दादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील होते….

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही काही राजवटी या भारत सोडून तयार नव्हत्या. १९५४ साली भारत स्वतंत्र होऊन ७ वर्ष उलटली होती. इंग्रज सत्ता माघारी फिरल्यानंतर फ्रांसने एका तहानुसार पॉंडिचेरी, कारिकल आणि चंद्रनगर हे भाग भारताच्या स्वाधीन केले. पण इंग्रजी सत्तेनंतर आलेल्या पोर्तुगीजांनी मात्र भारतातच आपलं बस्तान बसवायचं ठरवलं होतं. भारत स्वतंत्र होऊनही पोर्तुगीज राजा सालाजार भारत सोडून जायला तयार नव्हता.

पोर्तुगीजांनी राजा राममोहन रॉय यांच्या नेतृत्वात चालू असलेल्या सत्याग्रह आंदोलनाला पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय देऊन टाकला. गोवा, दीव-दमण आणि दादरा नगर हवेली हे प्रदेश स्वतंत्र होण्याचं स्वप्न धोक्यात आलं होतं. भारताच्या काही धाडसी तरुणांनी पोर्तुगिजांचा हा कट उधळून लावण्याचा निर्णय घेतला होता. पण भारत सरकार यात सहभागी व्हायला तयार नव्हतं. तरुणांनी स्वतंत्र क्रांती करण्याचा निर्णय घेतला. 

महाराष्ट्र गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या दादरा नगर हवेली हा भाग सशस्त्र क्रांती करण्यासाठी निश्चित करण्यात आला. या तरुणांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संगीतकार सुधीर फडके, क्रीडा प्रशासक राजाभाऊ वाकणकर, शब्दकोशाचे निर्माते विश्वनाथ नरवणे, नाना काजरेकर, श्रीकृष्ण भिडे प्रभाकर कुलकर्णी, बिंदू माधव जोशी , श्रीधर गुप्ते आणि अजून अशी २५-३० तरुणांची फौज होती.

बाबासाहेब पुरंदरे यांची यात मोठी भूमिका होती. पोर्तुगीज सरकारने भारतावर दादरा नगर हवेली प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केला होता. यावर तोडगा म्हणून पंडित नेहरूंनी अभ्यासक आणि संशोधकांची एक समिती स्थापन केली होती. या समितीचं नाव होतं गोवा युनिट. भारताची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात पटवून देण्याची आणि आवश्यक ते पुरावे गोळा करण्याची जबाबदारी या विशेष गोवा युनिट समितीवर सोपवण्यात आली होती. 

तरुण संशोधक म्हणून बाबासाहेब पुरंदरे यांचा विशेष समावेश पंडित नेहरूंनी केला होता. भारताच्या बाजूने पुरावे गोळा करण्यासाठी बाबासाहेब पुरंदरेंनी जीव धोक्यात घालून हे काम केलं होतं. बाबासाहेब पुरंदरे इथून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यसैनिक म्हणून पुढे आले.

दादरा नगर हवेलीच्या स्वातंत्र्य संग्रामात ६-७ महिने या क्षेत्रात कार्यरत राहिले. दादरा नगर हवेलीच्या स्वातंत्र्य संग्रामात बाबासाहेब पुरंदरे प्रमुख सेनानी म्हणून आघाडीवर होते. तरुणांमध्ये लढ्याचा हुंकार भरण्यासाठी बाबासाहेब पुरंदरेंनी भरपूर व्याख्याने दिली होती. त्यांच्या व्याख्यानाला तुडुंब गर्दी होत असे. बाबासाहेब पुरंदरेंच्या भाषणांमुळे दादरा नगर हवेली लढ्याला जोरदार वेग आला होता.

आपल्या उमेदीच्या काळात बाबासाहेब पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं कथन आपल्या भाषणातून आणि लेखनातून केलं होतं. अगदी परदेशातसुद्धा बाबासाहेब पुरंदरेंनी दिलेली व्याख्याने गाजली होती. छत्रपती शिवरायांवरील विपुल लेखन असो किंवा दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामातील लढा असो बाबासाहेब पुरंदरेंनी मोठी भूमिका यात बजावली.

दादरा नगर हवेली मुक्ती लढा हा सशस्त्र क्रांती लढा जरी असला तरी बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून उच्चकोटीचं प्रबोधन तरुणांना केलं. अहिंसेच्या काळात झालेलं हे पहिलं सशस्त्र क्रांती युद्ध होतं. यात बाबासाहेब पुरंदरेंसोबतच अनेक तरुणांनी जीवाची बाजी लावली होती. या क्रांतीत सहभागी झालेल्या युवकांनी कधीच प्रसिद्धीची हाव धरली नाही, या लढ्यात अनेक तरुणांनी यशस्वी झुंज दिली आणि लढा यशस्वी केला.

बाबासाहेब पुरंदरेंनी पंडित नेहरूंचा विश्वास खरा ठरवला. गोवा युनिट समितीचे ते महत्वाचे सदस्य होते. भाषणातून प्रबोधन करून बाबासाहेब पुरंदरेंनी दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात मोलाची भूमिका बजावली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.