पवार, मोदी ते गांधी “तलवार” कॉमन होती, मग राज ठाकरेंवर गुन्हा का नोंद झाला ते समजून घ्या..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाणे दणाणून सोडलं. फक्त ठाणेच नाही तर त्यांच्या उत्तर सभेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. त्यांच्या सभेसाठी झालेली अमाप गर्दी तशी काही वेगळी अशी गोष्ट नव्हती कारण राज ठाकरेंची सभा आहे आणि त्याला एवढी गर्दी आहे, हे तर खूप सरळ साधं गाणी असल्याचं सगळ्यांना माहित आहे.
त्यात ज्याप्रकारे मनसेने गेल्या काही दिवसांपासून उत्तर सभेचा ‘टिझर’च्या माध्यमातून जो प्रचार केला, त्यांचा परिणाम असा होणारच होता. अंदाजाप्रमाणे गर्दी जमली, वसंत मोरेंच्या भाषणाने सुरुवात झाली, इतर अनेक नेत्यांनी भाषण केलं, राज ठाकरेंची एंट्री झाली आणि त्यांनी देखील ‘राज स्टाईल’ भाषण करत अनेक गोष्टींचा पर्दाफाश केला. गदारोळाच्या आवाजात सभा संपन्न झाली.
मात्र या सगळ्यादरम्यान एक गोष्ट अशी घडली ज्यामुळे सभा संपताच राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. ती गोष्ट म्हणजे…
सभेत भाषणापुर्वी उपस्थितांना तलवार दाखवणं
भारतात सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे तलवारीचं प्रदर्शन करणं बेकायदेशीर असल्याने हा गुन्हा राज ठाकरेंवर दाखल करण्यात आला असल्याचं, सांगण्यात येतंय.
मात्र राज ठाकरे हे काय पहिलेच व्यक्ती नाहीये ज्यांच्यावर अशा प्रकारे गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या चार महिन्यात राजकीय नेत्यांवर असे गुन्हे दाखल करण्याला सुरुवात झालीये…
याची सुरुवात झाली ती भाजप नेते मोहित कंबोज यांच्यापासून.
अलीकडेच फेब्रुवारीमध्ये मंत्री नवाब मलिकांच्या अटकेनंतर राज्यभर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. त्यावेळी भाजप नेते मोहीत कंबोजही कार्यकर्त्यामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या भावनांना आवर न घालता थेट घोषणाबाजी करत तलवार उपसली होती.
याची तात्काळ दखल मुंबई पोलिसांनी घेतली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर परत एकदा अशी घटना घडली मार्चमध्ये. एका कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी खुली तलवार दाखवणं कॉंग्रेस नेत्यांना महागात पडलं. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे ते दोन नेते.
जाहीर कार्यक्रमात त्यांनी तलवार काढली.
तेव्हा “तलवार दाखवल्यानंतर माझ्यावर गुन्हा, आता काँग्रेस नेत्यांवर तीच कारवाई करा”, अशी मागणी मोहित कंबोज यांनी त्यांच्या ट्विटरवरून केली.
त्यानुसार पोलिसांनी वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख या दोन्ही मंत्र्यांवर मुंबईत गुन्हा दाखल केला.
Mumbai Police Have Registered Arms Act Case On Me For Showing Sword !
Now I Want To See Will Police Will Register FIR AGAISNT These 3 Congress Leaders .
I Request Mumbai Police Commissioner Sanjay Panday To Show Unbiased And Fair Action Or U Are Also Just One Of Like Others ! https://t.co/NYnqk9UUd2 pic.twitter.com/r3wBvWBBDk— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) March 27, 2022
यानंतर आता सेम असाच प्रकार घडला आहे राज ठाकरेंसोबत.
या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तो ‘शस्त्र अधिनियम कायदा, १९५९’ अंतर्गत
या कायद्यानुसार भारतात शस्त्र बाळगणं किंवा विकणं बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे. त्यावर बंदी घालण्यात आली आहे. कुणाकडे असे बेकायदेशीर शस्त्र सापडले तर या कायद्याअंतर्गत गुन्हा करावास देखिल आहे. मात्र याला अपवाद असा आहे की, कुणाच्या जीवाला धोका असेल तर तो शस्त्र बाळगू शकतो. त्यासाठी तशी परवानगी घेणं बंधनकारक आहे. शस्त्र बाळगण्यासाठी आणि शस्त्रविक्रीसाठी परवाना घ्यावा लागतो.
परवाना देताना ज्या व्यक्तीने त्यासाठी अर्ज केला आहे, तिची पार्श्वभूमी तपासली जाते. तो गुन्हेगार आहे का, त्याच्या जीवाला खरोखरच धोका आहे का, हे तपासले जाते. सोबतच त्याची वैद्यकीय चाचणी आणि मानसिक स्थितीबाबत अहवाल मागवला जातो. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच परवाना दिला जातो. शस्त्र परवान्याचा गैरवापर होत असेल तर तो ताबडतोब रद्द केला जाऊ शकतो.
परवान्याच्या अटींचा भंग केल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन हजारांचा दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
हा झाला कायदा…
मात्र इतिहास बघितला तर कळतं, कायदा अस्तित्वात असूनही राजकीय सभांमध्ये, रॅलीमध्ये नेत्यांकडून असं तलावर दाखवणं खूप सामान्य बाब होती.
बाळासाहेब ठाकरेंनी देखील त्यांच्या अनेक जाहीर सभांमध्ये तलवार दाखवलेली आहे. १२ ऑक्टोबर २००५ रोजी मुंबईतील शिवाजी पार्क इथे झालेल्या दसरा सणाच्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात तलवार दिसली होती.
जेव्हा आदित्य ठाकरेंना राजकारणात लॉंच केलं होतं तेव्हा देखील बाळासाहेबांनी आदित्य यांना तलवार दिली होती.
शिवाय उद्धव ठाकरेंनी देखील अनेक सभांमध्ये तलवार प्रदर्शन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि अमित शहा यांनी देखील बऱ्याच सभांमध्ये अशाप्रकारे तलवार फिरवली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी देखील तलवारीचा ट्रेंड फॉलो केलाच आहे.
शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचाही ऑगस्ट २०१८ मध्ये पक्ष कार्यकर्त्यांनी त्यांच्या ७ व्या राष्ट्रीय अधिवेशनात तलवारीने सत्कार केला होता.
हे सगळे राजकीय नेते का तलवार प्रदर्शन करतात? याला ‘शक्ती प्रदर्शनाचं प्रतीक’ हे उत्तर आहे.
भारतात तलवारींना आधीपासूनच खूप महत्त्व राहिलं आहे. भारतातील राजे-महाराज तलवारीचा वापर करायचे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्यापासून तलवार हे मान, गर्व, प्रतिष्ठा आणि शौर्याचं प्रतीक राहिलं आहे. तलवारीच्या जोरावर शक्तिप्रदर्शन केलं जायचं. हेच मुद्दे राजकीय पक्षांनी हेरले.
म्हणूनच शक्तिप्रदर्शन आणि लढाऊ वृत्ती याचं प्रतीक म्हणून राजकीय नेते तलवार दाखवता. एखादा पक्ष जेव्हा शक्ती प्रदर्शनासाठी सभा, रॅली आयोजित करू लागला, विरोधी पक्षांना सडेतोड उत्तर देण्यासाठी तयार होऊ लागला, तेव्हा नवीन काही तरी खळबळ आता घडवून आणली जाणार, इतिहास रचला जाणार असं दाखवण्यासाठी तलवार म्यानातुन बाहेर काढली जाऊ लागली.
त्याचाच भाग म्हणजे वरील नेत्याचं हातात तलवार घेणं. मात्र कायद्याने गुन्हा असलेली गोष्ट हे नेते मंडळी करतात तरी त्यांच्यावर कधी कारवाई झाल्याचं किंवा गुन्हा दाखल झाल्याचं आढळलं नाही. याचं कारण काय? हे विचारण्यासाठी आम्ही
ॲडव्होकेट रोहन नहार यांच्याशी संपर्क साधला.
त्यांनी सांगितलं…
आर्म्स ऍक्ट प्रमाणे अशी तलवार जी आपण घातपाताची वापरू शकत नाही, ज्याला ‘ब्लंट स्वॉर्ड’ असं म्हणतात ती खुलेआम वापरणं गुन्ह्याच्या कक्षेत येत नाही. अशा तलवारी फक्त भिंतींवर टांगण्यासाठी शो म्हणून केला जातो. अशा तलवारी आजही राजपूत, जाट यांच्यापासून ते अनेक मराठ्यांच्या घरामध्ये आपल्याला आढळतात. जुना वारसा असल्याने ऑफिशिअली ते ठेवू शकतात.
मात्र जर तलवार घातपात करू शकत असेल तर त्यासाठी आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा आहे. मात्र हे नेते केवळ शक्तीप्रदर्शन करण्यासाठी तलवार वापरतात आणि नंतर ती भिंतीवर टांगली जाते, म्हणून त्यावर गुन्हा होत नाही.
त्यात दुसरा वास्तविक मुद्दा असा की, हे फार मोठे नेते असतात तेव्हा त्यांच्यावर कोण गुन्हा दाखल करणार?
मग असं असताना आत्ताच गेल्या चार महिन्यांत असे गुन्हे का दाखल होऊ लागले आहेत? या नेत्यांच्या हातातील तलवार ‘ब्लंट’ नव्हती का? असं विचारल्यावर रोहन नहार यांनी सांगितलं की…
हा सर्व पॉलिटिकल होतंय. इतका मोठा मुद्दा नाही. कारण असं म्हटलं तर आधी घडलेल्या घटना देखील टेक्निकली चूक आहे, आर्म्स ऍक्ट अंतर्गत ते येतंच. मात्र आता सर्व मुद्दाम घडून आणलं जातंय.
अशाप्रकारे राजकीय नेत्यांचा तलवार प्रदर्शनाचा जुना इतिहास आणि अलीकडील ४ महिन्यांच्या घटना जर बघितल्या तर हे ठळकपणे जाणवतंय की,
‘सध्याच्या घटना पॉलिटिकल स्टंट आहेत’.
तुम्हाला याबद्दल काय वाटतं… तुम्हाला आढळले आहेत का अशा प्रकरणात कुणी राजकीय नेते? शिवाय गुन्हा दाखल होऊन पुढे त्यांच्यावर काय प्रक्रिया झाली आहे? आणि आताच्या घटनाक्रमावर काय मत आहे? नक्की कमेंट्समध्ये सांगा…
हे ही वाच भिडू :
- ओवेसी सांगतायत, मुस्लिम बांधवानो तुम्हाला तलवार नाही पेन जिवंत ठेवेल
- शरद पवार अध्यक्ष होतील पण UPA ची ताकद पहिल्यासारखी राहिली आहे का..?
- काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या बायोडेट्याचे कागद मुंबईतल्या भेळवाल्याकडे सापडले होते