कोल्हापूरची वैशिष्ट्ये वाचली तर एशियन पेंन्टचे पण कान गच्च हुतील
रांगडेपणाबरोबर अंगात गुरगुर आणि मस्ती असणारी रंगेलपणा आणि शौकिनपणा बरोबर जिवाला जीव देणारी कौतुकाबरोबरच पाय आडवा घालून पाडण्याची तयारी असलेली लाल मातीशी घट्ट नातं असणारी आणि चैनित, निवांत असे शब्द खऱ्या अर्थाने जगणारी अघळपघळ मनाची माणसं म्हटलं की ती कोल्हापूरचीच असणार दूसरी कुठली.
नदी तलावात मस्तीत डुंबाव, लाल मातीत कुस्ती करावी, स्टार्चचे पांढरे कपडे, लहरी फेटा आणि करकर वाजणारी पायताण घालून मिरवावं अशी इच्छा या कोल्हापूरातला प्रत्येक पुरूष बाळगतो. तस पाहता इथे स्त्रीया म्हणजे “बाई माणसं” देखील मिरवण्यात मागे नाहित. सधन घरातल्या स्त्रीया सोन्याने मढलेल्या असतात. जरीकाठी साडी आणि डोक्यावर पदर घेऊन त्याचं एक टोक हातात धरून हाताची घडी अशा पद्धतीने वावरणाऱ्या.
सामान्य कष्टकरी वर्गातल्या बायका नऊवारी लुगडं नेसणाऱ्या, डोक्यावर पदर घेऊन त्यावर वैरणीचा भारा किंवा दही लोण्याच्या भांड्याने भरलेली बुट्टी घेऊन बाजारात जाणाऱ्या. अर्थात त्यांच्याही अंगावर सहज पाचपंचवीस तोळ्याचे दागिणे चकाकताना दिसतील.
कोल्हापुरी साज, चिताक, बोरमाळ, जोंधळी पोत, मंगळसुत्र, हातात बिलवर, पाटल्या, बांगड्या, बोटात अंगठी, कानात बुगडी, कर्नफुल, कुड्या, वेल असे इथल्या दागिण्याचे प्रकार आहेत. इथले पुरूष सुद्धा गळ्यात सोन्याची चेन, त्यात अडकवलेलं वाघनखं, हातात सोन्याचं कड, बोटात अंगठ्या, मनगटात सोनेरी घड्याळ आणि डोळ्यांवर रेबॅनचा गॉगल असे सजूनधजून असलेले दिसतील.
इथला सामान्य कष्टकरीसुद्धा बऱ्यापैकी अंगभर कपडे घालून वावरताना दिसतो.
पश्चिमेकडचा अतिडोंगराळ भाग आणि सांगलीचा पूर्वेकडील अतिदुष्काळी भाग सोडला तर उर्वरीत दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात समृद्धी नांदते. हळद, द्राक्षे, ऊस, भाजीपाला, भात अशा पिकांबरोबरच मुबलक पशुधन हे इथल्या समृद्धिचं गुपित आहे. कृष्णा पंचगंगा नद्या म्हणजे या भागाच्या जीवनदायनी. कोल्हापूर ही छत्रपती भोसले घराण्याची गादी. त्यामुळे जिल्ह्यावर राजघराण्याची छाप दिसते.
रांगडेपणा आणि आपलेपणा साऱ्या जिल्ह्यात ठासून भरलेला आहे. “कोल्हापूरी” म्हणून जीजी वैशिष्ट आहेत ती सारी या जिल्ह्याच्या प्रत्येक भागात आढळतात.
अस्सल कोल्हापूरी.
इर्ष्या आणि उत्साह तर कोल्हापूरकरांच्या नसानसांत भिनलेला. घर बांधायचं असो किंवा लग्न बारसं असो ते दणकेबाज झालच पाहीजे ही इथली मानसिकता. अशा कार्यक्रमात मानापानाची नाटकं भलतीच रंगतात. शुभकार्याला बहिणीने घराला तोरण आणून बांधायची इथली रित आहे. त्याबरोबर पाचपन्नास मंडळींना पुरेल असा गारवा आणायचा.
“गारवा” हे एक खास कोल्हापूरी अन्न भन्नाट प्रकरण आहे. भाकरी, पाटव़डी, अंबिल, घुगऱ्या, दहिभात, शेंगदाण्याची चटणी, कांदा अशा नाना पदार्थांची रेलचेल असलेल्या दुरड्या म्हणजे गारवा. या दुरड्या भरून बहिणीने वाजत गाजत तोरण घेऊन यायचं, भावाच्या घराचा उंबरा धुऊन ते चौकटीला बांधायचं आणि मग आप्तेष्टांनी यथेच्छ ताव मारायचा.
लग्न ही तर आठदहा दिवसांची बेजमी म्हणायला हरकत नाही.
शेजार पाजारच्या बायका मुलींना जात्यावर हळद दळायला सुरवात केल्यापासून मुहूर्तमेढ, लग्नाचा चु़डा, घुघुळ, हळदी, साखरपुडा, अक्षदा, लग्न, वरात, गोंधळ, जागर ते हळद काढण्यापर्यन्तचे सगळे विधी पार पाडायचं म्हटलं तरी दहा पंधरा दिवस वातावरण उत्साहाने भारलेलं राहतं. लग्न ठरलं की याद्या करण्यासाठी जेष्ठ मंडळी चर्चेला बसतात. देण्याघेण्याचे मुद्दे सुरू झाले की मुख्य मुद्दा असतो नवरा नवरीचे पोशाख.
मुलांचे कपडे मुलीकडच्यांनी काढावेत आणि मुलीचे कपडे मुलाकडच्यांनी काढावेत अस ठरतं. मग बाजारपेठेत कपडे खरेदीला ही दोन्ही घरचे मंडळी एकत्र येतात. परस्परांच्या आवडीने खरेदी होते. दुकानाबाहेर आमच्यासारखा ओळखीचा भेटला की विचारपूस होते. “काय, हिकडं कुठ?” “आमच्या भाच्याचं लग्न ठरलय, म्हणून कपडे काढायला आलोय” “मग कुठे काढले कपडे” “मुलीचे, चंद्ररूप वालावलकर मध्ये आणि मुलाचे रेमंडमध्ये” “मग काय, दोघांचे कपडे काढून आम्ही सोळंकीत आयस्किम खायलो आलोय”
“कपडे काढणं म्हणजे खरेदी करण”
हा खास इथला अर्थ ज्यांना माहित नाही, त्यांची बोट ही चर्चा ऐकून नक्कीच तोंडात जातील. पण आपण काय बोलतो, त्याचा अर्थ काय होतो याचा परिणामांची पर्वा या अघळपघळ लोकांमध्ये नसते.
चौकश्या करणं हा इथल्या रिकामटेकड्यांचा खास उद्योग. खरतर याला दूसऱ्याची मापं काढणं असा वाक्यप्रचार अस्तित्वात आहे. अशा वाक्यप्रचाराप्रमाणेच अनेक विशेषणं, क्रियापद अनेक वचनं यांच्याही खास शैली इथे रुजल्या आहेत. “पॅन्टी शिवायला टाकल्यात, त्या आणायला निघालोय” अस वाक्य इथे सहज कानावर पडतं.
पॅन्टचं अनेकवचन आमच्याकडे पॅन्टस् अस न होता पॅन्टी होतं. भाषेच्या अशा अनेक करामती इथे होतच असतात. निघालो आहे अस म्हणण्याऐवजी जर जोर देऊन “निघालोय” असा शॉटकट आम्ही सर्व क्रियांसाठी वापरतो. उदाहरणार्थ खायलोय, करायलोय, जायलोय, बघायलोय, टाकायलोय,यायलोय वगैरे.
तस पाहता कोल्हापूरी भाषेला एक वेगळाच बाज आहे. इथे शिवीचा आवर्जून वापर होतोच. पण कोल्हापूरी अस्सलपणा किंवा झणझणीत पणाबरोबर शिव्यांच्याही अनेक छटा इथे दिसतात. ए रांडच्या हे रागाच्या भरात जेवढं जोर घेऊन येतं तेच काय रांड्या कुठं गेलतसं ही अगदी जिवाभावाच्या मित्राच्या चौकशीची सुरवात असू शकते. ते रांडचं… असं दोघांनी चर्चा करताना तिसऱ्याबद्दल बोललेलं असतं. पण त्यात पुढे कौतुक, चेष्टा, टवाळी, सहानभूती, प्रेम, आदर यापैकी काहीही असू शकतं.
“ते राडंचं लय भारी पडलं बघ”
“ते रांडचं लय शिकलय रे”
“ते रांडचं असच राहिलं बघ”
पण काही म्हणा, जिवाभावाच्या मित्रानं आपल्याला तशी हाक नाही मारली तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. शब्दाचा अर्थ शिवीजन्य असला तरी इथे तो आप्तजणांसाठीच असतो. शिक्षक मित्रांचे वडील, समाजातील प्रतिष्ठित यापैकी कोणालाही हे बिरूद लाऊन बोलण्यास इथे मुभा आहे अस म्हटलं तर वावग ठरणार नाही.
पण याशिवाय इतर शिव्यांचा वापर केला गेला तर मात्र कोल्हापूरकरांचा इगो दुखावला जावू शकतो. तस झालं तर पायताण अथवा तलवार असे दोन आणि फक्त दोनच पर्याय कोल्हापूरकरांना माहित आहेत.
इथल्या इतर काही भाषिक वैशिष्टांची ओळख नोंदवणही आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अनेक भाववाचक नामांच आम्ही अनेकवचन करु शकतो. म्हणजे प्रेम, भूका, चैन्या.. हं, तुम्ही करा प्रेम आणि आम्ही बघत बसतो. अस किंवा “काय चैन्या करायलायस” अस किंवा “चला आमानी भूका लागल्यात” अस सर्रास म्हणलं जावू शकतं. तसच केस च केसं, दगड च दगडं वैगेरे ही इथं सर्रास होऊन जातं.
आणखी एक खासियत म्हणजे इकडचं व्याकरण जगावेगळं आहे.
उदाहरणार्थ, तो, ती, ते हे अनुक्रमे पुल्लिंगी, स्त्रिलिंगी आणि नपुसकलिंगासाठी वापरायचं अस व्याकरणशास्त्र म्हणतं. पण तो गेला अस म्हणण्याऐवजी. “ते गेलं की” अस म्हणत आम्ही व्याकरणाची खांडोळी करू शकतो. इथल्या स्त्रीया बोलताना मी आले असं म्हणण्याऐवजी, “मी आलो”, “मी गेलो” वगैरे म्हणतात. अस का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येतं की हे मराठा राजधानीचं गाव आहे. आम्ही आलो, आम्ही गेलो,चाललो असं बोलणं ही इथल्या राजघराण्यातील व्यक्तींच्या बोलण्याची पद्धत. हीच भाषा आत्ता इथल्या माणसांच्या बोलण्यात, भाषेत, संवादात रुजली आहे.
इथल्या चौकातल्या मंडळाजवळ किंवा तालमीच्या दारात बसून सुरू असणारी वर्णनसुद्धा एकदम झकास, नाद करायचा नाय, नादखुळा रे, अशी खास कोल्हापूरी रचना अवधुत गुप्ते यांनी महाराष्ट्रभर नेली तेव्हा सर्वांना कळली. कोणी दूसऱ्याला एखादी गोष्ट अतिरंजीत करुन सांगत असेल किंवा मैत्रीणीला कडेला घेऊन सांगत असेल तर जाताजाता कशी ऐवू, गंडीव असा आवाज टाकून गेलं की संबधिताची भलतीच अडचण होऊन जाणार.
फुटबॉल आणि हॉकी हे आमचे गावखेळ आहेत.
इथे मैदानात शिट्यांबरोबरच शेलकी वाक्यही चेअरअप साठी असतात. आणि नंतर इतरांना त्यांच्या हायलाईट्स चौकात उभारून सांगताना नादखुळा रे, एकदम गड्डाजाम, खटक्यावर बॉट जाग्यावर पलटी हे मॅच, कुस्ती, अपघात, प्रेमप्रकरण यांपैकी कशासाठीही सोयीने वापरायचं विशेषण वाक्य असतं.
हा आणखी एक आठवलं, इथल्या तरुण मंडळांची नाव सुद्धा भन्नाट आहेत. झाडं ग्रुप, कलकल तरुण मंडळ, अचानक मित्र मंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ, पॉवरफुल चिक्कू मित्रमंडळ…
तरुण मुलं आपल्या मंडळांची नाव अशी का ठेवतात यावर रिसर्च करणं आवश्यक आहे. रिक्षाच्या मागील बाजूस किंवा मडफ्लॅपवर लिहलेला मजकूरसुद्धा असाच अभ्यास करण्यासारखा. बघतोय काय रागानं ओव्हरटेक केलाय वाघानं, तशी मी गावाची नाय, वगैरे… हे सुचत कसं हे कोल्हापूरकरांनाच माहित. या कल्पनाशक्तीतून इथे अशा अनेक टर्मा तयार झाल्या आहेत. उदाहरणार्थ रंगा खुश, पाला झाला, हारकुन टुम्म.
चेष्टा कुठे करावी याला ही इथे मर्यादा नाहीत. चेष्टा मस्करीसाठी जो खुलेपणा असावा लागतो तो इथे आहे. एखाद्या अंत्ययात्रेत प्रेताला खांदा देत चाल्लेला माणूस समोरून येणाऱ्याला विचारतो. काय बसणार काय डब्बलशिट. खऱ्या अर्थानं हे सारं अघळपघळ..
जोशी कुठे राहतात हे इथे विचारू नये अशी पाटी पुण्यामध्ये वाचायला मिळते. कोल्हापूरात मात्र बरोबर याच्या उलट दृष्य अनुभवायला मिळतं. चौकात किंवा कोपऱ्यावर उभ्या असलेल्या मंडळींना पत्ता विचारला तर ते त्या व्यक्तिची इतर माहिती विचारतील आणि एकमेकांत सांगतील….
” अरे, त्या बॉबकटचा बाबा रे..! , काळं गिड्ड रे ते..! ”
विशेष म्हणजे माहितीची ही आदानप्रदान पत्ता विचारणाऱ्याचा समोरही होऊ शकते. त्यानंतर पत्ता सांगण्याचा कार्यक्रम असा असतो.
” हे बघा, सगळं स्ट्रेट जावा, पुढे एक गोल सर्कल लागल तिथनं लेफ्ट मारा (चालताना सुद्धा) त्या बोळात एक पायपीचा (ट्युबलाईटचा) डांब (खांब) लागल. त्याच्या जरा पुढं गेला की, पाण्याची चावी (नळ) दिसल. तिथं बायका हायतच. त्या त्यांच्याच”
एवढं ऐकून गोंधळलेला पाव्हणा आणि गोंधळू नये म्हणून एखाद्या लहान मुलाला ए बारक्या जा यास्नी सोडून ये अस सांगणार. हे सगळं आपल्या गल्लीत आलेल्या पाहूण्यांसाठी हे लक्षात घ्यायचं.
थोड्यावेळात ते पाहूणे परत जाताना दिसले तर पाव्हणं गावलं नव्हं घर ? अस आवर्जून विचारणार. आणि रिक्षाला हाक मारून पाव्हण्यांना त्यात बसवून निरोप देणार. पाईप म्हणजे ट्यूबलाईट. डांब म्हणजे खांब, चावी म्हणजे नळ असे बरेच शब्द हे खास कोल्हापूरी शब्दकोषातले. त्याचबरोबर अनेक समानार्थी शब्द वाक्यप्रचार विशेषणं वगैरेंचा स्वतंत्र कोष आहे. पण तो केवळ मौैखिक असल्याने समजून घ्यावा लागतो. वा अभ्यासण्यासाठी इथेच जन्म घेऊन लहानाचं मोठ्ठं व्हावं लागतं.
शिवाय इथे ॲडिशनल बोनस म्हणून दाद कशी द्यावी यासाठी प्रशिक्षणाचं खास पॅकेजही आहे. इथे कुस्तीला, तमाशातल्या नाचाला, ढोलकीच्या तालाला, शास्त्रीय संगीताला, मटणाला, रश्याला, सिनेमाला, खेळाला, जनावराला दाद देण्याचे वैविध्यपूर्ण असे प्रकार आहेत. शिट्टी कधीही वाजवायची नसते. विशिष्ट दाद, अदा, अर्थ,झटका, हि लावणीत वापरण्याची शिट्टीची ठिकाणं. पण ढोलकीवर थाप पडल्यापासून अनेक ठिकाणं खास असतात. ढोलकीचा आवाज बारीक होत जातो. तेव्हा आपला आवाज बंद ठेऊन बारीक अस म्हटलं जाऊ शकतं. हे झक्कास पुण्यांदा व्हायला पाहीजे. अस इथली माणसं त्या कलाकाराला खासगीत भेटून सांगतीलच शिवाय घरी येण्याचं आमंत्रणही देतील.
इथं मैदानातलं चिअरअप आणखीनच जोषपूर्ण. खास प्रतिस्पर्धी संघावर भितीदायक किंवा आक्रमक छाप टाकायची असेल तर पहिल्याच टप्यात प्रभावी कृती केली जाते. त्यासाठी इथे हमखास आबकी डाव असा शब्दप्रयोग केला जातो.
“निवांत जगणं”
निवांत, या शब्दाची व्युत्पती शोधायला गेलं तर त्याचं मुळ कोल्हापूरातच असेल. खूप कष्टाची तयारी असली तरी इथलं जगणं प्रत्यक्षात निवांत आहे. पण तरीही हे पेन्शनरांच गाव नाही. मग निवांत म्हणजे नेमकं काय. तूम्ही कोणालाही विचारा काय चाल्लय, किंवा काय विशेष तरी उत्तर एकच निवांत.
कारण गावाची लांबी, रुंदी पाच बाय सात किलोमीटर म्हणजे कामाच्या ठिकाणी जायला किंवा यायला जास्तीत जास्त अर्धा तास. त्यामुळे त्या आधी आणि त्या नंतर निवांतच वेळ असतो. मग चौकात गप्पा नायतर चकाट्या. त्यामुळे निवांतपण हा रक्तातच भिनलेला.
शेती असणारे सुद्धा ऊसवाले. ऊसाचं पिक हे इतर पिकांपेक्षा जरा वेगळं. एकदा त्यांची लागवड केली की तिनदा पिक फक्त कापून फॅक्टरीला पाठवायचं नायतर गुऱ्हाळाला. त्याला पाणी पाजणं एवढच काम. मोटर सुरू केली की, पाटाने सरीतून ते आपोआप जातं. सगळ्या शेताला पाणी पोहचलं का हे पहायला इथला शेतकरी वेगळी ट्रिक वापरतो. मातीचं एक ढेकूळ किंवा दगड उचलून अपेक्षित दिशेने फेकतो. जर डुबूक असा आवाज आला तर पाणी पोहचलय. मग मोटारचा खटका (स्वीच) बंद. झालं.
वर्षातनं दोनचार वेळेला कारखान्याचं बील किंवा गुळाची पट्टी मिळाली की काम खल्लास.
अर्थातच इथलं सगळं. अस सगळं निवांत असल्याने. म्हणूनच मोटार सायकल घेऊन गावात फिरायला रिकामी झालेली इथली मंडळी नाना शौक जपतात. आणि सामान्य माणसं सुद्धा किरकोळ काम करुन माशाचा गळ घेऊन निवांत टाईमपास करताना दिसतात.
माशाचा गळावरून आणखी एक सांगितलच पाहीजे असा मुद्दा इथल्या तळ्यांचा. हे तळ्यांच किंवा कमळांच गाव. कोल्ल म्हणजे कमळ. आणि कमळांच गाव म्हणून त्याचं नाव कोल्लापूर. अशी एक व्युत्पती गॅझेटियरमध्ये नमुद आहे. संपूर्ण तटबंदी, त्याभोवती खंदक, आणि सात प्रवेशद्वार असलेल्या या गावात २४ तळी असल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात.
नियोजनाच्या अभावामुळे आणि परिणामांचा विचार न केल्यामुळे इथली सगळी तळी खरमाती, कचरा, निर्माल्यमूर्तींनी बुजली. पण जेवढी उरली आहेत त्या तळ्यांशी नाती टवटवीत आहेत. रंकाळा हे त्याचं साक्षात उदाहरणं. तरुणाई याच रंकाळ्याच्या काठावर फुलते. प्रेमी युगूल, नवं लग्न झालेली जोडपी, रिटायर्ड मंडळी, आंबटशौकीन, व्यायाम करायला येणारी मंडळी, या सगळ्यांनीच रंकाळ्याशी नात जोडलं आहे.
अगदी आबालाल रेहमान, बाबूराव पेंटर, माधवराव बागल अशा अनेकांच्या कुंचल्यांनी इथं पेंटिंग चितारली आहेत. अनेक कॅमेऱ्यांनी इथला सुर्यास्त टिपला आहे. व्ही शांताराम, दादा कोंडके, भालजी पेंढारकर यांनी सिनेमा चित्रीकरणासाठी रंकाळ्याची निवड केली आहे. पर्यावरणीय मुद्यांसाठी झालेल्या अनेक आंदोलनात सहभागी होऊन हजारो लोकांनी रंकाळ्याबद्दलच आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. आजही हा रंकाळा कोल्हापूरच्या गळ्यातला ताईत आहे.
झणझणीत मिसळ आणि खुळा रस्सा
खाण्यापिण्याला दाद ही तर इथल्या चटपटीतपणाची करामत आहे. कोल्हापूरी मिसळीचा नाष्टा घाम फोडणारा असतो. एकदा ही मिसळ खावून पहा मग दही मिसळ, मटणाच्या शिळ्या रस्स्यांची मिसळ, भज्यांच्या चुरा घालून मिसळ, दुध मिसळ असे पुढचे टप्पे खायला कोल्हापूर बुकिंग सुरू होईल.
इथली मंडळी मटणाला हावरी आहेत. अस म्हटलं जातं. पण खरं तर तस नाही. ती मटणावर प्रेम करतात. त्याबरोबर जगतात अस म्हणणं जास्त बरोबर होईल.
कदाचित जन्मानंतर पाचवीची पूजा केली जाते. आणि तिथं नैवेज्ञ म्हणून बकऱ्याची मुंडी आणि पाय दाखवले जातात. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूरकरांची नाळ मटणाशी जोडली जात असणार.
इथे दिवाळीपासून पाडव्यापर्यन्त खेडोपाडी माही जत्रा असते. मोटारसायकलवरून तब्बल पन्नास शंभर किलोमीटर तिब्बल शिट प्रवास करुन माहीचं जेवण जेवायला जाणारे मटणप्रेमी इथेच भेटतात. हे जेवण थोड्याफार मद्यसेवनाने सुरू होतं. ढिगभर भातावर हवा तेवढा रस्सा यावेळी मिळू शकतो. मटणाचा खडा (फोड) चुकून एखादा आला तर आला. पण रस्स्यांसाठी जगावं. हा इथला मुलमंत्र असल्याने मटण न मिळाल्याने काही फरक पडत नाही.
या जेवणाला आमंत्रण असावच लागतं असही नाही. अनोळखी घरात मित्रांबरोबर आपण जाऊ शकतो. तिथं आपल्याला अगत्यपूर्वक जेवण मिळेल याची खात्री बाळगा. ऐनवेळी माणसं वाडली अस यजमानांना वाटलं तर रस्स्यांमध्ये पाण्याची घागर ओतून चटणी मीठ टाकलं की बस्स ! या रस्साला इथं खुळा रस्सा अस म्हणलं जातं. हॉटेल किंवा थोड्या बड्या घरात जेवणाचा योग आला तर पांढरा रस्सा, पुलाव, गोळीपुलाव, दमबिर्याणी, खिमा असे खास पदार्थ मिळतील.
शाही जेवणात १२ प्रकारचे रस्से असत शिवाय कुंभार समाजात केली जाणारी रक्ती, घिसाडी समाजाकडून भाजून आणलेल्या मुंडींचा रस्सा, गावठी कोंबडीचा रस्सा, अगदी गरिबाघरी अगत्याने केली जाणारी भाकरी व अंड्याची पोळी (ऑमलेट) खर्डा, झुणका, दही हे आमचं मेन्यूकॉर्ड कोणाशी स्पर्धा करणारं नाही. पण मिरवणारं मात्र आहे.
एव्हाना कोल्हापूरी नॉनव्हेजला जगमान्यता मिळाली आहे. अगदी जगभरातल्या पंचतारांकित हॉटेलांच्या मेन्युकार्डवर कोल्हापूरी रेसिपीज् ना मटण चिकन कोल्हापूरी अशी ठसठशीत जागा मिळाली आहे. पण ही जागा का मिळाली या प्रश्नाचं उत्तर कोल्हापूरी चटणीशी जोडलेलं आहे. ही चटणी तयार करणं म्हणजे एक दिव्य असतं. विशिष्ट प्रमाणात सुमारे पंचवीस एक मसाल्याचे पदार्थ क्रमाने एकत्र होत जाऊन त्या सोबत कांदा, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीपुड एकजीव केली जाते. या मिश्रणाला म्हणतात कोल्हापूरी चटणी. रस्सा मटणाचं ती इप्सित आहेच
पण नवी चटणी बनते त्या दिवशी गरम भाकरी, तेल आणि चटणी खाण्याचं भाग्य मिळण्यासाठी कोल्हापूरात जन्म घ्यावा लागतो !
बटाटेवडा हे सामान्यांच मधल्या वेळेच मिष्टांन. पुण्यातला जोशी वडा आणि बॉम्बे वडा यांना कोल्हापूरचा वडा पुरून उरतो. कारण घसघशीत आकार नी डाळीच्या पिठाचं जाडजूड आवरण. तो खमंग आणि खुसखुशीत तळलेला असतो. इथला वडापाव किंवा कटवडा खाऊनच बघा. त्या बरोबरच मिलनची कांदाभजी, माळकरांची जिलबी, खासबाग किंवा बावड्याची मिसळ, चोरग्यांच्या मिसळीचा कट, LIC कॅन्टिनची खांडोळी व इम्पेरियलची थंडाई भन्नाटच.
भेळ ही कोल्हापूरची आणखी एक खासीयत. नेहमीपेक्षा ही भेळ जरा वेगळी. राजाभाऊ हे भेळप्रकरणातलं अग्रणी व्यक्तिमत्व. इथले चिरमुरे हे पाचंट आणि पोकळ नसतात. थोडीशी खारट चव असणाऱ्या भरीव चिरमुऱ्यांची इथे झक्कास भडंग केली जाते. आणि मग त्यात फरसाण, चिंचेचा कोळ, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर त्यावर कैरीची तिखट मिठ लावलेली फोड कागदाच्या वाडग्यात घेवून कागदी चमच्याने खायची. या भेळीचा आंबटगोडपणा जगण्यात नाही मुरला तरच नवलं.
पुणेरी बाकरवडी आणि कोल्हापूरी बाकरवडी अशी स्पर्धा असली तरी बनवणाऱ्या माणसांची ठेवणच वेगवेगळी असल्याने त्याच्या चवी वेगवेगळ्या असणारचं. इथल्या दुधाला येणारी साय सुद्धा इथल्या दाटपणाची ओळख देणारी आहे. दुधापासून बनलेली बासुंदी आणि कंदी पेठे हे नृसिंहवाडीसारख्या परिसराचे खास पदार्थ आहेत.
कवठाची बर्फी हा सुद्धा इथला स्पेशल पदार्थ. आणखी एक, कोल्हापूरकडच्या परिसरात चहा जरा जास्त गोड असला तरी दुधाचा असतो. कोल्हापूर शहरातल्या जून्या चौकांमध्ये आजही म्हशींच धारोष्ण दुध तिथल्या तिथे पिळून फेसासह दिलं जातं. सोडा लिंबाला जसा फेस येतो तसा या ग्लासमधल्या दुधावर असतो. मिशांना किंवा ओठांना लागलेला फेस शर्टाच्या हातोप्यांनी पुसला की गावभर फिरायला ओके.
सोळंकी आयस्क्रिम हे इथलं आणखी एक प्रस्थ.
तब्बल तीनचार पिढ्या घराघरांशी नात जोडून आहेत. त्यामुळेच बाहेरून आलेली कोणतीही कंपनी, कोणतही आयस्क्रिम इथे पाय रोवू शकलेलं नाही. त्याशिवाय इथे तालमींमध्ये पैलवान थंडाई तयार करतात. किंवा आयस्क्रिमच्या दुकानातही थंडाई मिळते. दुकानात हा शब्द मुद्दाम नोंदवला. कारण बारा महिने फक्त आयस्क्रिम विकणारी प्रशस्त अशी पन्नास तरी दुकानं या गावात बऱ्याच वर्षांपासून आहेत. त्या दूकानात ब्रॅण्डेड शितपेयं आजही मिळत नाहीत इथं अजूनही सोडा फाऊंटन आहेत. आजही इथे बाटलीतला गोटी सोडा मिळतो.
दुधाचा आणखी एक खास पदार्थ म्हणजे खरवस. खरवसाच्या वड्या आणि बर्फी हे अफलातून आणि दुर्मिळ पदार्थ. तशी आणखी एक स्पेशल गोष्ट म्हणजे काकवी. हा आमचा देशी शुगर केन जॅंम. शिवाय ऊसाचा रस, भेळ, चिरमुऱ्याचे लाडू, चिरमुरे हे टाईमपास आयटम.
एकूणच कोल्हापूरी पदार्थ हा अनेकांचा विकपॉईन्ट आहे.
कोल्हापूरी स्वभाव
आजही कोल्हापूरात बारसं ते मृत्यू अशा प्रवासात अनेक जेवणावळी होतात. पण कोणी मयत झालं तर त्या घरात दहा दिवस चुल पेटत नाही. इथली माणूसकीची ठेवण औरच आहे. शेजारधर्म म्हणजे काय याचा हा वस्तूपाठ. गल्लीत कोणी मयत झालं तर प्रत्येकाच्या घराची कडी वाजवून निरोप दिला जातो.
शहरीकरणाच्या बदलांबरोबर ही रीत बदललेली नाही. अत्यंविधीसाठी लागणार साहित्य आणायला पैसे कोणीतरी परस्पर खर्च करत. पण त्या कुटूंबियांकडून ते नंतर संबधिताला दिले जातात. दहा दिवस शेजारी व नातेवाईक त्या घरातील सर्वांचे जेवण, चहा नाष्टा आपणहून आणून देतात. कोल्हापूर शहरात तर आवश्यक लाकूड शेणी महापालिका मोफत पुरवते. तस इतर साहित्य ज्या ठिकाणी मिळतं ती मोजकी ठिकाणं आहेत.
तिथला संवाद कसा असतो पहा, रात्री बेरात्री त्या घराचं दार वाजवलं की वरची खिडकी उघडून विचारणा होते, “बाई की बापय ? जर बाई अस उत्तर दिलं तर विधवा की सवाशिन असा पुढचा प्रश्न विचारला जातोे. उत्तर मिळाल्यानंतर काही मिनीटात सगळं साहित्य पावतीसह ठेवलं जातं. याच अनुषंगाने आणखी एक ठळक नोंद केली पाहीजे. इथले फुलवाले मयताच्या हाराच्या दराची कधीही घासाघीस करत नाहीत. ठेवले जातील तेवढे पैसे घेतले जातात.
रात्री फुलांची दूकानं बंद झाल्यानंतर मृतदेहासाठी हार लागू शकतो हे लक्षात घेवून ते दुकानाबाहेर लटकवून ठेवले जातात.
आपण हार घेवून पैसे ठेवले किंवा नंतर दिले तरी चालतात. इथली संस्कृती ही अशी आहे. मात्र जसा शेजारधर्म सांभाळला जातो तशीच दुष्मनीही. अर्थात एखादा दुखत प्रसंग घडला की तिथे दुष्मनीसुद्धा धावून जाते.
एकोप्यावरून आठवलं, देशभरात हिंदू मुस्लीम द्वेषाची बीजं पेरली गेली असली तरी त्याला कोल्हापूर हा अपवाद आहे. इथे मशिदीच्या चौकटीवर गणपती दिसू शकतोे. गणपतीचं दर्शन घेवून बाबू जमाल दर्ग्याचं दर्शन घेणारे मुस्लीम-हिंदू तुम्हाला इथे नेहमीच दिसतात. पिराच्या उत्सवात पुढाकार हिंदूंचा. इतकच नव्हे तर पिर आणि गणपती एका मांडवात असणार हे ही दृश्य इथलच.
बकरी ईद जरा लवकर यावी अस मुस्लीमांशिवाय इतरांनाच जरा जास्त वाटतं. कारण बिर्याणी आणि खिर चापून खाण्याची ही संधी असते. ईदच्या दिवशी नकळत. दोन चार घरातून आमंत्रण येणार किंवा तिकडून डब्बा तरी येणार हे नक्की असतं. नृसिंहवाडीच्या संगमावर हिंदू प्रमाणे मुस्लीमांचेही अंत्यसंस्कार विधी होतात. अस तुम्हाला कुणी सांगितलं तर त्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण ही खरी गोष्ट आहे. इथल्या संस्कृतीचे असे वेगवेगळे पैलु आहेत.
पैसे बॅंकेत ठेवण हा प्रकार इथल्या लोकांच्या रक्तात नाही.
जुन्या वळणाचे लोक पैसे बॅंकेत ठेवण्याऐवजी जमिनीत गुंतवतात. बॅंकेत ठेवले की कुटूंबात भावंडांना वगैरे कळतं म्हणून हा मार्ग पत्करला जातो. दूसरीकडे बाजारहाटीतले बाजूला काढलेले पैसे वर्षात साडेतीन मुहूर्ताला हळूच काढून ग्रॅम-दोन ग्रॅम सोन घेऊन ठेवायचं, ही बाईमाणसांची आयडिया आजही सुरू आहे.
पुरूष पैसे ठेवतात भिशीमध्ये. भिशी कशासाठी? दिवाळीला बोनस नाही मिळाला तरी तोंड वाकडं होऊ नये म्हणून ! उच्च मध्यमवर्गीयांनी मात्र रिटायरमेंटनंतर मिळालेले पैसे काही बॅंकात व्याजदर जास्त म्हणून गुंतवले ; पण अनेक पतसंस्था, बॅंका बुडाल्या आणि तेसुद्धा बुडाले. खरं तर आज विश्वासार्हता कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा जमिनी सोन्याकडं गुंतवणुकीचा कल दिसतो. म्हणजे अडीअडचणीला तारण ठेवून पैसे उभे करता येतात, हा विश्वास त्यांना वाटतो.
आपल्या घराचं स्वप्न पाहताना मूळचे कोल्हापूरकर कधी प्लॅट सिस्टिममध्ये रमत नाही.
दोन-तीन दशकांपूर्वी शिक्षक, क्लॉर्क अशा मध्यमवर्गीयांनी हजार-पंधराने स्केअर फुटांचा प्लॉट घेऊन दोन-तीन खोल्यांची घरं बांधली. घरांना आई-वडिल किंवा स्वत: पती पत्नीचं नाव देण्याची क्रेझ. पण नाव मात्र ठसठशीत आणि कोरीव. मातृपितृछाया या कॉमन नावापासून अनेक अफलातून कॉबिनेशन्स इथे दिसतील. प्रगुंपा असं एका घराचं नाव. अर्थ काय? प्रमिला गुंडोपंत पारगावकर.
नावातल्या पहिल्या अक्षरांपासून घराचं नाव तयार करण्याची ही किमया फक्त कोल्हापुरातच असावी. इथली ऐसपैस परिसर असलेली बैठी घरं अंगण-परसाला जोडून साधेपणा जपतात. अगदी अलीकडे इथली वाडासंस्कृती कमी झाली; पण अजूनही हाकेला ‘ओ’ मिळते. पाहुणे आल्यावर कपभर दूध किंवा लिंबू मिळवण्यासाठी किंवा अंगती-पंगतीसाठी इथे शेजार आहे. आईचा स्वयंपाक व्हायचा असेल तर मावशींकडून डब्यासाठी भाजी घेताना लाजण्याचा प्रश्न येत नाही.
आजही उन्हाळ्यातले पापड, सांगडे, शेवया करताना एकमेकींच्या सोयीनुसार ‘टाईम-टेबल’ ठरतं. एकमेकींना मदत करणाऱ्या काकू-मावशींशी रक्तापलीकडची नाती आजही आहेत. बायका-मुलं सुटीत डबे घेऊन पन्हाळा, कात्यायनी, वाडीला जाताना दिसतात, तर पुरुष मंडळी त्यांच्या एंजॉयमेंटला ‘रस्सा मंडळ’ करतात. म्हणजे काय? भाकरी-भात आपापल्या घरून आणायचा, वर्गणी काढून फक्त मटण करायचं आणि निवांत बसून जेवायचं.
नदी-तलावावर मासे पकडण्यासाठी दिवसभर गळ घेऊन बसणारेसुद्धा इथे दिसतात; तेही स्वतःच्या करमणुकीसाठी.
तालमीत व्यायाम, फुटबॉल किंवा हॉकीचा सराव, बुद्धिबळाचा पट, कॅरम मंडळ किंवा मर्दानी खेळाचे सराव ही इथली मनोरंजनाची साधनं. नाटक, गाण्याचा कार्यक्रम, भजनी मंडळ ही मनोरंजनाची माध्यमं आजही वापरात दिसतात. मुंबई-पुण्यात घोड्यांच्या शर्यतीचा रेसकोर्स हा श्रीमती खेळाचा आकर्षणाचा विषय आहे. इथे पूर्वी रेसकोर्स होतं, हत्तीची साठमारी, चित्त्याकडून किंवा सासण्याकडून शिकार हे चित्तथरारक खेळ खेळण्यासाठी.
आजही इथे म्हशी-रेडकांच्या शर्यती, बकऱ्यांच्या टक्करी, कोंबड्यांच्या झुंजी, कबुतरांच्या शर्यती, चिख्खल गुट्टा, पतंगाच्या स्पर्धा या पुरुषांच्या मनोरंजनाचा भाग बनतात. आज संगणकाच्या युगातही स्त्रियांच्या उखण्यांच्या स्पर्धा, फुगड्यांची स्पर्धा, पाककलेच्या-रांगोळीच्या स्पर्धा होतात. स्त्री-पुरुषांच्या भजनी मंडळांच्या स्पर्धाही रंगतात.
‘म्हशी’ हा इथे चर्चेचा विषय असतो. अत्यंत देखण्या, चकचकीत काळ्या म्हशीची लांबसडक शिंगं, शेपटीचे कातरलेले केस (मुद्दाम केलेल्या) कानाच्या नक्षीदार पाळ्या या गोष्टी त्यांना सौंदर्यस्पर्धेत बक्षीस मिळवून देणाऱ्या ठरतात.
अनेकांना माहीत नसेल पण इथे म्हशींच्या सौंदर्यस्पर्धा भरतात!
पण मुलींच्या सौंदर्यस्पर्धांना मात्र इथे उत्तेजन मिळाल नाही. सलवार-कमीज किंवा पंजाबीत वावरणाऱ्या मुली थोडीफार फॅशन करतील; पण थोडेसे अपवाद वगळले तर बहुतेकींना अजून जीन्स आणि शॉर्ट टी-शर्टकडे सरकता आलेलं नाही. अशा प्रयत्नांना घरांतूनही विरोध असतो. ‘ते आटलेल्या कापडाचं कपडं घालून फिरू नको’ अशी धमकीवजा सूचनाही इथे मिळते. इथल्या उच्चवर्गीयांच्या मुला-मुलींचा वावर असणारी कॉलेजेस ड्रेसकोचं समर्थन करणारी आहेत. कोल्हापूरबाहेरून आलेली मंडळी अशा नव्या फॅशनचा वापर करताना दिसली, तरी सार्वजनिक ठिकाणी पारंपरिक वेशभूषेला मिळतजुळत वागण्याचा दाब असतो.
वेशभूषेचा उठावदारपणा लग्नसमारंभात सगळीकडेच दिसतो, पण कोल्हापुरात दसऱ्याच्या शाही समारंभात तो आवर्जून पाहण्यासारखा असतो. लवाजम्यासह सीमोल्लंघनाला जाण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये फक्त कोल्हापुरातच शिल्लक राहिली असावी.
जुन्या राजवाड्यापसून आणि अंबाबाईच्या मंदिरातून निघालेल्या पालख्या, तोफगाडा, रणवाद्य, घोडे, उंट, संस्थानाचं पायदळ, शाहीर व पैलवानांचा ताफा, छत्र-चामरं, ध्वज, तलवारी-भाले, जरीपटका, मानकरी बँड, पोलीस आणि मिलिटरीचा बँड अशी भव्य लवाजम्याची मिरवणूक सूर्यास्तापूर्वी दसरा चौकात पोचते. शहरातील मान्यवर, प्रतिष्ठीतांसह नागरिकांच्या उपस्थितीत सोहळा सुरू होतो.
आजही ‘छत्रपती’ पोचल्यानंतर संस्थानाचं राष्ट्रगीत वाजतं, पूजाविधी होऊन बंदुकीच्या फैरी झडतात आणि लक्कडकोटातून आपट्याची पानं लुटण्यासाठी झुंबड उडते. त्यानंतर लोकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी राजा सर्वांना भेटतो. ही परंपरा आजही सुरू आहे. या समारंभात दरबारी पोषाख, जोधपुरी, बाराबंदी, तुमान, सुरवार, इराफी विजार अशा पांढऱ्या, मोती रंगाच्या कपड्यावर पगडी किंवा कोल्हापुरी थाटाचा जरीफेटा किंवा लहरी फेटा, त्याचा तुरा आणि शेला अशा ऐटीचं प्रदर्शनही घडतं.
या परंपरेची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवीची पालखी सीमोल्लंघनाहून परतताना दलीतवस्तीतून जाते. तो दिवस दिवाळीपेक्षा मोठा साजरा होतो, कारण जातीतील विषमतेची दरी संपवण्याची ही कृती म्हणजे परिवर्तनाचा मानबिंदू आहे.
छत्रपती शाहूंनी केलेले सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग हे आजही इथे घट्ट रुजून आहेत. इथे शहाण्णव कुळी, खानदानी वैगेरे बिरुदं लावणारी मंडळी असली, गावात बारा बलुते राहणाऱ्या स्वतंत्र गल्ल्या आणि स्वतंत्र विद्यार्थी वसतिगृहं असली, तरी इथली सामाजिक एकतेची वीण घट्ट आहे.
कोल्हापूरची कारागिरी
या ऐटीत फेट्याइतकंच महत्त्व आहे ते पायतणांना. कोल्हापुरी चपलेमध्येसुद्धा काही खास प्रकार आहेत ये त्यांच्या बांधणीनुसार. कुरुंदवादी, कापशी, दोनतळी, तीनतळी, विंचू (करकर वाजणारं) अशा वेगवेगळ्या चपला इथल्या ग्रामीण भागात तयार होतात. जनावराचं कातडं कमवण्यापासून चप्पल तयार करण्यामध्ये इथले कारागीर वाकबगार आहेत.
कारागिरीचा उल्लेख झाला म्हणून सांगितलंच पाहिजे, की इथे सोन्या-चांदीचे दागिने, मूर्तिकाम करणारे कारागीर आपली वैशिष्ट्ये जपणारी आहेत. पण उद्यमनगरमधले पॅटर्नमेकर आणि लहान लहान सुट्या भागांची निर्मिती करणारे कारागीर हे देशातल्या मोठ्या उद्योगांचे खरे आधार आहेत. पण अनेक यंत्रातील महत्वाच्या सुट्या भागांच्या निर्मितीचं साधं श्रेयसुद्धा त्यांना दिलं जातं नाही.
इथल्या गुऱ्हाळ घरामधला गुळव्या हासुद्धा असाच दुर्लक्षित राहिलेला. उसाच्या रसापासून गुळापर्यंत सर्व टप्प्यांची देखरेख करायची आणि अचूक वेळेला इंधनाचा ताव कमी करून काहील केव्हा उतरवायची, याचा निर्णय घेणारा हा ‘टेक्नॉलॉजिस्ट’.
साखर कारखान्यातील चीफ केमिस्ट आणि उद्योगाच्या मॅनेजरपेक्षा तसूभरही कमी नसणाऱ्या या कारागिराचा व्यवसाय हा अजून हाय-फाय व्यवस्थापन किंवा इंजिनिअरिंग कॉलेजात शिकवत नाहीत. गुळव्या, पॅटर्नमेकर, चांदी-सोन्याची आटणी काढणारा, कातडं कमावणारा, कोल्हापूर-मिरजेत तंतुवाद्य तयार करण्यासोबतच त्यातून अचूक सूर-ताल निश्चित करणारा, फेटे बांधणारा, तुतारी वाजवणारा, असे अनेक उपेक्षित कारागीर इथे आहेत आणि हाच इथला मनुष्यबळ आणि कौशल्यांशी निगडित असणारा कणा आहे.
वाद्यांवरून आठवलं. तुतारी वाजवणं हे कोण्या सोम्या-गोम्याला जमणार नाही. पण जोशपूर्ण वातावरण आणि ‘खच्चून स्वागत’ करणारं हे वाद्य इथे आजही वापरात आहे.
इथल्या ग्रामदेवतांशी निगडित असणाऱ्या यंत्रांमध्ये नदीचं पाणी देवळाच्या पायऱ्यांवर ओतण्याची आणि नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. पण त्या मिरवणुकीत किंवा पिराच्या (पंजे) मिरवणुकीत ‘पुईई-ढबाक’ हे स्पेशल वाद्य वापरलं जातं. ते तालविशिष्ट आहे. ‘डब-डबडब’ असा सततचा ताल आणि अतिशय छोट्या वाद्यातून निघणारा सूर यात असतो. हे अजब वाद्य नाचाची नशा चढवतं. त्याच्याशी डॉल्बी किंवा पाश्चिमात्य संगीत स्पर्धा करू शकत नाही.
‘जोतिबाची सासनकाठी’ नाचवणं आणि कडेपुरचे ताबूत हे इथलं वैशिष्ट्यही पाहण्यासारखं, अनुभवण्यासारखं आहे. त्यालाही वाद्याची साथ असते. एकूण काय, म्हशींच्या स्पर्धा ते सण, उत्सव, लग्नातला ‘गुगुळ’, लग्नानंतरचा जागर, गोंधळ किंवा यल्लमाचा लिंब या सर्वच ठिकाणी वाद्यांचा मेळ हा इथल्या समाजजीवनाशी झाला आहे.
जसं लहानपणी मारलेल्या उड्यांमुळे इथल्या माणसाचं रंकाळ्यावर प्रेम जडलं आहे, तसंच त्यांचं पंचगंगेवरही प्रेम आहे.
पोहायला सगळे इथंच शिकतात. याच पाण्यावर इथली समृद्धी अवलंबून आहे. पंचगंगेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथली माणसं कार्तिक पौर्णिमेच्या पहाटे नदीच्या घाटावरच्या सगळ्या पायऱ्या, देऊळ आणि दीपमाळेवर शेकडो दिवे प्रज्वलित करतात. संथ पाण्यात त्याचं प्रतिबिंब मावळणाऱ्या चंद्रबिंबासह दिसतं तेव्हा स्वर्ग अवतरतो. हे दृश्य आयुष्यभर लक्षात राहणारं असतं.
नदीचा घाट आणि त्या परिसरातील मंदिरं असं सगळं जसं अद्वितीय आहे, तशाच आणखीही काही बाबी आहेत. कळंब तलावातून कमानीवरून आलेला सायफन पद्धतीचा पाण्याचा पाट आणि पाण्याचा खजिना, रंकाळ्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून सव्वाशे वर्षांपूर्वी बांधलेल्या धुण्याच्या चाव्या, अंबाबाई-विठोबाचं मंदिर, साठमारी ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.
इथले पुतळे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण. घोड्याच्या दोन पायांवर उभा राहिलेला ताराराणींचा पुतळा त्यातला सर्वांत प्रेक्षणीय. ‘रेड्यांची टक्कर’ दाखवणारा पुतळा सुद्धा इथे आहे आणि इतिहासाच्या खुणा सांगणारे अनेक स्तंभही !
पुतळे बनवण्याची कौशल्य जपणारे आणि जगणारे पेंटर, रवींद्र मेस्त्री, वडणगेकारांपासून अनेक दिग्गज इथल्या मातीला आकार देणारे. अल्लादिया खांसाहेब, गोविंदराव टेंबे, केसरबाई केरकर, केशवराव भोसले, मंगेशकर कुटुंबीय, सुरेश वाडकर ते अलीकडच्या पिढीतील अभिजित कोसंबी ही मंडळी शास्त्रीय, नाट्य, सुगम संगीतातली मंडळी; लोकगीताच्या परंपरेतील हैदरसाहेब, शाहीद पिराजीराव सरनाईकापासून शिवशाहीर राजू राऊतसारखी खड्या बोलाची शाहीर मंडळी; वि. स. खांडेकर, रणजित देसाई, सुमती क्षेत्रमाडे, बाबा कदम, राजन गवस असे साहित्यिक आणि जगदीश खेबुडकरांसारखा कविमनाचा माणूस इथेच घडला.
एकूण काय, इथे काहीच कमी नाही. खाशाबा जाधवांसारखा ऑलिम्पिक वीराची परंपरा आजही वीरधवल खाडे, तेजस्विनी सावंत यांच्यासारखी इथली तरुण मुलं टिकवू पाहताहेत.
ताठ कणा
इथली माणसं स्वतःकडे जरा ताठ मानेनंच बघतात. आपल्याला इंग्रजी येणार नाही आणि बाहेरगावी आपलं जमणार नाही, असा न्यूनगंड त्यांच्यात डोकावतो. दुसऱ्याकडून शहाणपण ते सहज स्वीकारू शकत नाहीत. खरं तर बौद्धिक कुवत असूनही इथल्या माणसावर ‘खेडवळ’ असा शिक्का बसला आहे.
इथल्या माणसाला पुण्य-मुंबईचं खास आकर्षण नाही. आणि हो; इथून कुणी नोकरीसाठी बाहेर गेलं तरी दोन दिवसांसाठी तरी कोल्हापूरकडे त्यांचे पाय वळतातच. येतानाच प्लॅन होतो. ठरलेले मित्र, ठरलेल्या जागा, ठराविक जेवण! हे वर्षभराचं बॅटरी चार्जिंग असतं. अशी गावाकडे खेचुन आणण्याची ताकद इथल्या रश्शात असावी.
कोल्हापूर म्हटलं की महालक्ष्मी अंबाबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांचं स्मरण मराठी जनांना होतं. त्याशिवाय कोल्हापुरी गूळ आणि चपलेमुळे आमचं गाव कोल्हापूर महाराष्ट्राला नि देशाला परिचयाचं झालं आहे, पण कोल्हापूरची उर्वरित महाराष्ट्राशी नाळ पुरेशी जोडली गेलीय असं वाटत नाही. कोकणाची मुंबईशी जशी नाळ आहे तशी कोल्हापूरची थोडीफार कोकणाशी आहे; पण तसं ते स्वतंत्रच राहिलेलं दिसतं.
इथल्या प्रगतीसाठी व्हीजन असणारा खमका नेता कोल्हापूरला लाभला नाही. राजर्षी शाहूंच्या विकासकामाच्या महत्वपूर्ण टप्प्यानंतर ठळक असं इथे फारसं घडलेलं नाही. कोल्हापूरची हवा, निवांत जीवन आणि सुविधांची उपलब्धता यांमुळे कोल्हापूरबाहेरून हजारो मंडळी इथे स्थायिक झाली आहेत. स्थलांतर होऊन स्थायिक झालेले आता २५-३० टक्क्यांपर्यंत पोचले आहेत. मात्र इथले फारसे बाहेर जाऊन तिकडचे झाले नाहीत, हे या मातीचं वैशिष्ट्य असावं.
निर्वासित म्हणून आलेले सिंधी, मारवाडी, गुजराती, कानडी हे इथलेच झाले. लिमलेटच्या गोळ्या विकून जगणारे आता बाजारपेठेचा कणा ठरत आहेत. इथल्या पारंपरिक भेळीच्या गाड्यांशेजारी आज चायनीज, मेवाड कुल्फी, पाणीपुरी, कच्छी दाबेली, दावणगिरी डोसा, केरळी शहाळी यांच्या तांबड्या गाड्यांनी गर्दी केली आहे. इथली भेळ, मिसळ, उसाचा रस, आईस्क्रीम मात्र जिथल्या तिथेच राहिलं आहे.
इथल्या तरुणांना नोकरी किंवा व्यवसाय करायचा आहे, पण आपलं गाव सोडून जायचं नाही.
गावातच किंवा अगदी घराजवळ व्यवसाय किंवा नोकरी मिळावी, अशी मानसिकता त्यांना बाहेर जाऊच देत नाही. वडिलोपार्जित घराच्या वाटण्या करत करत ती लहान होताहेत. शिक्षणाच्या अभावामुळे रिक्षा, टेंपो, पानाची टपरी इतकीच त्यांची उडी मर्यादित राहते आहे.
खरं तर या गावाला आणि जिल्ह्याला साहित्यिक, गायक, चित्रकार, कवी, कारागीर, तंत्रज्ञ अशी मोठी परंपरा आहे, पण ती म्हणावी तितकी फोफावली नाही. याची कारणंही गुलदस्त्यात आहेत. आजही इथल्या प्रतिभेची पुसटशी जाणीव होते, पण क्षणभंगुर आनंदात हे सारं संपून जातं.
पण त्याची फिकीर फार कुणाला नाही. आपुलकी जपणारी, माणुसकी जपणारी इथली अघळपघळ माणसं आनंदाने, समाधानाने आणि ताठ कण्याने जगत आहेत. तेवढं त्यांना पुरेसं आहे.
लेखक : उदय गायकवाड कोल्हापूर (9822194393)
- महाराष्ट्र दर्शन या समकालीन प्रकाशन मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांची माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकासाठी उदय गायकवाड यांनी लिहलेला हा लेख समकालीन प्रकाशन व लेखक यांची परवानगी घेवून “बोलभिडू” साठी प्रकाशित करण्यात आला आहे.
पुस्तक खरेदीसाठी संपर्क :
- https://www.facebook.com/samakaleen/
- https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4679970979197401118?BookName=Maharashtra-Darshan
खूप विस्तृत लेख लिहला आहे. असाच लेख आमच्या अहमदनगर वर लिहा. बाकी तुमची भाषा एकदम रांगडी असते.
खूपच छान लिहता तुम्ही कृपया एखादी app तर काढा ओ…
आणि हो बोलभिडू फक्त फेसबुक वरच वाचता येते का तुमची लिंक नाही का काय???
नाद खुळा..
लई भारी.🙏🙏🌷🙏🙏
येक नंबर लेख लिहिला आहे, लई भारी 👌🏻👌🏻
Lai bhari lihalai , vachtana ur abhimanane aani dolay ashruni bharun aale .
या लेखाचे प्रिंट आऊट काढून सोनेरी चौकटीत भरून ठेवली पाहिजे .
लेखक कोल्हापूर चे आहेत काय ? असे विचारायचे कारण म्हणजे , बाहेर च्या माणसाला जसे त्रयस्ता सारखे स्वच्छ दिसते तसे पाहून लिहिल्या सारखे वाटते .
आपल्या लिखाणाचे कौतुक सार्या जगातून व्हावे अशी अपेक्षा व तशा शुभेच्छा .
खुप खुप धन्यवाद .
अप्रतिम खूप सुंदर लिहिलं आहे असेच कधी तरी साताऱ्यावर पण लिहा
लई भारी लेख लिवलायस भावा….! गावाकडची आठवण आली… हे अगदी खरं आहे. आम्हा कोल्हापूरकरांना जगाच्या कुठल्या बी कोपऱ्यात नेऊन टाकलं कान्हाई.. तरिबी खरं सुख समाधान कोल्हापुरातच मिळतंय…
ते नव्ह लेख लिवाय किती येळ लागला म्हणायचा???