हिरो कोण असतो…जितू भैय्यानं परफेक्ट इस्कटून सांगितलय…
पुष्पा झुकेंगा नही म्हणत होता तेव्हा मला डेक्कनवरून साधी रिक्षा मिळत नव्हती. रॉकी जहाजातनं टनानं सोनं घेवून जात होता तेव्हा मित्राच्या घरात १० वर्षापासून चाललेली आईला पाटल्या करायची चर्चा ऐकत होतो.
अगदी बच्चन पासून ते रॉकीपर्यन्त आणि दिलीप कुमार पासून अल्लू अर्जूनपर्यन्त किती हिरो आले अन् किती गेले. कोणी कुस्त्या खेळल्या तर कोणी शिफॉनच्या साडीत हिरोईनला नाचवलं.
पण आपल्यासारखं अस कोण वाटलच नाय..
मग पिक्चरमध्ये आला जितू भैय्या…
जितू भैय्या कोण आहे तर जितेंद्र कुमार. TVF च्या बऱ्याच व्हिडीओत दिसणारा जितू अर्थात जितेंद्र कुमार. जितेंद्र कुमार मुळचा राजस्थानचा. सप्टेंबर 1990 जन्मतारिख असणारा जितू 90’s च्या पिढीचं परफेक्ट व्हर्जन आहे. जितू हूशार पोरगा. त्याने आयआयटी खरगपुर येथील सिव्हील इंजिनियरिग केलं.
इथंपर्यन्त त्याचं आयुष्य आपल्याला रिलेट होण्यासारखं नव्हतं. हुशार असणं, IIT मध्ये जाणं ही हिरोलोकांचीच लक्षण असतात. जितेंद्र कुमार तसाच होता. पण IIT च्या शेवटच्या टप्प्यात त्याची ओळख झाली ती बिस्वापती सरकार सोबत.
खाली बिस्वाचा आणि त्याचा एक जूना फोटो दिलाय.
TVF च्या प्रत्येक भागात अर्णब गोस्वामीचा रोल करणारा हा बिस्वा. बिस्वा त्याचा सिनीयर होता. कॉलेजमधल्या एका नाटकात त्यांची ओळख झाली आणि दोघं मित्र झाले. शेवटच्या टप्प्यातच त्याने जितेंद्र कुमारला TVF जॉईन करण्याची ऑफर दिली.
जितेंद्र कुमार थ्री एडिएटसारख्या आर. माधवनप्रमाणे घरातल्यांचा विरोध स्वीकारून TVF मध्ये काम करू लागला. यात त्याचा पहिला व्हायरल झालेला व्हिडीओ होता मुन्ना जज्बाती..
पण म्हणावं तस सुट होत नव्हतं. शिवाय IIT मधून पासआऊट होवून हे पॅशनच्या मागे -वडे लागण्याची चिन्ह दिसत होती. म्हणून जितेंद्र कुमारने कंपनीत जॉईन व्हायचा निर्णय घेतला. बंगलोरच्या एका कंपनीत तो जॉईन पण झाला. पण झालं अस की, ८ महिने काम एके काम केल्यानंतर त्याला कळालं हे काय आपलं नाही. जमणार नाय अस नाय पण यासाठी तर आपण झालेलो नाही..
धाडस करुन जॉब सोडला आणि पुन्हा TVF जॉईन केलं.
इथं आली त्याची फेमस सिरीज पिचर. स्टार्टअप या विषयाला घेवून केलेली पीचर तुफान चालली.
या सिरीजमुळे जितूभैय्या प्रत्येक कॉलेजमधल्या पोराच्या ओळखीचा झाला. त्यानंतर TVF मध्ये वेगवेगळ्या सिरीजीमध्ये तो दिसायचा. सगळ्यात लक्षात राहणार त्याचं काम म्हणजे केजरीवालची मिंमिक्री. ही मिमिक्री त्याने केजरीवाल यांच्या तोंडासमोर केलेली. इथही त्याची ओळख झाली…
त्यानंतर एकएक ऑफर येवू लागल्या. जितू प्रत्येक ठिकाणी परफेक्ट बसत होता.
पंचायत आणि चमन बहार हे जितू साठी कॉमेडीच्या बाहेर घेवून जाणारे सिरीज आणि सिनेमे ठरले. पंचायत तशी लो बजेट होती. ॲमेझॉन प्राईम वाल्यांना पण पंचायत कडून विशेष अपेक्षा नव्हता.
पण गाव आणि गावच राजकारण दाखवताना दिलेला ह्यूमरं परफेक्ट हिट झाला. जितूला या सिरीजसाठी जेव्हा निवडणलेलं तेव्हा त्याच्यासमोर स्वदेशचा शाहरूख होता. त्यासारखीच टिपीकल सिरीज होईल अस त्यालाही वाटलेलं.
पण स्वदेशची तुलना मागे पडली अन् पंचायत हा वेगळाच कल्ट झाला.
असचं चमन बहार बद्दल. चमन बहार सिनेमा 90’s च्या काळातला. पण एका निमशहरातला. म्हणजे अशी गावं जिथं स्टारबक्स किंवा CCD नव्हतं, पण कोल्ड कॉफी मिळतच नव्हती असही नव्हतं. चमन बहारमध्ये जितू भैय्यानं पानपट्टीवाल्या पोराचा सिन अक्षरश: तोडला. प्रेमात गंडल्यानंतर येणारा राग, पोरगीच्या नादाला लागून खालेला मार हे सगळं आपल्या आयुष्यात, आपल्या मित्रांच्या आयुष्यात घडत असत. तेच जितूभैय्यामुळे पडद्यावर दिसलं.
इथपर्यन्त जितू फक्त जितूच होता, पण कोटा फॅक्टरीत 90’s च्या पोरांना इन्स्ट्राग्राम पिढीकडून जी सिनेरिटी मिळालेली आहे ती परफेक्ट जितूमध्ये उतरली आणि तो नंतरच्या पिढीचा जितूभैय्या झाला. मध्येअध्ये तो गॉन केश, शुभमंगल ज्यादा सावधान सारख्या पिक्चरमध्ये तो दिसला पण पिचर, पंचायत, चमन बहार, कोटा फॅक्टरी सारख्यात त्याने जादू केली..
आत्ता पंचायत टू चा दूसरा सिजन आला आहे. इथेही तो राडा करतोय. त्याच्या हातात ना पाणबुडीय ना लाल चंदन..म्हणूनच तो भारी वाटतो इतकच..
हे ही वाच भिडू
- फुकट डाऊनलोड करत असाल तर २ लाखांपर्यंतचा दंड भरण्याची पंचायत येवू शकते
- पंचायत 2 ते मिर्झापूर 3 : येत्या काळात हे सिक्वेल राडा करायला तयार आहेत..
- हे पण UPSC ASPIRANT होते. पण अधिकारी बनायची संधी सोडून वेगळ्या क्षेत्रात नाव गाजवलं..