वाजपेयी म्हणाले होते, “मी जिवंत आहे ते फक्त राजीव गांधी यांच्या उपकारामुळे”.
अटल बिहारी वाजपेयी हे सुसंस्कृत नेते म्हणून ओळखले जायचे. कडव्या हिंदूत्वाच्या लाटेवर स्वार होत त्यांनी बाबरी मशिदी प्रकरणात ठोस भूमिका घेतली होती तरी अनेकांच्या मते त्यांनी एका सुसंस्कृत राजकारणाचा पाया रचला. त्याचं कारण अस की, जेव्हा राजधर्म शिकवण्याची वेळ आली तेव्हा ते राष्ट्राच्या बाजूने उभा राहिले. त्यांनी आपल्या पदाचा भंग केल्याचं उदाहरण सापडणं तसं अवघडच,
तर अशा या लोकप्रिय अटल बिहारी वाजपेयी यांनीच एकदा सांगितल होतं की, मी जिवंत आहे ते राजीव गांधी यांच्या उपकारामुळेच.
नेमकं काय होतं हे प्रकरण..
राजीव गांधीचा मृत्यू झाला तेव्हा विरोधी पक्ष नेता म्हणून दिल्लीतल्या एका वरिष्ठ पत्रकारांनी अटल बिहारी वाजपेयींशी संपर्क साधला. काहीतरी मसालेदार मिळेल या नात्याने या पत्रकाराने वाजपेयींना प्रश्न विचारले तेव्हा वाजपेयी म्हणाले,
आज मी जिवंत आहे ते फक्त राजीव गांधी यांच्या उपकारामुळे. तुम्हाला अस वाटत असेल की विरोधी पक्षनेता म्हणून मी त्यांच्या विरोधात काहीतरी बोलेल तर ते मी कदापी करणार नाही…
बस्स अस काय उपकार होतं राजीव गांधीच? याचा उल्लेख करणं मात्र त्यांनी तेव्हा टाळलं मात्र काही वर्षांनंतर जेष्ठ पत्रकार करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान हा प्रसंगाचा त्यांनी खुलासा केला.
१९८८ साल असावे. वाजपेयी हे किडनीच्या विकाराने त्रस्त होते. त्यांनी साधारण तीन वर्षांपूर्वीच एक किडनी गमावली होती आणि आता एकाच किडनीवर त्यांचं काम चालू होतो. त्यावर देखील दबाव वाढल्यामुळे प्रकृतीचा प्रश्न गंभीर बनला होता. वाजपेयींच्या डॉक्टरांनी त्यांना अमेरिकेत जावून उपचार घेण्याचं सुचवल होत पण इतकी वर्षे राजकारणात असूनही वाजपेयींनी कधी पैसे कमवले नव्हते. त्यामुळे अमेरिकेत जाऊन उपचार घेणं त्यांना परवडणारं नव्हतं.
हि गोष्ट कोठूनतरी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीना समजली. त्यांनी लगेच अटलजींना बोलवून घेतलं आणि सांगितल,
तुमचा समावेश अमेरिकेला जाणाऱ्या भारताच्या प्रतिनिधी मंडळात करण्यात आला आहे. तुम्ही अमेरिकेच्या दौऱ्याला जात आहात. त्याचवेळी तुम्ही उपचार करुन घेवू शकता. !!!
राजीव गांधींनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं कि जो पर्यंत वाजपेयींच्या वरील उपचार पूर्ण होत नाहीत तो पर्यंत तिथला खर्च त्यांच्यावर पडू द्यायचा नाही. ऑपरेशन झाल्यावरच वाजपेयी परत भारतात येतील
वाजपेयी सांगतात या प्रसंगामुळेच राजीव गांधींना राजकिय विरोध करत असताना देखील त्यांनी कधी मर्यादा भंग केल्या नाहीत त्यांचा हा नियम त्यांनी राजीव गांधींच्या मृत्यूनंतर देखील पाळला.
हे ही वाच भिडू.
- कलमाडींच्या विजयासाठी वाजपेयींनी पुण्यात जंगी सभा घेतली पण
- वाजपेयी जेव्हा इंदिरा गांधीच्या हेअरस्टाईलची खिल्ली उडवतात.
- ममता बॅनर्जीसारखा कायम धगधगणारा ज्वालामुखी वाजपेयींच्या समोर शांत झाला