शरद पवारांची सभा उधळून लावत अनिल देशमुख निवडून आले होते..
माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे नाव चर्चेत आहे. त्याच कारण म्हणजे तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. ईडी आणि सीबीआय प्रकरणात मागील अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू होता. त्यांना आधी ईडी प्रकरणात आणि नंतर सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर झाला. मात्र, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी वेळ मागितल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला होता.
अखेर आज अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले.
मात्र या सगळ्या घडामोडीत मात्र राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार अनिल देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे उभे असलेले पाहावयास मिळाले. पडत्या काळात सुद्धा कायदेशीर मदत असू द्या कुटुंबीयांच्या मदत पवार करत होते.
पण एक काळ असा होता जेव्हा अनिल देशमुख यांच्या समर्थकांनी शरद पवार यांची सभा अक्षरशः उधळून लावली होती.
साल होतं १९९५. शरद पवार काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. विधानसभा निवडणूक तोंडावर होती. शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे, भाजपचे प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे तर काँग्रेस तर्फे शरद पवारांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचाराचे रान उठवले होते.
प्रचारानिमित्त शरद पवार विदर्भात आले होते. नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. तिथले काँग्रेस उमेदवार सोनूबाबा उर्फ सुनील शिंदे हे पवारांचे कट्टर समर्थक मानले जायचे. या पूर्वी एस काँग्रेस मध्ये देखील ते शरद पवारांच्या सोबतच होते. पवारांना गांधींनी पक्षात परत आणलं तेव्हा त्यांच्या सोबत इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये सोनूबाबा शिंदे हे आघाडीचे कार्यकर्ते होते.
सुनील शिंदे यांनी १९८५ साली सोशालिस्ट काँग्रेस कडून लढताना अभ्यासू व लोकप्रिय आमदार डॉ.श्रीकांत जिचकार यांचा पराभव केला होता. त्यांचा विरोध असतानाही पवारांनी १९९०च्या निवडणुकीत सोनूबाबा यांनाच काँग्रेसचं तिकीट दिल होतं. सलग दुसऱ्यांदा ते निवडूनही आले होते. यावेळी मात्र त्यांच्या बद्दल अँटी इन्कबन्सी जोरात होती.
त्यांच्या विरुद्ध होते शेकापचे वीरेंद्र देशमुख आणि भाजपच्या प्रेरणाताई बारोकर. हे सोडून एक काँग्रेसचा बंडखोर उमेदवार देखील अपक्ष उभा होता.
नाव अनिल देशमुख.
अनिल देशमुख यांची ओळख म्हणजे ते काँग्रेसचे मोठे नेते रणजित देशमुख यांचे सख्खे चुलत बंधू. नरखेडच्या पंचायतसमितीची निवडणूक जिंकून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरवात केली होती. पुढे ते पंचायत समितीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील बनले. पण भाऊबंदकीचा वाद आणि स्थानिक समीकरणे यामुळे त्यांना रणजित देशमुख गटाचा पाठिंबा मिळत नसे.
अनिल देशमुखांनी जवळपास ५ वर्षे काटोल विधानसभा मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांचं जाळं विणलं होतं . त्यांना तिथून काँग्रेसचं तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती मात्र अखेर मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या असणाऱ्या सोनूबाबा शिंदे यांनाच पुन्हा तिकीट देण्यात आलं.
या निवडणुकीत अनिल देशमुख अपक्ष म्हणून उतरले. त्यांना चिन्ह मिळाले होते चष्मा.
प्रचारकाळात लोकांच्या तोंडी फक्त चष्मा हे चिन्ह कसे ठेवता येईल याचा विचार कार्यकर्त्यांच्या मनात चालला होता. योगायोगाने त्याकाळात अक्षय कुमारचा सुहाग हा सिनेमा आला होता. त्यातील गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा हे गाणे देशभरात सुपरहिट झाले होते.
हे गाणे अनिलबाबुंच्या प्रचारात वापरायची कल्पना कोणाला तरी सुचली आणि हे गाणे पुढे आले. त्यावेळी एकच धडाका सुरु होता. जिथे जाईल तिथे हे गाणे वाजवायचे असे कार्यकर्त्यांनी पक्कं केल होतं. अनिल देशमुखांच्या संपूर्ण प्रचारकाळात या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. ज्याच्या त्याच्या तोंडात चष्मा हे चिन्ह पोहचले.
देखण्या अनिल बाबूंचा काळा गॉगल घातलेला फोटो प्रचंड फेमस झाला होता.
सुनील शिंदे यांना हि निवडणूक जड जाणार असा अंदाज आला. त्यांनी काटोल मध्ये मुख्यमंत्री शरद पवार यांची सभा लावली. तिथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हि सभा होती. या सभेला अनिल देशमुख यांचे अनेक समर्थक हजर झाले. पवारांची सभा सुरु झाल्यावर त्यांना अनेक प्रश्ने व जाब विचारून अनिल देशमुखांच्या समर्थकांनी बेजार केले.
गोंधळ वाढल्यावर मुख्यमंत्री शरद पवार यांना काटोल मधली प्रचारसभा थांबवावी.
तो पर्यंत शरद पवार हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते म्हणून प्रस्थापित झाले होते. त्यांच्या सभा उधळून लावणे सोडा पण त्यांना जाब विचारण्याची गुस्ताखी देखील कोणी केली नव्हती. पण अनिल देशमुखांच्या समर्थकांनी हा पराक्रम करून दाखवला.
गोरे गोरे मुखडपे या गाण्याचा परिणाम असा झाला की त्यावर्षीच्या निवडणुकीत अनिलबाबू देशमुख प्रचंड मतांनी निवडून आले. पवारांचे उमेदवार सुनील शिंदे हे तर तिसऱ्या स्थानावर राहिले. भाजपच्या नेत्याचं तर डिपॉझिट जप्त झालं.
संपूर्ण महाराष्ट्रात हा चमत्कार करणारा नेता म्हणून अनिल देशमुख यांचं नाव गाजलं.
स्वतः बाळासाहेबांनी बोलावून अनिल देशमुख यांना युतीच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रिपद दिलं. त्यांची शालेय शिक्षण व सांस्कृतिक राज्यमंत्रिपदाची कारकीर्द गाजली. महाराष्ट्रभूषण पुरस्कार सुरु केल्यापासून गाजली.
नियतीचा खेळ म्हणजे ज्या पवारांची सभा देशमुखांनी उधळून लावली होती त्याच पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी पक्षात अनिल देशमुख यांनी १९९९ सालच्या निवडणुकीत शिवसेनेची साथ सोडून प्रवेश केला.
तिथून पुढे देशमुखांची घोडदौड सुरूच राहिली. राष्ट्रवादीने त्यांना कॅबिनेट मंत्री केले.सार्वजनिक बांधकाम पासून ते अन्न व पुरवठा मंत्रालयापर्यंत अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. २०१९ साली तर शरद पवारांनी त्यांना राज्याच्या गृहमंत्रालयाची अवघड जबाबदारी सोपवली.
हे ही वाच भिडू.
- सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरेंना या ७ मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं आहे
- मुंबईचे पोलिस आयुक्त आणि वाद संपत नाहीत.
- बाजारात स्टूल टाकून पेशंट तपासणाऱ्या डॉक्टरने दादांच्या उमेदवाराला आमदारकीला पाडलं
- वाझे प्रकरणावरून राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येईल का?