औरंगजेबाच्या हल्ल्यानंतर सुद्धा गणपतीच्या या स्वयंभू मूर्तीला धक्का पण लागला नाही
भारतात अनेक जाती – धर्माचे लोक राहतात. आपआपल्या जाती-धर्माचं प्रतिक म्हणून वेगवेगळी प्रार्थना स्थळेही प्राचीन काळापासून बांधून ठेवण्यात आलीत. पण काही अति कट्टरपंथी राज्यकर्त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी किंवा दहशत माजवण्यासाठी इतर धर्मांच्या लोकांवर, त्यांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले केले.
यातच एक होता औरंगजेब ज्याने आपल्या मुघल साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी इतर धर्मांवर तलवार उचलण्यास सुरुवात केली. अनेक गावे उद्ध्वस्त केली, मंदिर उद्ध्वस्त केली. त्यामुळे संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला.
असंच एक मंदिर म्हणजे मध्यप्रदेशातील इंदौरमधलं खजराणा गणेश मंदिर. जिथं भगवान गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. त्यावेळी औरंगजेबाच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी ही स्वयंभू गणेश मूर्ती चक्क एका विहिरीत लपवून ठेवण्यात आली होती.
तर झाले असे होते की, मुघल शासक औरंगजेबाने आपल्या कट्टर प्रवृत्तीमुळे जुनी मंदिरे नष्ट करण्याचा प्रण घेतला होता. याच साखळीत तो पोहोचला इंदौरच्या भागात. तेव्हा त्या स्वयंभू गणेशमूर्तीचे रक्षण करण्यासाठी ती मूर्ती विहिरीत लपवण्यात आली.
आता ही खजराना गणेश मूर्ती कुठून आली आणि त्याची स्थापना कोणी केली? याबाबत कुठलाही पुरावा अद्याप तरी सापडलेला नाही, पण असे मानले जाते की, ही मूर्ती स्वयंभू आहे. आणि त्या ठिकाणी स्थापन झाली आहे जिथे आज मंदिर आहे.
गणेशाची ही मूर्ती बरीच वर्षे विहिरीत राहिली. त्यानंतर इंदौरमध्ये देवी अहिल्याबाई होळकर यांची सत्ता सुरू झाली. आता अहिल्याबाई आधीपासूनच आपल्या ईश्वर भक्तीसाठी देशभर ओळखल्या जायच्या. त्यांनी देशातील अनेक प्रसिद्ध मंदिरांचे नूतनीकरण केले.
एकदा त्यांच्या कारकिर्दीत पंडित मंगल भट्ट यांना एक स्वप्न पडले आणि त्या विहिरीत त्या स्वयंभू गणेशाची मूर्ती असल्याचं समजलं . त्यांनी ही गोष्ट अहिल्याबाईंच्या कानावर घातली. त्यांनी विहिरीतून केवळ गणेशाची दैवी मूर्तीच काढली नाही तर त्या जागी भव्य मंदिरही बांधले.
आज त्याच मंदिराला आपण खजराना गणेश मंदिर म्हणून ओळखतो.
भगवान गणेश हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. इंदौरच्या खजराना गणेश मंदिरावर लोकांची आस्था फार वर्षांपासून आहे. भक्त या मंदिरात अनेकदा सोन्या, चांदी आणि मौल्यवान रत्ने दान करतात.
या स्वयंभू गणेश मूर्तीचे दोन्ही डोळे हिऱ्यांची आहे ज्यांना इंदूरच्या स्थानिक व्यवसायिकांनी दान केले होते. गर्भगृहातील भिंती आणि छत चांदीचे आहे.
खजराना गणेश मंदिर एक चमत्कारी मंदिर आहे. असे मानले जाते की, येथे भाविकांनी मागितलेल्या प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्यात.
मंदिराला जोडलेली एक अनोखी परंपरा आहे. गणपतीच्या मागील बाजूस बनविलेल्या भिंतीवर बाहेरील बाजूने एक उलटे स्वस्तिक प्रतीक बनविले आहे.
भक्त आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी आशीर्वाद घेताना असे करतात. त्यांची इच्छा पूर्ण झाली की, मग ते मंदिरात येऊन सरळ स्वस्तिक काढतात. त्याच बरोबर तीन वेळा मंदिराची परिक्रमा करून धागा बांधून मनोकामना पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद मिळवण्याचीही एक प्राचीन परंपरा आहे.
मंदिरात तुलादान करण्याचीही परंपरा आहे. जिथं आजही नवजात मुलांच्या वजनाइतकी लाडू गणेशाला अर्पण केली जातात.
हे ही वाच भिडू.
- तरंगणाऱ्या दगडांवर उभं असलेलं हे मंदिर वर्ल्ड हेरिटेज यादीत जाऊन पोहचलंय
- औरंगजेबाच्या दरबारात राहून त्याने आपल्या ग्रंथात मराठ्यांच कौतुक केलं होतं
- औरंगजेबाने बांधलेली ज्ञानवापी मशीद पाडायचा पहिला प्रयत्न मल्हारराव होळकरांनी केला होता..