मोदींच्या ‘टुकड़े-टुकड़े गॅंग’ च्या आरोपांना तोंड देणारे अधीर रंजन चौधरी कोण आहेत
आज लोकसभेत मोठी जुगलबंदी पाहायला मिळाली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले. याशिवाय यावेळेस देखील मोदींनी नेहरूंवर टिका करायला विसरले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कोरोना, रोजगार, अर्थव्यवस्था अशा प्रत्येक मुद्द्यावर बोलतांना त्यांनी काँग्रेसवर थेट हल्लाबोल केला. मोदी म्हणाले की, देशातील जनतेने तुम्हाला ओळखले आहे. एवढी प्रवचने देऊन तुम्ही विसरलात की तुम्हालाही इथे पन्नास वर्षे बसण्याचे भाग्य लाभले. नागालँडने काँग्रेसला मतदान करून जवळपास २४ वर्षे झाली आहेत. २८ वर्षांपासून गोव्याने तुम्हाला स्वीकारले नाही, असं म्हणत मोदींनी त्रिपुरा आणि ओडिशा तसेच अनेक राज्यांमधील मागील काँग्रेस सरकारची आठवण करून दिली.
सरकारच्या प्रत्येक योजनेला विरोध करत असल्याचा आरोप मोदींनी केला. तुम्हाला देश स्वावलंबी का बनवायचा नाही, तुम्हाला गांधीजींची स्वप्ने पूर्ण होताना बघायची नाहीत का ? इतरांना अपमानित करण्यासाठी तुम्ही दररोज महात्मा गांधींचे नाव घेता. पण त्याच्या स्वदेशीची पुनरावृत्ती करण्यात तुम्हाला अडचण आहे.
तसंच त्यांनी काँग्रेसला एक सणसणीत टोमणा हाणला कि, एवढ्या पराभवानंतरही त्यांचा अहंकार सुटत नाही. देशातील जनता त्यांना कायम नाकारत आली आहे. प्रश्न निवडणुकीच्या निकालाचा नसून हेतूचा आहे. उत्तर देणे ही आपली मजबुरी असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांनीही काव्यात्मक शैलीत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
याशिवाय मोदींनी मोठे आणि गंभीर आरोप केलेत –
- देशात कोरोना पसरवण्यासाठी काँग्रेस जबाबदार.
- महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना वाढविण्याचं काम केलं
- काँग्रेसने मुंबईतून मजुरांना हाकलवून लावलं
- फुकट तिकिटं वाटत मुंबई सोडायला भाग पडलं.
- गांधीजींचं स्वप्न पूर्ण झालेलं काँग्रेसला पाहावत नाही
- कोरोना संकटातही काँग्रेसला पवित्र काम करता आलं नाही
- काँग्रेसनं १०० वर्ष सत्तेत न येण्याचं ठरवलंय.
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे.
“ज्या काळात जागतिकीकरण नव्हतं, जागतिक गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेल्या नव्हत्या त्या काळात नेहरु म्हणाले होते की, कोरियातील लढाईचा परिणाम हा आपल्या देशातील महागाईवर होतोय. कोरियातील युद्धामुळे आपल्या देशातील वस्तुंच्या किंमती वाढतात आणि त्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातात. देशाचे पहिले पंतप्रधान नेहरुंनी देशातील महागाईची जबाबदारी झटकली होती.”
“जर अमेरिकेमध्ये काही झालं तर त्याचा परिणामही आपल्या देशाच्या महागाईवर होतोय. पण आमच्या सरकारने कोरोना काळातही महागाईचा दर हा ५.२ टक्क्यांवर नियंत्रित ठेवलं. कॉंग्रेसच्या काळात जर कोरोनाची परिस्थिती असती तर त्यांनी महागाईची जबाबदारी ही कोरोनावर ढकलली असती आणि आपले हात झटकले असते.” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आधीही अनेक वेळा जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली आहे.
इतकंच नाही तर, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवला. काँग्रेस विभाजनाचे राजकारण करते, काँग्रेस पक्ष हा तुकडे टुकडे टोळीचा लीडर बनला आहे. हीच काँग्रेसची परंपरा आहे, जी इंग्रजांकडून वारसाहक्काने मिळाली आहे.
मग काय विरोधक पेटून उठले….यात आघाडीवर होते काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी…
मोदींच्या आरोपानंतर विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आपल्या जागेवरून विरोध करत उभे राहिले. यावर मोदींनी त्यांचाही खरपूस समाचार घेतला. पण अधीर रंजन चौधरी यांनी माघार घेतली नाही त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्यांनी सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली.
मोदींनी त्यांची खिल्ली उडवत म्हणाले कि, या अधिवेशनात तुम्हाला कोणीही बाहेर काढणार नाही. मी तुम्हाला हमी देतो. मोदींच्या या मुद्द्यावर दोन्ही पक्ष आणि विरोधक हसले. यावर अधीर रंजन चौधरी म्हणाले- आम्ही जनतेतून निवडून आलो आहोत. यावर मोदी म्हणाले- ठीक आहे. या ठिकाणाहून बाहेर पडण्यासाठीच तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे.
पण लोकसभेत थेट मोदींना नडणारे अधीर रंजन चौधरी कोण आहेत ?
चौधरी यांना मुर्शिदाबादचा राजकुमार म्हणत. १९९१ च्या निवडणुकीची मतमोजणी चालू होती. प्रथमच निवडून आलेले अधीर हे सत्ताधारी पक्षाच्या सीपीएमच्या उमेदवाराला चांगलीच टक्कर देत होते. मतदानाच्या दिवशी ते परिसरात फिरत होते. त्यानंतर शेकडो सीपीएम समर्थकांनी त्यांना घेराव घातला. बंदुकीच्या धाकावर त्यांना तासन्तास ओलीस ठेवले होते. निकाल आल्यावर अधीर चौधरी यांचा अगदी जवळच्या फरकाने पराभव झाला होता. पण त्यांच्या परिसरात त्यांच्याबद्दल सहानुभूती होती. ठिकठिकाणी डाव्यांच्या वर्चस्वाच्या विरोधात त्यांनी आपापल्या परीने मोर्चे काढण्यास सुरुवात केली.
१९९६ च्या बंगालच्या विधानसभा निवडणुका होणार होत्या. पक्षाध्यक्ष सोमेन मित्रा यांनी येथील नबाग्राम मतदारसंघातून चौधरी यांचे नाव पुढे केले. जे गेल्या विधानसभा निवडणुकीत अगदी जवळच्या फरकाने पराभूत झाले होते. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या नावाला विरोध केला. पण डोमेन मित्रा त्यांच्या निर्णयावर ठाम होते. चौधरी यांना पुन्हा तिकीट मिळाले आणि ते जिंकून देखील आले…. मुर्शिदाबादमधून पाच वर्षांतच त्यांनी डाव्यांची हकालपट्टी केली. तीन वर्षांनी बेरहामपूरमधून लोकसभेचे तिकीट मिळाले तिथे देखील हा नेता जिंकून आला. एकदा नव्हे तर सलग पाच वेळा….त्यांचं नाव म्हणजे अधीर रंजन चौधरी !
उत्तर बंगालमध्ये मालदा आणि मुर्शिदाबाद हे काँग्रेसचे गड मानले गेले ते चौधरी यांच्याचमुळे.
१९९९ पासून बंगालमधील बेरहामपूरचे प्रतिनिधित्व करणारे चौधरी हे एकमेव काँग्रेस खासदार आहेत.
सलग पाच वेळा खासदार राहिलेले अधीर रंजन चौधरी यांना काँग्रेसने लोकसभेतील पक्षनेतेपदी नेऊन बसवलं.
चौधरी हे काँग्रेसच्या बंगाल युनिटचे अध्यक्षही राहिले आहेत. काँग्रेसने २०१४ मध्ये राज्यातील ४२ लोकसभेच्या ४ जागा जिंकल्या होत्या. यावेळी केवळ चौधरी यांनाच आपली जागा राखता आली होती. मागील लोकसभेत काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा यावेळी पराभव झाला. यापूर्वी या पदासाठी काँग्रेसच्या तीन नेत्यांची नावे चर्चेत होती. पण यात अधीर रंजन चौधरी यांचंच नाव अग्रक्रमाने होते. चौधरी हे पश्चिम बंगालच्या प्रदेशाध्यक्षांसह ते केंद्रात मंत्रीही राहिले आहेत. ते तळागाळातील नेते मानले जातात पण लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांच्यासोबत न जुळल्याने त्यांना पक्षाध्यक्षपद सोडावे लागले होते.
दुसरीकडे, ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती. काँग्रेसने सातत्याने अधीर यांना पुढे केले. २०१२ मध्ये ममता यांनी काँग्रेसशी संबंध तोडले तेंव्हा सोनिया गांधींनी अधीर यांना पहिल्यांदा रेल्वे खात्याचे राज्यमंत्री केले होते आणि त्यानंतर त्यांना लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केले.
हे हि वाच भिडू :
- सिद्धूऐवजी चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यामागे काँग्रेसचं नेमकं कारण काय?
- आंबेडकरांनी रमाईला लिहिलेली पत्रं वाचून वाटतं…असं असलं पाहिजे प्रेम
- भारतीय म्हणतायेत, ‘ह्युंदाईला आता टाटा म्हणायची वेळ आलीये’