लग्नसमारंभासाठी किल्ले भाड्याने देण्यात काय चूक त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल : उदयनराजे.
आजच्या इंडियन एक्स्प्रेसच्या पुणे आवृत्तीमध्ये भाजपचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांची मुलाखत छापून आली आहे. या मुलाखतीमध्ये बोलताना उदयन महाराज यांनी अनेक अडचणीच्या प्रश्नांना बगल न देता थेट उत्तरे दिली.
पण सर्वांत मोठ्ठी चर्चा सुरू झालेय ती महाराष्ट्र शासनाने गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावर उदयनमहाराजांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल,
गडकिल्यांसबधीत प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले,
लग्नसमारंभासाठी किल्ले भाड्याने देण्यात काय चूक आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल.
उदयनराजेंच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांना नेमका काय प्रश्न विचारण्यात आला ते आपण पाहूया.
शिवकालीन किल्ले लग्नासाठी व इतर इव्हेंटसाठी भाड्याने देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर प्रश्न विचारण्यात आला.
तेव्हा उदयनराजे म्हणाले,
“त्यात चुकीचे काय आहे? माध्यमांनी त्याला चुकीचे वळण दिले. माझे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांच्याशी या संदर्भात बोलणे झाले. तेव्हा त्यांनी मला पूर्ण प्लॅन समजावून सांगितला. सरकारचे धोरण आहे की किल्ल्यावरील देवळासमोरील भाग लग्नासाठी उपलब्ध करून द्यायचे. यात चुकीचे काय आहे? देवळात लग्न होत नाहीत का? उलट ही आपली मोठी परंपरा आहे. आणि लक्षात घ्या विविध देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर चालते. जर आपण आपले किल्ले पर्यटनासाठी उपलब्ध केले तर त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल. “
याच उत्तराला अनुसरून उदयनराजेना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला की तुमच्यावर टीका होते की शिवाजी महाराजांचे वंशज व खासदार असूनही तुम्ही किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काही केले नाही किंवा शिवकालीन किल्ल्यांच्या दुरवस्थेबाबत कधी आवाज उठवला नाही.
यावर उदयन राजे म्हणाले,
“कोण म्हणत मी किल्ल्यांच्या स्थिती बद्दल आवाज उठवला नाही. हे किल्ले चारशे वर्ष जुने आहेत. त्यांच्या डागडुजीसाठी निधीची आवश्यकता आहे. रायगड प्राधिकरणासाठी ८०० कोटी निधी मंजूर झाला आहे. पण हे प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी बरेच वर्ष लागतील. काही वेळा विलंब होऊ शकतो. नुकताच झालेल्या कोल्हापूर, सांगली महापुरावेळी सरकारला आपला निधी तिकडे वळवावा लागला होता. “
मुलाखतीत अन्य प्रश्न देखील विचारण्यात आले ते खालील प्रमाणे होते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये तुमचे बहुमत घटले, तुमची लोकप्रियता परत मिळवण्यासाठी तुम्ही खासदारकीचा राजीनामा दिलात का? तेव्हा उदयनराजेंनी विक्रमी मताधिक्य हे प्रत्येक उमेदवारच स्वप्न असते तसे ते माझेही स्वप्न आहे पण ही गोष्ट मी मतदारांच्या हातात सोपवली आहे असे सांगितले.
उदयन महाराजांना आठवण करून देण्यात आली की अगदी काहीच दिवसापूर्वी राष्ट्रवादीकडून खासदार बनल्यावर त्यांनी EVM मशीनवर शंका उपस्थित केली होती व बॅलेट पेपरवर निवडणुक घेण्याची मागणी केली होती अजूनही ही ते याच मुद्द्यावर ठाम आहेत का ?
तर यावर बोलताना राजेंनी सांगितलं की,
“मी EVM बद्दल वक्तव्य केले होते हे मी नाकारणार नाही. पण मी विचार केला की आघाडी सरकारच्या काळात मी माझ्या मतदारसंघासाठी काही करू शकलो नव्हतो. त्यांनी माझे मोठे मोठे प्रोजेक्ट अडवून ठेवले होते. पण उलट गेल्या पाच वर्षात विरोधातल्या फडणवीस सरकारने माझी १५ हजार कोटींची कामे मंजूर केली. जर एवढी कामे होते असतील तर तक्रार करण्यास वावच नाही. म्हणून मी EVM बरोबर आहे. भाजप शिवसेना सरकार सोबत आहे.”
सविस्तर मुलाखतीसाठी क्लिक करा.