आरोपी नंबर दोन, “संजय राऊत” : सेनेच्या आजच्या अवस्थेला राऊत जबाबदार आहेत का..?

काळ होता 1993 नंतरचा. बाबरी पाडण्यात आली होती. या गोष्टीला प्रत्युत्तर म्हणून देशभरात हिंसाचार उसळला होता. देशाची आर्थिक राजधानी मुंबई देखील या हिंसाचारातून वाचली नाही. काही काळानंतर मुंबई शांत झाली. दंगलीला जबाबदार ठरलेल्या लोकांवर खटले भरू जावू लागले..

अशाच खटल्यांमध्ये एक आरोपी होते बाळासाहेब ठाकरे. राज्यभरात एकूण 140 खटले बाळासाहेबांवर दाखल करण्यात आले होते. शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामना वर्तमानपत्रातून चिथावणीखोर लिखाण करण्यात आल्याचे हे आरोप होते. राज्यातल्या एकूण 140 खटल्यामध्ये संपादक म्हणून आरोपी नंबर एक होते ते बाळासाहेब ठाकरे आणि आरोपी नंबर दोन होते,

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत..

या काळात आरोपी नंबर दोन म्हणून संजय राऊत बरेच प्रसिद्ध झाले होते..

आजही आरोपी नंबर दोन म्हणून संजय राऊत चर्चेत आहेत. पण आजचं कारण वेगळं आहे..आज त्यांच्यावर शिवसेना फोडल्याचा, मनमानी केल्याचा, उद्धव ठाकरे आणि इतर नेते अशी दरी निर्माण करण्याचा आरोप आहे..

बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी एक पत्रच जाहीर करत संजय राऊतांवर आरोप केले आहेत. यात ते म्हणतात की, संजय राऊत पक्ष संपवायला निघाले आहेत. संजय राऊत हेच शरद पवारांच्या गळ्यातील ताईत आहेत.. तीन पानी असणाऱ्या या पत्राचा प्रमुख रोख संजय राऊत यांच्यावरच आहे..

पण राऊतांवर का आरोप होतायत त्यासाठी खालील मुद्दे पाहणं गरजेचं आहे.

पहिला मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीची स्थापना..

संजय राऊत हेच महाविकास आघाडीचे शिल्पकार होते. निवडणूकपुर्व झालेली युती तोडून कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला यामध्ये संजय राऊत यांची भूमिका महत्वपूर्ण होती. संजय राऊतच सेनेची भूमिका शरद पवार यांच्याजवळ मांडत होते. अशी आघाडी करता येवू शकते, हा प्रस्ताव शरद पवारांजवळ संजय राऊतच घेवून गेले होते. महाविकास आघाडीची स्थापना पर्यायाने पारंपारिक शत्रू असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबतची सत्ता मिळवण्याची गोष्ट बऱ्याच आमदारांना चुकीची वाटतं होती.

याच प्रमुख कारण म्हणजे आज शिवसेनेच्या ज्या 39 आमदारांनी बंडखोरी केली आहे त्यातील 13 आमदार राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करुन विजयी झाले आहेत तर 10 आमदार हे कॉंग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून विजयी झाले आहेत. अशा वेळी शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस ही आघाडी या आमदारांना मतदारसंघात अडचणीची ठरत आहे. सत्तेत स्थान मिळालं पण पुढच्या पंचवार्षिकला आमदारकी टिकवण सेनेच्या या आमदारांना कठीण वाटत आहे.

प्रत्यक्ष मैदानात अडचणीची जाणारी ही महाविकास आघाडी घडवली ती संजय राऊत यांनी त्यामुळे रडारवर पहिला नाव येतं ते संजय राऊत यांच..

संजय राऊत यांना आरोपी करण्यामागचं दूसरं कारण आहे ते म्हणजे शरद पवारांसोबत त्यांची वाढलेली जवळीक..

महाविकास आघाडीच्या घडामोंडीदरम्यान संजय राऊतांनी शरद पवारांचे कौतुक करण्यास सुरवात केली. शरद पवार विश्वासू नेते आहेत इथपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास शरद पवार हेच सबकुछ आहेत इथपर्यन्त पोहचला. बाळासाहेब ठाकरेंचे आणि शरद पवारांचे संबंध चांगले असले तरी राजकीय पटलावर हे दोन्ही नेते एकमेकांचे विरोधक होते.

या विरोधातूनच स्थानिक राजकारणांची बांधणी महाराष्ट्रात झाली. उदाहरण घ्यायचं झालं तर सुहास कांदे यांच्या विरोधात भुजबळ आणि भुजबळांच्या विरोधात सुहास कांदे रुजलं गेलं. अशा वेळी सेनेचे प्रमुख नेते राऊत हे शरद पवारांवर विश्वास टाकत गेले, जवळीक वाढवत गेले. अगदी UPA चं अध्यक्षपद शरद पवारांना द्यावं ही भूमिका किंवा राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेचा पवारांना पाठींबा असल्याची राऊतांची भूमिका.. यामुळे शरद पवारांशी जवळीक राऊत वाढवत गेले पण ही गोष्ट सेनेच्या आमदारांना रुचली नाही..

तिसरं कारण म्हणजे हिदूंत्वाशी प्रतारणा करण्याचा आरोप..

राऊतांवर होणारा तिसरा आरोप म्हणजे राऊतांनी हिंदूत्वाशी प्रतारणा केली. केसरकर यांनी लिहलेल्या पत्रात 2014 नंतरच्या राजकारणाबाबत टिका केलेली आहे. 2014 ते 2019 च्या काळात संजय राऊत हे भाजपवर टिका करत गेले, त्यातून भाजप व सेनेत वितुष्ट निर्माण झालं. बाळासाहेब ठाकरेंनी काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची भूमिका तहयात मांडली.

मात्र जेव्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात कलम 370 हटवण्यात आलं तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांना या गोष्टींच श्रेय घेता आलं नाही. उलटपक्षी संजय राऊत यांनी कलम 370, सर्जिकल स्ट्राईक या गोष्टी फास्टफुड सारख्या आहेत अशी टिका केली होती. ही टिका ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आली होती.

तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नव्हते तर भाजप सेना युतीचे शासन होते. युतीत असताना देखील संजय राऊतांनी ज्या टिका केल्या त्यामुळेच भाजप सेनेत अंतर वाढत गेल्याचे आरोप होतात. बंडखोर आमदारांपैकी अनेक आमदारांसाठी हिंदुत्व ही पारंपारिक व्होट बॅंक राहिलेली आहे. अशा वेळी आपली व्होट बॅंकच संजय राऊत यांच्या स्टेटमेंटमुळे धोक्यात येवू शकते अशी भावना बंडखोर आमदारांमध्ये रुजली गेली..

चौथ कारण म्हणजे, किचन कॅबिनेटचं राजकारण..

किचन कॅबिनेट म्हणजेच आपल्या फेवरमधल्या फक्त दोन-चार लोकांमधूनच राजकारण करणं. अगदी अलिकडचंच उदाहरण घ्यायचं तर सेनेकडून राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा पक्षप्रमुखांनी न करता संजय राऊत यांनी केली. चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसुळ, अनंत गिते अशा नेत्यांना पाठबळ द्यायचं सोडून राऊत हे मनमानी निर्णय घेत आहेत अशी भूमिका आमदारांची झाली. हे निर्णय शरद पवारांच्या सोयीचे असतात ही भावना आमदारांच्या रुजत गेली. UPA अध्यक्षपदाबाबतचा सेनेचा निर्णय असो की उत्तरप्रदेशात निवडणूका लढवण्याचा निर्णय असो राऊतांनी सांगितले.

संजय राऊत हे राज्यसभेचे उमेदवार आहेत. त्यांना लोकांच्यात जावून निवडणूक लढवावी लागत नाही. पण चुकीचे सल्ले उद्धव ठाकरेंना देतात असं मत सेनेच्या आमदारांच झालं…

पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे राऊतांची वक्तव्ये..

रोज सकाळी 10 वाजता राऊतांच्या विधानाची बातमी ठरलेली असायची. एकेकाळी विरोध असणाऱ्या नवाब मलिकांच समर्थन असो की अनिल देशमुखांची बाजू लढण्याची कामगिरी असो. संजय राऊत सातत्याने भाजपवर टिका करत चर्चेत राहिले. दूसरीकडे भाजपकडून देखील संजय राऊत यांच्यावर टिका होत गेली. संजय राऊत ED च्या विरोधात बोलत राहिले पण प्रत्यक्षात ED चा चौकश्यांना समोरं जावं लागलं ते यशवंत जाधव, प्रताप सरनाईक अशा नेत्यांना.

यशवंत जाधवांच्या पत्नी यामिनी जाधव, प्रताप सरनाईक आज बंडखोर आमदारांच्या यादीत आहेत.  भाजपच्या विरोधात राऊत वक्तव्य करतात. त्याचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो अशी भावना या नेत्यांमध्ये तयार होत गेली..

गेल्या अडीच वर्षातल्या राऊतांच्या वक्तव्यांची भली मोठ्ठी यादी असली तरी राज्यसभेच्या निवडणूकीनंतर अपक्षांवर दाखवलेला अविश्वास, कालच बंडखोर आमदारांवर तोफ डागताना काही लोक आपला बाप बदलतात, बंडखोर आमदारांचा आत्मा तिथेच राहिलं फक्त बॉडी येईल अशी वक्तव्य कुठेतरी ही दरी अजून वाढवतानाच दिसत आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.