असदुद्दीन ओवैसी यांनी आत्ताच नाही तर पाकिस्तानला याआधी अनेकदा झापलंय
हिंदू-मुस्लिम धर्मांमध्ये काहीही छोटे मोठे वाद झाले तरी इथे निर्माण झालेल्या तणावग्रस्त वातावरणाचा फायदा घेण्यात पाकिस्तानला फार मजा येते. इथे काहीही होवो, पाकिस्तान याचा फायदाच घ्यायला टपलेलं असतं. इथे काहीही घडू दे पण विनाकारण खोडं काढणं हे जसं काही पाकिस्तानचं रुटीन वर्क होऊन बसलंय. म्हणजे आता सुद्धा संबंध नसतांना पाकिस्ताननं काडी लावण्याचा प्रकार केलाय.
त्याचं निमित्त ठरलंय गेल्या काही दिवसांत सुरु असलेला कर्नाटकातला हिजाबवरूनचा वाद. हिजाबवरून सुरू झालेला वाद वाढतच गेला आणि आता हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थी या मुद्द्यावर आमने-सामने आहेत….घडतंय सगळं भारतात पण नेहेमीप्रमाणे पाकिस्तानने मध्ये नाक खुपसलंच. पाकिस्तान म्हणे कि, भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतोय.
पण यावरून भारतीय काय गप्प बसणाऱ्यातले नाहीत, पाकिस्तानच्या याच आरोपावरून आता AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे…
‘ये हमारे घर का मामला, अपनी टांग मत अड़ाओ’
पाकिस्तानला सल्ला देताना ओवैसी म्हणाले की, भारताच्या कोणत्याही मुद्द्यात पाय रोवण्याचा प्रयत्न करू नये. यावेळेस त्यांनी मलालावर झालेल्या हल्ल्याची दिली होती जो हल्ला पाकिस्तानात झाला होता. तसेच, असेही म्हणाले कि, पाकिस्तानच्या घटनेनुसार तेथे कोणताही बिगर मुस्लिम पंतप्रधान होऊ शकत नाही. आम्ही पाकिस्तानला सांगू की तुम्ही इकडे पाहूच नका, तुमचं तुम्ही बघा. तुमच्यात काय मारामारी आहे ते पहा. हा देश माझा आहे, तुमचा नाही. आमच्या घरातलं प्रकरण आहे, यात तुमचा पाय अन नाक दोन्ही घालू नका, नाहीतर तुमच्या पायाला आणि नाकाला दुखापत होईल”.
ज्या प्रकरणावरून ओवैसी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले ते प्रकरण नक्की काय आहे ?
कर्नाटकातील एका महाविद्यालयात ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. ज्यामध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात हिजाब घालण्याची परवानगी नव्हती. यावर मुलींनी विरोध सुरू केला. प्रकरण वाढल्यावर ते संपूर्ण कर्नाटकात पसरले. हाच प्रकार अनेक कॉलेजांमध्ये सुरू झाला आणि हिंदू-मुस्लिम संघटना एकमेकांसमोर आल्या. हिंदू संघटनेने विद्यार्थ्यांना भगवा गमछा परिधान करून वर्गात जाण्यास सांगितले, तर मुस्लीम विद्यार्थिनींनी सांगितले की त्यांनी जे परिधान केले ते महाविद्यालयात घालणे हा त्यांचा हक्क आहे. हे प्रकरण देशभर गाजतंय अन त्यावर राजकारणही सुरू आहे. भाजपच्या नेत्यांनी हिंदू संघटनांना पाठिंबा दिला, तर मुस्लिम विद्यार्थिनींच्या आवाजाला पाठिंबा देणारे काही नेते पुढे आले ज्यात ओवैसी यांचाही समावेश होता.
हे झालं आत्ताचं प्रकरण, पण असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानच्या हस्तक्षेपावरून घेतलेल्या आत्तापर्यंतच्या भूमिका देखील पाहणं महत्वाचं आहे.
अगदी मागच्याच वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील गोष्ट आहे.
त्यादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वाढत होत्या. याच घटनांदरम्यान संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे सुरू असलेल्या T२० क्रिकेट वर्ल्डकप भारत आणि पाकिस्तान यांच्यात मॅच झाली. वाढलेल्या दहशतवादी घटनांमुळे २४ ऑक्टोबर रोजी झालेली हि मॅच होऊ नये म्हणून मागणी झाली होती. ओवेसीही या सामन्याच्या विरोधात होते. त्यांची भूमिका अशी होती कि, जम्मू-काश्मीरमध्ये आमचे नऊ जवान शहीद झाले आहेत आणि भारत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध टी-२० मॅच कसे काय खेळू शकतात? असं म्हणत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलेला.
मॅच अली आणि पाकिस्तान ने हि मॅच जिंकलेली. दरम्यान पाकिस्तानचा विजय चर्चेत होता. पाकिस्तानच्या विजयावर पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी हा इस्लामचा विजय असल्याचे म्हटले होते आणि याशिवाय आणखी चिथावणीखोर वक्तव्य केली होती. आणि यावर ओवेसी यांनी पाकिस्तान च्या गृहमंत्र्यांना देखील चांगलंच सुनावलेलं… ते म्हणले होते कि, “शेजारी देशाचे मंत्री ज्या पद्धतीने म्हणाले की पाकिस्तान जिंकला तर इस्लाम जिंकेल, इस्लामचा क्रिकेटशी काय संबंध. शेजाऱ्यांना हे समजत नाही. अल्लाहचे आभार मानतो की आपल्या देशातील जनता तिथे गेली असती तर हे वेडे आपल्याला पहावे लागले असते”.
२०२० मध्ये जानेवारी महिन्यात देखील त्यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतीय मुस्लिमांची काळजी करू नका आणि आपल्या देशाची काळजी घ्या असे सुनावले होते. ओवेसी यांनी स्पष्ट विधान केलेलं की, “आम्हाला भारतीय मुस्लिम असल्याचा अभिमान आहे आणि यापुढेही राहणार आहे. त्यामुळेच आम्ही जिनांचा चुकीचा सिद्धांत नाकारला.आणि जिन्नांचे समर्थन देखील कधी केले नाही आणि करणार नाही”.
जेंव्हा जेंव्हा भारतात हिंदू मुस्लिम तणावग्रस्त वातावरण निर्माण होते तेंव्हा तेंव्हा पाकिस्तान मुस्लिमांना सहानुभूती दाखवणारे, आणि मुस्लिमांना भडकावणारे विधानं करते. पण तेंव्हा मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी परिस्थितीवर योग्य ते भाष्य केलं, आपली ठाम भूमिका मांडली तर त्याचा संदेश देखील समाजात सकारात्मक जातो.
हे हि वाच भिडू :
- केंद्र आणि राज्याचा ताळमेळ लागावा म्हणून राज्यपाल नियुक्त केले पण घडतंय काहीतरी वेगळंच !
- लव्ह चार्जरवाला रॉकस्टार बाबा गुरमीत राम रहीम पंजाबचं राजकारण चार्ज करायला आलाय
- मोदीच भारी! असं म्हणणाऱ्या खलीचं डोकं राजकारणात चालणार का ?