जंजिरा थेट पाण्यात विसर्जित करण्याचा मास्टर प्लॅन कोंडाजींनी आखलेला होता….

डेरिंग काय असते आणि काय लेव्हलची असते याचं सगळ्यात खतरनाक उदाहरण म्हणजे कोंडाजी फर्जंद. घुसायचं तर पूर्ण प्लॅन करून घुसायचं आणि एक दोन सैनिक नाही मारायचे तर थेट सगळा जंजिरा किल्लाच पाण्यात विसर्जित करायचा असा मास्टरप्लॅन कोंडाजी बाबा फर्जंद यांनी आखला होता. त्याकाळात हे वेडं धाडस करणं म्हणजे लोकं थट्टा करतील किंवा जीव जाईल अश्या सगळ्या गोष्टींना बाजूला सारत कोंडाजी फर्जंद यांनी जीव तळहातावर घेऊन जंजिरा मोहीम हाती घेतली होती.

कोंडाजी फर्जंद यांनी ते छत्रपती संभाजी राजांशी फितूर झाल्याचे नाटक केले. कोंडाजी फर्जंद तेव्हा जंजिऱ्याचा त्यावेळचा किल्लेदार सिद्दी याला जाऊन भेटले.

मुरुड जंजिरा वरील आक्रमण

ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता.

जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे. कोकणातील बायका पाळावयाचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराज्याकडे आले, आपले संकट त्यांनी राजांना सांगितले. हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजी राजे खूप क्रोधीत झाले.

त्यांनी जंजिरेकर सिद्धांच्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. पण त्यांना माहित होते कि जंजिरा सरळ लढाईत जिंकणे अवघड होते, कारण खवळलेला समुद्र त्या जंजिर्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले कि या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे.

याच बेतासाठी त्यांनी बोलावणे धाडले कोंडाजी फर्जद यांना. संभाजी राजांनी कोंडोजी च्या कानात आपला बेत सांगितला. आणि मग निघाले कोंडाजी आपल्या सोबतीला ४० / ५० मावळे घेवून आणि थेट जंजिऱ्याच्या सिद्धी समोर आले, आणि त्यांनी सिद्धीला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली. सिद्धी ला आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला. कारण शंभू राजांचा एक शूर मावळा त्यांना येवून मिळाला होता. सिद्धीने त्यांना आपली चाकरी दिली. आणि मग काय, कोंडाजी सिद्धी ची सेवा करू लागले. पण त्या कोंडाजी च्या काळजात वेगळाच डाव होता, त्याच्या शंभू राजांचा. कोंडाजी चे मन मात्र शंभू राजांकडे होते.

संभाजी महाराजांनी कोंडाजी ला सांगितलेला डाव असा होता कि जंजीऱ्याचा सगळा दारू गोळा उडवून द्यायचा. आणि याच धाडसी डावासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावळ्यांना जंजीऱ्यात पाठवले होते. दिवस ठरला, सुरुंग पेरले गेले, कोंडोजी फर्जदांचे साथीदार दर्यात गलबते घेवून उभे होते. कोंडोजीची बायको सुद्धा बरोबर निघाली, पण तिचा एक आग्रह होता, तिची एक दासी होती, त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.

कोन्डोजींकडे वेळ नव्हता, त्यांनी बायकोची मागणी मान्य केली,मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली कि मी माझे कपडे व काही सामान बरोबर घेवून येते. ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि ती थेट सिद्धी च्या दरबारा कडे गेली. सिद्धी ला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले, जंजीऱ्या वरचे सगळे मराठे कापले गेले.

पण त्यातला एक मराठा सरदार कसाबसा वाचला होता. त्याने जंजीऱ्या वरून खवळलेल्या समृद्रात उडी मारली आणि आपला जीव मुठीत घरून किनार्याच्या दिशेने पोहू लागला. कशासाठी ? जीव वाचवण्यासाठी नाही. तो पोहोत होता संभाजी राजांना घडलेल्या दुखःद घटनेची माहिती देण्यासाठी. कारण संभाजी महाराज वाट बघत होते कोंडोजी चा डाव यशस्वी होण्याची. अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोहोचला. त्याने घडलेली हकीकत शंभू राजांना सांगितली.

तसा शंभू राजांना फार मोठा धक्का बसला. कोंडोजी फर्जद हे एक शूर आणि थोर सरदार तर होतेच पण त्याहून जास्त म्हणजे शंभू राजांना ते खूप जवळचे होते. राजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण राजाला भावनाविवश होवून चालत नाही. शंभू राजांनी ठरवले कि कोंडोजी चे बलिदान सार्थकी लावायचे. त्यांनी वीस हजाराची सेना आणि तीनशे गलबते घेवून राजांनी जंजीऱ्यावर आक्रमण केले. आणि मग कडाडले संभाजी राजे, डागा तोफा किल्ल्यावर.

मग मात्र किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरु झाल्या. मराठ्याच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. सिद्धीचा शिशमहाल चकणाचुर झाला होता. पण ऐन वेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले. पण शंभू राजे थांबले नाही. त्यांनी ठरवले कि समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरु झाले, सेतू आकार घेवू लागला. मराठ्यांच्या तोफांचा सुरु होताच.

पण मग मात्र औरंगजेबाने डाव साधला, त्याला कळून चुकले कि जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजी राज्याची सत्ता येईल. औरंग्याने हसन आली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगझेबाचा सरदार ४० हजाराची फौज घेवून कल्याण-भिवंडी च्या मार्गे रायगड च्या दिशेने येवू लागला होता. त्यामुळे नाईलाजास्तव ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले.

जंजिरा शंभू राजांच्या हातून गेला पण किल्ला हरण्याचं दुःख राजांना नव्हतं तर आपला निष्ठावंत मावळा कोंडाजी फर्जंद धारातीर्थी पडले याचं मोठं दुःख राजांना झालं. आज ही पराक्रम म्हणजे काय असतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे थेट किल्ल्यातच सुरुंग पेरून किल्लाच विसर्जित करायचा हे कोंडाजी फर्जंद यांचं केवढ मोठं धाडस होतं….!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.