यांच्याकडं एकवीस नख्याचं कासव आहे अशी गावात चर्चा होती.