आणि यानंतर जयदेव ठाकरे यांचे ठाकरे कुटुंबियांसोबतचे संबंध फाटत गेले
दसरा मेळावा आणि शिवसेना हे वेगळं करता येणार नाही. मात्र यंदाचा दसरा मेळावा गाजला तो शिवसेनेतील बंडामुळे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडला तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बीकेसी मैदानावर दसरा मेळावा पार पडला.
या दोन्ही मेळाव्यात कुठले नेते हजेरी लावतात याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. मात्र जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी उपस्थित लावली. तसेच यावेळी त्यांनी भाषण सुद्धा केले.
बीकेसी मैदानावर बोलतांना जयदेव ठाकरे म्हणाले की,
आम्ही ठाकरे काही लिखीत घेऊन येत नाही. एकनाथ माझ्या खूप आवडीचा आहे. आता मुख्यमंत्री झालाय, मला एकनाथ राव बोलावं लागेल. पाच सहा दिवस झाले. मला एक एक फोन येत आहेत. आहो, तुम्ही शिंदे गटात गेला आहात का? हा ठाकरे कुणाच्या गोटात बांधला जात नाही.
शिंदे यांनी दोन चार भूमिका घेतल्या, त्या मला आवडल्या. असा धडाडीचा माणून महाराष्ट्राला हवा आहे. त्यामुळे मी म्हणून शिंदेंच्या प्रेमासाठी मी इथं आलो आहे. आपला एक इतिहास आहे. चिपळ्या वाजवणारा एकनाथ आणि मध्यंतरीचा एकनाथ. त्यांना जवळच्यांनीच संपवलं. एकनाथ एकटं पाडू नका. हा एकटा नाथ होऊ नका… हा एकनाथचं राहू द्या… ही तुम्हा सर्वांना विनंती आहे, असे जयदेव ठाकरे म्हणाले. सर्व बर्खास्त करा, राज्यात पुन्हा निवडणुका घ्या… राज्यात पुन्हा शिंदे राज्य येऊ द्या, असे जयदेव ठाकरे यावेळी म्हणाले.
यानंतर प्रश्न पडतो की, बाळासाहेब ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव असणारे जयदेव ठाकरे यांचे कुटुंबियांशी कसे फाटत गेले?
बाळासाहेब ठाकरेंचं लग्न झालं ते सरला वैद्य यांच्याशी. जून १९४८ मध्ये २१ वर्षांचे बाळ ठाकरे यांनी सोळा वर्षांच्या सरला वैद्य यांच्याशी विवाह झाला. माहेरच्या सरला वैद्य सासरी येवून मिनाताई झाल्या. बाळासाहेब व मिनाताईंना तीन मुलं. सगळ्यात थोरले बिंदुमाधव, मधले जयदेव ठाकरे आणि धाकटे उद्धव ठाकरे.
बिंदुमाधव यांना ‘बिंदा’ या टोपन नावानेच ओळखलं जायचं. त्यांनी कधीही सक्रिय राजकारणात येण्याचा कल दाखवला नव्हता. सुरुवातीला त्यांनी स्वत:ची व्हिडिओ कंपनी सुरू केली आणि नंतर फीचर फिल्म्सच्या निर्मितीकडे वळले. ‘अग्निसाक्षी’ या चित्रपटाच्या निर्मितीतून ते प्रकाशझोतात आले होते.
जयदेव ठाकरे हे मुंबईतील प्रसिद्ध रुईया महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी. धूम्रपानाचे पाईप जम करणे आणि काळ्या कॅनव्हासवर चित्रे काढणे असे त्यांचे छंद आहेत. तसेच काष्ठशिल्प कलाही शिकून घेतली होती. मात्र त्यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कधीच पटले नाही.
मीनाताईंच्या मृत्यूनंतर ठाकरे परिवारात फूट पडायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
मातोश्रीवर सत्तेचे एक नवेच केंद्र उदयाला आले. जयदेव यांची पत्नी स्मिता. मात्र त्यापूर्वी पासून बाळासाहेब ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यात वादाची ठिणगी पडली ती जयदेव यांनी पहिल्या पत्नीशी घेतलेल्या घटस्फोटापासून. जयदेव यांनी पहिली पत्नी जयश्री कालेकर यांच्याशी घटस्फोट घेतला आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये वादाला सुरुवात झाली. जयश्री कालेकर या प्रसिद्ध मराठीनाटककार मधुसूदन कालेलकर यांची मुलगी होत्या.
तेव्हा जयदेव आणि जयश्री यांना जोडप्याला एक मुलगा होता. आणि घटस्फोटामुळे कुटुंबाला चांगलीच त्रास सहन करावा लागला होता. यामुळे बाळासाहेब ठाकरे बरेच चिडल्याचे सांगण्यात येत.
जयदेव यांनी काही काळानंतर स्मिता चित्रे यांच्याशी लग्न केले. तोपर्यंत त्या स्वागतिका म्हणून काम करीत होत्या आणि एका सर्वसामान्य मराठी कुटुंबात जन्माला आलेल्या होत्या. हा प्रेमविवाह होता खरा, परंतु तोही फार काळ टिकला नाही. यावरून कुटुंबात झालेल्या मतभेदांमुळे जयदेव यांनी मातोश्री बंगला सोडला.
मीनाताईंच्या मृत्यूनंतर जयदेव आणि त्यांचे वडील यांच्यातील दरी आणखीनच वाढत गेली. १९९५ साली शिवसेना भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर जयदेव यांनी आपणही शिवसेनेत एक सत्ताकेंद्र होऊ शकतो हे दाखविण्याचा अल्पसा प्रयत्न केला होता. मात्र त्याला यश मिळाले नाही.
तसेच याच काळात मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये संरक्षित जातीच्या हरणाची शिकार केल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. सध्या जयदेव त्यांच्या तिसऱ्या पत्नी अनुराधा आणि मुलगी माधुरी यांच्यासमवेत कलानगर मध्येच मातोश्री बंगल्याच्या शेजारी राहतात.
हे ही वाच भिडू
- बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्याच दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपला दणका दाखवला होता..
- म्हणून राज ठाकरे दसरा मेळाव्यापासून चार हात लांबच आहेत…
- आधी स्मिता ठाकरे, निहार ठाकरे आणि आता तेजस ठाकरे; अशी आहे ठाकरे कुटूंबाची वंशावळ