आंदळकरांचा परिसस्पर्श लाभलेल्या “बाला रफिक शेख” याने आज संधीच सोनं केलं.
बाला रफिक शेख आज महाराष्ट्र केसरी विजेता झाला. गतविजेत्या अभिजीत कटकेला त्याने ११-३ इतक्या गुणफरकाने पराभूत केलं. बाला रफिक शेखचा विजय झाला आणि आठवण आली ती कै.पै. गणपतराव आंदळकरांची. पै. आंदळकरांच्या स्पर्शाने कित्येक मल्ल न्यू मोतीबाग तालमीत घडले. बाला रफिक शेख देखिल त्यातीलच एक मल्ल. आज बाला रफिक शेख पुण्यातल्या वडगाव बुद्रुकच्या हनुमान आखाड्यातील वस्ताद गणेश दांगट, गोरख वांजळे, संदिप बुचुडे आणि महेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. पण आपल्या कुस्तीत पैलवान म्हणून त्याला जी ओळख मिळाली ती आंदळकरांमुळे.
असे कित्येक रत्न कुस्तीला देणारे आंदळकर कोण होते म्हणून हा लेख.
मोतीबाग तालिमं असं नाव निघालं की त्यासोबतच नाव येतं ते पै.गणपतराव आंदळकरांच. कुस्तीच्या डावात भल्याभल्यांना अस्मान दाखवून अनेक मल्ल रिटायर झाले पण आंदळकर श्वासाच्या अखेरपर्यन्त लाल मातीची सेवा करत राहिले. त्याचं हे लाल मातीवरचं प्रेमच त्यांना रिटायर न झालेला पैलवान म्हणून ओळख मिळवून देण्यास पुरेसे आहेत.
कोल्हापूरच्या मोतिबाग तालमीबरोबरचा प्रवास हा १९५० पासूनचा. हिंद केसरी पै. गणपतरावांनी कुस्ती प्रेमातूव कोल्हापूर गाठलं आणि लाल माती गाजवण्यास सुरवात केली.
पै. आंदळकरांच नाव खऱ्या अर्थानं पैलवान म्हणून गाजलं ते १९५८ साली खासबाग मैदानात झालेल्या पाकिस्तान मल्लाबरोबरच्या कुस्तीनं. हजारों कुस्तीप्रेमींच्या साक्षीनं त्यांनी पाकिस्तानी मल्ल नासिर पंजाबीला धूळ चारली.
नासिर पंजाबीला धूळ चारल्यानंतर पै. आदंळकरांनी मागं वळून पाहीलच नाही. पहिले हिंद केसरी श्रीपाद खांचाळे, श्रीरंग जाधव, मोती पंजाब, मंगल पैलवान अशा कित्येक मल्लांशी त्यांनी यशस्वी झुंज दिली.
हिंद केसरीच्या गदेवरती नाव.
कुस्तीतं एकामागून एकाला पराभव करत असतानाच त्यांची निवड १९६० सालच्या मुंबई येथील हिंद केसरी स्पर्धसाठी करण्यात आली. या स्पर्धेत पैलवान एकामागून एक विजय मिळवल गेले. उपांत्य लढतीत त्यांनी बंतासिंह या नावाजलेल्या पैलवानाला अस्मान दाखवलं. अंतीम सामन्यात त्यांच्या समोर होता तो खडकसिंग. कुस्ती ४० मिनिटे चालली तरी निकाली लागली नाही. शेवटी गुणांवर १० विरुद्ध पाच च्या फरकाने पै. गणपतराव आंदळकरांना विजयी घोषित करण्यात आले. सलग दोनदा पै. आंदळकरांनी हिंदकेसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं. हे नाव पर्यायाने महाराष्ट्राच होतं.
१९६२ साली जकार्ता एशियाड स्पर्धेत ग्रीको रोमन गटात त्यांनी सुवर्णपदक पटकावलं, तर फ्रि स्टाईलमध्ये रौप्य पदक पटकावलं. कुस्तीच्या दोन्ही प्रकारात पदक मिळवण्याची हि दुर्मिळ घटना होती. एकुण ४० हून अधिक कुस्त्या ते पाकिस्तान मल्लांबरोबर खेळले आणि सर्वच कुस्त्या निकाली लावत पाकिस्तानी मल्लांना अस्मान दाखवत होते. त्यांच्या याच भव्य कारकिर्दीमुळे अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार आणि कोल्हापूर भूषण पुरस्कारांनी त्यांनी गौरवण्यात आलं.
लाल मातीची सेवा करणारे अनेक मल्ल थकून झाल्यानंतर शांत बसतात. पण पै. गणपतराव आंदळकर नावाचं वादळ आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यन्त तालमीच्या लाल मातीत एका वादळासारखं घोंघावत राहिल. दूसऱ्या पर्वात एक वस्ताद म्हणून सेवा करत राहिले.
भारत केसरी रूस्तम-ए- हिंद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ, अॅग्नेल निग्रो, महाराष्ट्र केसरी विष्णू जो शीलकर, संभाजी वरुटे, राष्ट्रकुल सुवर्णपद विजेता रामचंद्र सारंग, डब्बल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, उपमहाराष्ट्र केसरी पै.नंदू आबदार, चम्बा मुत्नाळ, विष्णू जोशीलकर आणि आज महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांसारख्या अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय मल्लांनी त्यांनी घडवलं. ते एक पैलवान तर होतेच पण हजारों पैलवानांना घडवणारे ताकदीचे वस्ताद देखील होते.
हे ही वाचा.
- कुस्ती आणि क्रांतिकार्याची परंपरा हातात हात घालून उभं असलेलं कुंडलचं कुस्ती मैदान
- राष्ट्रकुलसाठी पाठवलेल्या सर्वच कुस्तीपटूनी जिंकलं भारतासाठी पदक !!!
- मराठी मल्लांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हरिश्चंद्र बिराजदार पुढे आले..!