महाराष्ट्रातील पहिला कोरोनमुक्त जिल्हा होण्याचा बहुमान भंडाऱ्यानं मिळवलाय.
महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूच्या व्हायरसचे नवीन प्रकार सापडत आहेत. अशातच देशभरात तिसऱ्या लाटेचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावत असतानाच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे. राज्यातील भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. या जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. संपूर्णपणे कोरोनामुक्त होणारा भंडारा हा पहिलाच जिल्हा ठरला आहे.
पण जिल्हा कोरोनमुक्त होण्यामागे भंडारा जिल्ह्याच्या प्रशासनाचे आणि आरोग्य यंत्रणेचे यामागे अथक परिश्रम आहेत. यासाठी कराव्या लागलेल्या उपाययोजनांचा बोल भिडूने घेतलेला आढावा.
तर मागच्या वर्षी म्हणजे मार्च २०२० मध्ये कोरोना वाढू नये म्हणून पहिलं लॉकडाऊन जाहीर झालं. यात २७ एप्रिल मध्ये गराडा बुद्रुक गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तर १२ जुलै २०२० मध्ये कोरोना रुग्णाचा पहिला बळी गेला होता.
बरोबर एका वर्षानंतर म्हणजेच १२ एप्रिल रोजी जिल्ह्यात सर्वाधिक १५९६ नवीन रुग्ण आढळले होते. तर १८ एप्रिल २०२१ रोजी १२ हजार ८४७ कोरोनाचे ऍक्टिव्ह पेशंट होते. १ मे २०२१ रोजी एकाच दिवशी ३५ लोक कोरोनाने मृत्युमुखी पडले होते. तर आजअखेर पर्यंत जिल्ह्यात ११३३ लोक कोरोनाने मृत्युमुखी पडले.
भंडारा जिल्हा तसा आदिवासीबहुल जिल्हा. पायाभूत सुविधांची इथं कमतरता. त्यामुळे वर दिलेली आकडेवारी ही खाजगी आरोग्य यंत्रणा बघता जिल्ह्यासाठी जास्तीचीच. त्यात आणि अचानक दुसरी लाट आल्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. दुसऱ्या लाटेचा प्रभाव जून महिन्याच्या मध्यापर्यंत कायम होता. पण इथल्या स्थानिक प्रशासनने आणि सरकारी आरोग्य यंत्रणेने उपलब्ध संसाधनांचा वापर करून इथली रुग्णसंख्या घटवलीच नाही तर राज्यात संपूर्णपणे कोरोनामुक्त होणारा हा पहिलाच जिल्हा ठरला आहे.
आता यासाठी आरोग्य प्रशासनाने कशा पद्धतीने काम केले यासाठी बोल भिडूने भंडारा जिल्ह्याच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फारुकी यांच्याशी संपर्क साधला. बोल भिडूच्या प्रतिनिधीने त्यांनी राबविलेल्या उपाययोजनांसंबंधी काही प्रश्न विचारले, त्याला अनुसरून डॉ. फारुकी यांनी दिलेली उत्तरे..
१. भंडारा जिल्ह्यात कशाप्रकारे उपाययोजना राबविल्या ?
ट्रेसिंग, टेस्ट व ट्रिटमेंट या त्रिसुत्री सोबतच योग्य नियोजन व सामूहिक प्रयत्नामुळे भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला असून उपचाराखाली असलेल्या एकमेव रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. १५ महिन्यानंतर जिल्हा कोरोनामुक्त झाला. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, त्यांची तपासणी-चाचणी व त्यावर वेळेत उपचार या सूत्राचा अवलंब करण्यात आला. त्याचाच परिणाम म्हणून रुग्ण संख्या आटोक्यात आली.
आज ५७८ व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली नाही. आतापर्यंत ४ लाख ३९ हजार ८३२ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ५९ हजार८०९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या तर ५५८ हजार ६७६ व्यक्ती कोरोना आजारातून बऱ्या झाल्या. जिल्ह्यात आज एकही कोरोना रुग्ण शिल्लक नाही. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर ०१.८९ टक्के एवढा आहे.
२. शासकीय यंत्रणेचा वापर कसा केला ? त्यात कोणत्या अडचणी आल्या ?
आरोग्य यंत्रणेने आणि जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेने हातात हात घालून काम केले आहे. म्हणजे दोन्ही यंत्रणांमध्ये ताळमेळ होता. पोलीस प्रशासनाने लॉकडाउनच्या काळात चांगले काम केले. यात कोणत्याही एका डिपार्टमेंटचे श्रेय नाही.
३. आज अखेर पर्यंत जिल्ह्यात किती लसीकरण झालंय ?
जिल्ह्याला ९ लाख ६५ हजार ५०७ लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असून त्यापैकी ४ लाख ६ हजार ३३१ व्यक्तींनी पहिला तर १ लाख ३८ हजार ३४१ व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्याला आतापर्यंत कोविशिल्ड लसीचे ३ लाख २४ हजार ८६० व कोव्हॅक्सिन लसीचे २ लाख ४९ हजार ३७० असे एकुण ५ लाख ७४ हजार २३० डोस प्राप्त झाले आहेत. कोविशिल्डचे ३ लाख ११ हजार ८६० व कोव्हॅक्सिनचे १ लाख ८७ हजार ३७० डोस वापरण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात कोविशिल्डचे १३ हजार व कोव्हॅक्सिनचे ६२ हजार असे एकुण ७५ हजार डोस उपलब्ध आहेत.
आरोग्य यंत्रणेने लसीकरणासाठी अगदी शेवटच्या पातळीपर्यंत प्रबोधन केले. लसीकरणाबाबत लोकांच्या मनात बऱ्याच शंका होत्या. त्या शंकांचं निरसन करणं खरे पाहिलं तर आरोग्य यंत्रणेची जबाबदारी होती. यासाठी आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी आशा सेविकांचा एकदम प्रभावी वापर केला. लसीकरणासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आली.
४. राज्य शासनाच्या ब्रेक द चेनला अनेक जिल्ह्यात विरोधाला सामोरं जावं लागलं ? भंडारा जिल्ह्याची काय परिस्थिती होती ?
खर तर हा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून कोविड प्रोटोकॉलचे पालन केल्यामुळेच या आजारापासून दूर राहणे शक्य झाले. यात आरोग्य विभागाला आणि प्रशासनाला भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य केले.
ब्रेक द चेन अंतर्गत व्यापार व्यवसाय रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. सर्व व्यापारी व दुकानदारांसाठी आपल्याकडे असलेल्या नौकरदार व्यक्तींचे लसीकरण करुन घेण्यात आले. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. या ठिकाणीसुध्दा विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राध्यान्याने करण्यात आले.
प्रशासनामार्फत वेळोवेळी व्यापारी वर्गाच्या मिटिंग आयोजित करण्यात आल्या. त्याला व्यापाऱ्यांचे सहकार्य लाभले. यामुळेच आज जिल्ह्यात क्रियाशील रुग्णांची संख्या शून्य झाली आहे. पण तरी ही धोका टाळलेला नाही. तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागणार आहे. नागरिकांनी याआधी जसे नियमांचे पालन करुन असेच सहकार्य केले यापुढेही असेच सहकार्य प्रशासनाला करावे.
म्हणजे महाराष्ट्राच्या नकाशावर अत्यंत दुर्गम अशी ओळख असणाऱ्या भंडारा जिल्ह्याने कोरोनामुक्त पहिला जिल्हा ठरणे ही खूप प्रशंसनीय बाब आहे. यासाठी प्रशासनाचे सामूहिक प्रयत्न व नागरिकांचे सहकार्य महत्वाचे ठरले आहे. भंडारा जिल्ह्याचा हा आदर्श राज्यातील किंबहुना देशातील प्रत्येक जिल्ह्याने घ्यावा असाच आहे.
हे ही वाच भिडू
- लसीकरणात मुंबई पहिला तर हिंगोली शेवट ; कोणता जिल्हा कितव्या क्रमांकावर
- भंडाऱ्यामध्ये नेमकं काय घडलय..?
- कोरोनामुक्त गावांसाठी स्पर्धा म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात जाण्याचा प्रकार आहे.