हजारों वर्षांपासून अलिबागच्या परिसरात ज्यू लोकं राहतात !
‘बेने इस्त्रायल’ हा भारतातील मराठी भाषिक ज्यू धर्मीय लोकांचा समुदाय. भारतातील ‘बगदादी ज्यू’ ‘कोचीन ज्यू’ आणि ‘बेने इस्त्रायल’ या ३ प्रकारच्या ज्यू समुदायातील ‘बेने इस्त्रायल’ हा समुदाय सर्वात मोठा समुदाय.
आजघडीला ‘बेने इस्त्रायल’ लोकांची संख्या कमी झालेली असली तरी थोड्याफार प्रमाणात का होईना त्यांचं आजही भारतात वास्तव्य आहे.
‘बेने इस्त्रायल’ या हिब्रू भाषेतील शब्दाचा अर्थ होतो ‘इस्त्रायलची लेकरे’.
‘बेने इस्त्रायल’ लोक भारतात नेमके कधी आले याबाबतीत अनेक मतप्रवाह बघायला मिळतात. साधारणतः अडीच हजार वर्षांपूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व सातव्या किंवा आठव्या शतकात इस्त्रायलमधील ज्यू लोक आपल्या जीविताच्या रक्षणासाठी भारतात स्थलांतरित झाली. अशी माहिती बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळते.
‘बॉम्बे गॅझेटीयर’नुसार हे लोक इ.स. पूर्व सहाव्या शतकात अडेन किंवा पर्शियन आखातातून भारतात आले असावेत. ‘हइम सॅम्युअल केहीमकर’ या बेने इस्त्रायल समुदायातीलच इतिहासकाराने ‘द हिस्ट्री ऑफ बेने इस्त्रायल’ या पुस्तकात लिहिल्यानुसार साधारणतः २००० वर्षांपूर्वी पॅलेस्टाइनमधून हा समुदाय भारतात स्थलांतरित झाला.
‘हइम सॅम्युअल केहीमकर’ यांच्याच पुस्तकातील संदर्भानुसार ‘बेने इस्त्रायल’ लोकांचं जहाज सर्वप्रथम भारताच्या दक्षिण किनाऱ्यावरील महाराष्ट्रातील तत्कालीन कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील ‘नौगाव’ किनाऱ्यावर समुद्रात बुडालं आणि त्यातून फक्त ७ जोडपी सुरक्षित वाचू शकली. याच जोडप्यांपासून पुढचा ‘बेने इस्त्रायल’ समुदाय भारतात विस्तारला.
समुद्रात जहाज बुडालेली असल्याने या ७ जोडप्यांकडे काहीच उरलेलं नव्हतं. अशावेळी त्यांनी उपजिवेकेसाठी आपल्याला अवगत असलेला तेल गाळण्याचा व्यवसाय करायला सुरुवात केली. या व्यवसायामध्ये ही लोक पारंगत होती. तेल गाळण्याच्या कामातून ते फक्त शनिवारच्या दिवशीच सुट्टी घेत असत, त्यामुळे ते ‘शनिवार तेली’ या नावाने देखील ओळखले जात असत.
केहीमकर यांच्यानुसार सतराव्या शतकात डेव्हिड राहाबी या कोचीन ज्यू माणसाने सर्वप्रथम या समुदायाला ज्यू धर्माची त्यांच्या आचार-विचाराची शिकवण दिली. त्यांना हिब्रू बोलायला-वाचायला आणि लिहायला शिकवलं.
दुसऱ्या मतप्रवाहानुसार ख्रिश्चन मशिनरीनी ‘बेने इस्त्रायल’ समुदायाला सुशिक्षित केलं. त्यांना हिब्रूसह इंग्रजी भाषेचं शिक्षण दिलं. त्यामुळे ब्रिटीश सरकारमध्ये अनेक ठिकाणी या लोकांना चांगल्या नोकऱ्या देखील मिळाल्या. हिब्रूचं ज्ञान अवगत झाल्याने समुदायाने आपल्या प्रार्थना मराठीमध्ये भाषांतरित केल्या.
अठराव्या शतकात ही लोक मोठ्या प्रमाणात कामाच्या निमित्ताने मुंबईतील मांडवी, भायखळा आणि माझगाव परिसरात स्थायिक झाले. मुंबईमध्ये त्यांनी आपली प्रार्थनास्थळे म्हणजेच ‘सिनेगॉग’ उभारली. आजघडीला देखील ही प्रार्थनास्थळे बघायला मिळतात. अर्थात आता तिथे मोठ्या प्रमाणात शुकशुकाट बघायला मिळतो. प्रार्थनास्थळांबरोबरच या लोकांनी उभारलेल्या लायब्ररी आणि हॉस्पिटल देखील आपल्याला बघायला मिळतात.
मुंबईतली पहिली दंगल कुत्र्यांमुळे झाली होती, ती पण खऱ्याखुऱ्या !!!
शिवाजी महाराज वंद्य, पण शिवाजी महाराजांचा मुंबईशी काय संबंध- सर फिरोजशाह मेहता.
महाराष्ट्रातील अनेक शतकांच्या वास्तव्यात या लोकांनी महाराष्ट्रीयन संस्कृती आत्मसात केली.
ते ज्या ज्या गावात स्थायिक झाले त्या गावाच्या नावावरूनच त्यांची नावे पडली. जसे की हइम सॅम्युअल केहीमकर किंवा राचेल गडकर किंवा एडविन रोहेकर इ. त्यांच्या एकूण राहणीमानावर आणि खाद्यसंस्कृतीवर देखील मराठी संस्कृतीचा प्रभाव बघायला मिळतो.
१९४८ साली इस्त्रायलची हे स्वातंत्र्य राष्ट्र म्हणून उदयास आले.
त्यानंतर भारतातील अनेक इस्त्रायल लोक तिथे जाऊन स्थायिक व्हायला लागले. तिथे त्यांना अनेक सेवा आणि सुविधा मिळायला लागल्या. शिवाय इस्त्रायलच्या आर्थिक प्रगतीचे लाभ त्यांना देखील मिळाले. १९४८ साली भारतात असलेली २०००० ज्यूंची संख्या १९६१ पर्यंत १६००० पर्यंत आली आणि आजघडीला देशात जवळपास ५००० च्या आसपास ज्यू लोक राहतात.
इस्त्रायलमध्ये जाऊन देखील ही लोक त्यांचं भारताशी असलेलं नातं विसरली नाहीत. भारतातून इस्त्रायलवा स्थलांतरित झालेली लोक तिथे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांव्यतिरिक्त १ मे हा ‘महाराष्ट्र दिन’ देखील मोठ्या उत्साहात साजरा करतात.