अक्षय कुमार करणार सरसंघचालकांचा रोल ! नव्या चित्रपटाची चर्चा !!!
भारतीय चित्रपटात देशभक्त भूमिका साकारणं हे सर्वात कठिण काम. गेल्या काही दशकांपुर्वी मनोज कुमार या अभिनेत्यानं हे काम उत्तम निभावलं. अधल्या मधल्या काळात राज कुमारने गेंडा स्वामीच्या बॉम्बच्या बत्यागुलं करत देशभक्तीचा प्रयत्न केला, त्यानंतरच्या काळात सनी देओल नामक यंत्रमानवाने गरिबांच्या मुलांना रॉ चं एजंट व्हायचं उत्तम प्रशिक्षण दिलं मात्र मनोज कुमारचा आम देशभक्त माणसाचा रोल यापैकी कोणीच उत्तमरित्या पेलू शकले नाही.
पहिल्यापासूनच कॉमन मॅन ठरलेल्या अक्षय कुमारनं आपल्या देशभक्तीची चुणूक नमस्ते लंडन मध्ये, “तुमची आर्मी मोठ्ठी का आमची आर्मी मोठ्ठी” अस सांगत दाखवली. त्यानंतर खट्टा मिठ्ठा, स्पेशल २६, जॉली एल.एल.बी २, एअरलिफ्ट, रुस्तूम, पॅडमॅन असे अनेक पिक्चर करत मीच खरा मनोज कुमारचा वारसदार म्हणत देशभक्तीवर नाव कोरलं. झालेली हिच इमेज सार्थ ठरवत अक्षय कुमार नव्या पिक्चरमधून पदार्पण करणार आहे. आत्ता यात सांगायचं विशेष कारण अस की हा पिक्चर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आधारित असणार आहे अस कानावर येतय.
बाहूबलीचे लेखक सम्राट विजयेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आधारित कथा लिहली असून सध्या ते या सिनेमाच्या रिसर्चचं काम करत आहेत. माजी सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेगडेवार, माधव गोलवलकर गुरूजी यांच्या कार्यावर हा आधारित हा चित्रपट असणार आहे. बिग बजेट अस या सिनेमाचं स्वरुप असून सुमारे १०० कोटी बजेट ठेवण्यात आल्याची माहिती आमच्या सुत्रांनी दिली असली तरी कॉस्चुमचा खर्च मर्यादेत होईल अशी टिप्पणी एकाने केल्याचे समजते.
लाहरी रेकार्डिंग कंपनीचे मालक व कर्नाटकातील भाजप नेते जी. तूलसीराम नायडू आणि त्यांचे बंधू जी. मनोहर नायडू हे दोघे मिळून हा सिनेमा प्रोड्यूस करणार आहेत.
आत्ता अत्यंत महत्वाचं म्हणजे, या सिनेमाची प्रेरणा बाळासाहेब ठाकरेंवर आधारित येवू घातलेल्या ठाकरे या सिनेंमाकडे पाहून मिळाल्याची चर्चा असून ठाकरे सिनेमास काऊंटर करण्यासाठी हा सिनेमा घेवून येत असल्याचं सांगितल जात आहे. दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अक्षय कूमार कडून याबाबत अजून काहीच सांगण्यात आलं नसलं तरी त्याच्या मागील फिल्म पाहता तोच हा फिल्म करु शकतो यावर बाहेरून पाठिंबा आला आहे.