बांग्लादेशातल्या हिंदू अत्याचारावर भारत सरकार डोक्यावर बर्फ ठेवून बसलाय
बांग्लादेशात हिंदूवरील अत्याचाराच्या घटना बऱ्याचदा समोर आल्या आहेत. म्हणजे पार स्वातंत्र्यापासूनचं या घटना अधूनमधून समोर येत असतात. आताही असाच काहीसा नवा वाद पुन्हा एकदा निर्माण झालाय. देवीच्या पूजा पंडालात मुस्लिम धर्माचा धर्मग्रंथ कुराण ठेवल्याच्या मुद्द्यावरून हा वाद सुरु झाला.
मंदिरं पाडली जातायेत, तिथल्या हिंदू समुदायातील लोकांना मारहाण केली जात आहे. या सगळ्याच गोष्टी आंतरराष्ट्रीय माध्यमांत झळकतायेत, सोशल मीडियावरही या गोष्टीचा विरोध होतोय. पण तिथलं शेख हसीना सरकार या सगळ्या गोष्टींवर हतबल होऊन बसलंय. कारण त्यांच्याकडे याशिवाय दुसरा कोणता पर्याय सुद्धा नाही. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपलं भारत सरकारनं सुद्धा यावर नरमाईची भूमिका घेतलीये.
आता यामागे अशी शक्यता वर्तवली जातेय कि, भारत सरकारला आपल्या आणि बांग्लादेशाच्या संबंधाची चिंता आहे. कारण बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यापासून नवी दिल्ली आणि ढाकामधील संबंध चांगलेच बनलेत. कारण बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यात भारताचे मोठे योगदान आहे.
त्यात भारताला बांग्लादेशाच्या लोकशाही व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे म्हंटले जातेय. कारण जी कोणती ठोस भूमिका घेतली नसली तरी बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी स्पष्ट केले की, “आमच्या देशात कट्टरतावादाला स्थान नाही. पंतप्रधान शेख हसीना यांनी स्पष्ट केले की आमच्या देशात कट्टरतावादाला स्थान नाही. ”
आता बांग्लादेशातल्या या परिस्थितीला तिथलं राजकारण असल्याचं देखील म्हंटल जातंय. कारण शेख हसीना २००९ पासून पंतप्रधान आहेत आणि त्याआधीही होत्या. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सत्ता आणि शक्तीसाठी तिथले विरोधी गट हे कट- कारस्थान करू शकतात.
सोबतच अफगाणिस्तानमधल्या तालिबानी सत्तेचा देखील इथे संबंध जोडला जातोय. कारण तालिबान्यांच्या सत्तेमुळे अतिरेकी आणि कट्टरपंथीयांचा उत्साह वाढलायं. मुस्लिम बहुल देशांमध्ये तर ही परिस्थिती जास्तचं गडद असल्याचे बोलले जातेय.
त्यामुळे भारत सरकार तडकाफडकी भूमिका न घेता या सगळ्या गोष्टींवर बारीक नजर ठेवून आहे.
आता हीच परिस्थिती जर पाकिस्तानमध्ये असती तर चित्र काहीस वेगळं असतं. म्हणजे भारतानं हा मुद्दा केव्हाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला असता. किंवा बॉर्डरवर याचं प्रतिउत्तर दिलं असतं. पण बांग्लादेशाबाबत भारताची जरा सावध भूमिका आहे. कारण भारताप्रमाणेच बांग्लादेशातही धार्मिक स्वातंत्र्य आहे. आणि धार्मिक स्वातंत्र्याबाबत पाकिस्तान आणि बांग्लादेशाची तुलना होऊ शकत नाही.
पाकिस्तान सरकार कट्टरतावादाने प्रभावित आहे. एवढेच नव्हे तर दहशतवादी संघटनांना आर्थिक मदतही करते. हे अतिरेक्याच्या इशाऱ्यावर काम करते, तर बांग्लादेशात तसे नाही. बांग्लादेशात सरकारच्या कामकाजात लष्कर हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे भारताकडून दोन्ही देशांसोबत अर्थातच वागणूक वेगवगेळी आहे.
त्यात, भारत आणि बांग्लादेशामधील संबंध आणखी नव्या स्तरावर तयार होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना नंतरच्या पहिल्या परदेशी दौऱ्यासाठी बांग्लादेशाची निवड केल्यानं यावरून दिसून येते. आणि हे फक्त एकाबाजूनेच नाही तर बांग्लादेश सुद्धा भारताबरोबरच्या संबंधांनाही तितकेच महत्त्व देत आहे.
त्यात सुरक्षेच्या दृष्टीनेही बांग्लादेश भारतासाठी खूप महत्वाचा आहे. ईशान्येकडील राज्यांना चीनच्या नजरेपासून वाचवण्यासाठी बांगलादेशशी कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरे म्हणजे, बांग्लादेशाची वाढती अर्थव्यवस्था भारताशी जोडल्यास दोन्ही देशांना मोठा फायदा होईल. इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे वाढते महत्त्व पाहता भारतासाठी बांग्लादेशची मोठी भूमिका असेल.
हे ही वाच भिडू :
- गांधीजींनी ज्या नौखालीला संप्रदायिकतेपासून वाचवलं होतं तेच आज बांग्लादेशात दंगलीत जळत आहे
- बांग्लादेशी पंतप्रधान म्हणतायत आमच्या हिंदूंवर हल्ले होतायत, भारताने जरा शिस्तीत वागावं.
- एका साध्या नियमाचा फायदा करुन घेत बांग्लादेशसारखा देश रेमडिसीवीरचा निर्यातदार बनला.