अमिताभ बच्चननं ग्लास फेकला आणि त्याचं विनोद खन्नासोबत भांडण असल्याच्या चर्चा सुरू झाल्या…
हिंदी सिनेमाच्या इतिहासात नायक – नायिकांची जोडी हा विषय सुरुवातीपासूनच खूप महत्त्वाचा आहे. या दोघांमधील जुळलेल्या केमिस्ट्रीमुळे चित्रपटांच्या यशाला साहजिकच हातभार लागायचा आणि त्यामुळे ही जोडी रुपेरी पडद्यावर आणि पडद्याच्या बाहेर खूप फेमस असायची.
पन्नासच्या दशकामध्ये राजकपूर आणि नर्गिस यांच्या जोडीने रुपेरी पडदा गाजवून ठेवला होता. यानंतर दिलीप कुमार – वैजयंतीमाला, देवानंद – वहिदा या जोड्यादेखील तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय झाल्या होत्या.
दिलीप कुमार आणि मधुबाला यांची जोडी पडद्यावर आणि पडद्याच्या बाहेर जमली होती. दिलीपनं मधुबालावरील प्रेमाची कबुली भर कोर्टात दिली होती. मधुबालाच्या अब्बाजान यांनी विरोध केला नसता तर तीच दिलीपची अर्धांगिनी बनली असती. असलाच काहीसा प्रकार सुरय्या आणि देवआनंद यांच्या प्रेम कहाणीचा झाला. दोघे आकंठ एकमेकांच्या प्रेमात रंगले होते. सुरैय्याच्या आजीने या प्रेम प्रकरणाला विरोध केला आणि सुरैय्या आयुष्यभर अविवाहित राहीली! देवआनंदने मात्र १९५४ साली कल्पना कार्तिक सोबत ‘टॅक्सी ड्रायव्हर’ च्या सेटवर लग्न उरकून घेतले!
साठच्या दशकात शशी कपूर आणि नंदा ही जोडी लोकप्रिय राहिली. तर सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी राजेश खन्ना – मुमताज, धर्मेंद्र- हेमामालिनी, अमिताभ- रेखा या जोड्या प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची पडद्यावरची केमिस्ट्री अफलातून होती.
नायक नायिकांच्या जशा जोड्या सिनेमात शोभून दिसायच्या, तशाच दोन नायकांच्या जोड्या देखील शोभून दिसायच्या.
धर्मेंद्र आणि अमिताभ, अमिताभ आणि शशी कपूर, अमिताभ आणि विनोद खन्ना या जोड्या सत्तरच्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस ज्यावेळी अमिताभ आणि रेखा यांचे प्रकरण मीडियामध्ये खूप गाजत होते, त्यावेळी एका पत्रकाराने कुजकटपणे जया भादुरीला एक प्रश्न विचारला “अमिताभ बच्चन यांची जोडी सध्या पडद्यावर कुणासोबत जास्त शोभते असे तुम्हाला वाटते?” त्यावेळी जया भादुरीने त्याला तसेच मार्मिक चपखल उत्तर दिले, “शशी कपूर सोबत!”
बरोबर आहे शशी कपूर सोबत अमिताभ बच्चन त्यावेळी अनेक चित्रपटातून रसिकांच्या समोर येत होते. तब्बल नऊ चित्रपटातून यांनी एकत्र भूमिका केल्या होत्या.
अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना ही जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडत होती. दोघेही हँडसम, डॅशिंग, ॲक्शन आणि इमोशनवर भर देणारे! हे दोघे सुनील दत्त यांच्या ‘रेश्मा और शेरा’ या सिनेमातून पहिल्यांदा एकत्र आले. पण मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांनी या दोघांना ज्या चित्रपटातून एकत्र आणले ते जबरदस्त हिट झाले.
रेश्मा और शेरा, जमीर, खून पसीना, हेरा फेरी, परवरीश, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अँथनी… या सिनेमातून ते प्रेक्षकांच्या पुढे आले. अमिताभला टक्कर देवू शकणारा एकमेव अभिनेता अशी विनोद खन्नाची इमेज बनली होती. अमिताभच्या सुपरस्टार पदाच्या खुर्चीला सुरुंग विनोद खन्ना लावू शकतो अशा बातम्या सिनेमासिकात येत होत्या. या दोघात कोल्ड वॉर चालू आहे अशी ही कुजबूज ऐकू येत असे.
आणि अशाच वातावरणात एक प्रसंग घडला ज्याची खमंग चर्चा गॉसिप्स मॅगझीन मध्ये चालू राहिली.
अमिताभ बच्चन आपल्या ब्लॉगमधून आपल्या जुन्या आठवणींना कायम उजाळा देत असतात. एका ब्लॉगमध्ये त्यांनी विनोद खन्ना सोबतच्या त्या घटनेचा एक किस्सा सांगितला आहे. त्या काळात गॉसिप्स मॅगझिन मधून या दोघांमध्ये भांडण कसे लागतील असे मटेरियल छापून येत होते.
प्रकाश मेहरा यांनी १९७८ साली ‘मुकद्दर का सिकंदर’ हा चित्रपट बनवला होता. शरदचंद्र चटर्जी यांच्या गाजलेल्या ‘देवदास’ या कथानकालाच काहीसा मॉडर्न टच देऊन चित्रपटाचे कथानक तयार झाले होते. या सिनेमात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, राखी, रेखा, अमजद खान यांच्या भूमिका होत्या. या सिनेमात प्रेमाचा त्रिकोण होता. अमिताभ बच्चन मनोमन राखीवर लहानपणापासून प्रेम करत असतो. पण राखीचे प्रेम विनोद खन्नावर असते.
या चित्रपटात एक गाणे होते ‘प्यार जिंदगी है…’ महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी गायलेले हे गाणे चित्रीत होत असतानाचा हा किस्सा आहे.
या गाण्यात राखी आणि विनोद खन्ना प्रेमात गुंग होऊन हे गाणे गात असतात. हॉटेलमधील डान्स क्लब मध्ये नाच करत हे गाणे गात असतात. अमिताभ बच्चन आपले हरलेलं प्रेम तिथे पाहत असतो. आपल्या डोळ्यासमोर आपली ‘माशुका’ दुसऱ्याच्या गळ्यात हात टाकून नाचते आहे हे त्याला सहन होत नाही. दारूच्या नशेमध्ये तो दारूचा काचेचा ग्लास विनोद खन्नाला फेकून मारतो असा शॉट होता.
दोन-तीन रिहर्सलनंतर अमिताभने टेक देताना तो ग्लास जोरात फेकून विनोद खन्नाला मारला. हा ग्लास फेकताना त्याच्या उंचीचा आणि वेगाचा अंदाज न आल्यामुळे तो ग्लास सरळ विनोद खन्नाच्या चेहऱ्यावर थाडकन जाऊन लागला आणि विनोद खन्नाच्या चेहऱ्यावर फुटला.
काचा त्याच्या चेहऱ्यात घुसल्यामुळे त्याच्या गालातून रक्ताच्या धारा सुरू झाल्या. अमिताभने पळत पळत जाऊन त्याने रुमालाने ती जखम दाबली आणि रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला.
लगेच त्याला आपल्या गाडीत टाकून तो जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. हॉस्पिटलमध्ये जाताना तो कायम ‘सॉरी सॉरी’ असे म्हणत होता. त्याच्याकडून मुद्दाम म्हणून ही कृती झालीच नव्हती. नैसर्गिक अभिनयातून हा प्रसंग घडला होता.
विनोद खन्ना देखील हसत हसत त्याला ‘डोन्ट वरी इटस ओके..’ असे म्हणत होता.
रात्रभर अमिताभ विनोद खन्नाच्या उशाशी बसून होता. काही दिवसात जखम भरून आली आणि पुन्हा शूट सुरु झाले.
त्या काळातील गॉसिप्स मॅगझिननी या प्रकरणाला दुसरेच वळण देऊन अमिताभने मुद्दामच विनोद खन्नाला जखमी केले का? अशा बातम्या येऊ लागल्या. अर्थात दोघांनाही या प्रकरणाची पूर्णपणे माहिती असल्याने त्यांच्यात त्या काळी वितुष्ट आले नाही पण योगायोगाची गोष्ट म्हणजे या सिनेमानंतर अमिताभ आणि विनोद खन्ना एकाही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत!
- भिडू धनंजय कुलकर्णी
हे ही वाच भिडू:
- तर ‘बॉम्बे टू गोवा’मध्ये अमिताभ बच्चनच्या जागी आपल्याला राजीव गांधी दिसले असते…
- एक मित्र म्हणाला, “तू जया भादुरीसारखी दिसते” आणि मग स्मिता चित्रपटसृष्टीत आली.
- विनोद खन्नाच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी “अचानक” झाल्या होत्या.