उद्धव ठाकरेंवर नाराज होऊन पक्ष सोडलेले पहिले शिवसैनिक म्हणजे भास्कर जाधव
पक्ष आला तर फुटाफुटी होणार, सत्तेत गेल्यावर नाराजी रुसवे फुगवे हे असणार, राजकारणात सहसा हे गृहीतच धरले जाते. पण इतर पक्षांची गोष्ट वेगळी आणि शिवसेनेची गोष्ट वेगळी. इथे पक्षांतर खपवून घेतली जात नाही. छगन भुजबळ यांच्यावेळी गद्दारी केली म्हणून शिवसैनिक त्यांच्या जीवावर उठले होते.
भुजबळांच्या पक्षांतरानंतर कित्येक वर्ष शिवसेना सोडण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं.
शिवसेनेतील असंतोष वाढला उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष केल्यानंतर. राज ठाकरे, नारायण राणे असे दिग्गज नेते नाराज होते. पुढे त्यांनी शिवसेनेला रामराम केलाच. पण त्यांच्याही आधी शिवसेना सोडणारा पहिले मोठे नेते होते. भास्करराव जाधव.
सध्या शिवबंधन बांधून पुन्हा शिवसैनिक झालेले भास्कर जाधव काहीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. पण त्यांच्या राजकारणाची सुरवात शिवसेनेतूनच झाली होती.
भास्कर जाधव सांगतात, आमच्या बापजन्मात कोणीही राजकारणी नाही. तरीही बाळासाहेबांनी आम्हाला व्यासपीठ दिले.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात भास्कर जाधवांनी १९८४ पासून शिवसेनेत काम करण्यास सुरवात केली. पूर्वापार कोकणी माणसाला मुंबईचे आकर्षण राहिले आहे, त्यामुळेच सेना व बाळासाहेब ठाकरे यांची मोहिनी कोकणात राज्याच्या आधी सुरु झाली.
भास्कर जाधवांनी जिल्हापरिषदेतून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांचा स्वभाव पूर्वीपासून जहाल व फटकळ होता. एकदा शिवसेनेकडून जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले. पण, नंतर ज्येष्ठ असे पंडित गुरुजी यांना काँग्रेसने तिकीट दिले नाही तर शिवसेनेकडून तिकीट दिले जाणार असल्याचे सांगितलं.
भास्कर जाधव लगेच दत्ताजी नलावडे यांच्याकडे गेले. खरं तर शिवसेनेत का नाव दिले आणि का काढले, हे विचारायचे नसते. पण, जाधवांनी दत्ताजींना विचारले,
जर पंडित यांना काँग्रेसने तिकीट दिले नाही तर आपल्याकडून देणार आणि काँग्रेसने तिकीट दिले तर मला सेनेकडून तिकीट दिले जाईल, हे मी मान्य करणार नाही. कोणी खाल्ल्यालं उष्ट मी खात नाही व खाणार नाही.
एकदा बाळासाहेब ‘मीनाताई यांच्यासोबत रत्नागिरी येथे आले होते. मनोहर जोशी यांचा भास्करराव जाधवांना उमेदवारी देण्यास सक्त विरोध होता. मराठा उमेदवार दिल्यास जिल्हापरिषदेतील आपली सत्ता जाईल असं त्यांचं म्हणणं होतं.
त्यावेळी बाळासाहेब म्हणाले,
भास्कर हा प्रामाणिक कार्यकर्ता आहे व अशा कार्यकर्त्यांसाठी सत्ता आली नाही तरी हरकत नाही पण, मी भास्करलाच उमेदवारी देणार आहे. पंत माझा निर्णय झाला.
सगळे विरोध असतानाही बाळासाहेबांनी दिलेला शब्द त्यांनी पाळला. पुढे भास्करराव जाधवांनी आमदारकीला देखील बाजी मारली. १९९५ आणि १९९९ असे दोन वेळा ते चिपळूणमधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून आले.
२००४ साली मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. असं म्हणतात कि त्याकाळी शिवसेनेकडून एक सर्व्हे करण्यात आला होता. त्या सर्व्हेतून भास्कर जाधव पराभूत होतील असं समोर आलं. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या सल्ल्याने हा सर्व्हे घेतला होता असं म्हणतात.
याच सर्व्हेचा आधार घेऊन शिवसेनेनं भास्कर जाधवांचं तिकीट नाकारलं.
इतकंच नाही तर शिवसेनाप्रमुखांना भेटायला मातोश्रीवर आलेल्या भास्कर जाधवांना त्यावेळी ताटकळत ठेवलं गेलं. त्यामुळे ते भावनाविवश झाले होते. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्यावर तोफ डागत शिवसेना सोडली होती.
शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरेंच्या हातात आल्यापासून पक्ष सोडणारे पहिले मोठे नेते म्हणजे भास्कर जाधव ठरले. त्यावर्षीच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. या निवडणुकीत सेनेचा आणि भास्कर जाधवांचा दोघांचाही पराभव झाला.
नाराज भास्कर जाधवांना शरद पवारांनी संधीचा फायदा उठवत आपल्या पक्षात ओढून घेतलं. कोकणात राष्ट्रवादीचा जम बसवण्यासाठी व शिवसेनेला आव्हान निर्माण करू शकणारा त्यांना एक नेता हवाच होता. पवारांनी जाधवांना मोठं बळ दिलं. त्यांना नगरविकास मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद देखील दिलं.
राष्ट्रवादी रमलेल्या भास्कर जाधवांची एकदा जलील पारकर यांच्यासोबत भेट झाली. त्यांनी थेट बाळासाहेबांशी फोन लावून दिला. तेव्हा बाळासाहेब म्हणाले,
भास्कर तुझ्यावर आमच्याकडून अन्याय झाला आहे. तुझं काम चांगलं सुरू आहे, तुझा चांगला उत्कर्ष होईल, असा आशीर्वादही त्यांनी दिला.
भास्कर जाधव म्हणतात, बाळासाहेब बोलल्याने तेव्हा मन हलकं झालं होतं.
२०१९ सालच्या निवडणुकीआधी भास्कर जाधव पुन्हा नाराज असल्याची चर्चा रंगू लागली. सत्तेच्या बाहेर फेकल्या गेलेल्या राष्ट्रवादीला मोठी गळती लागली होतीच. अशातच भास्कर जाधव देखील पुन्हा सेनेत जाणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. उद्धव ठाकरेंसोबतचे वाद त्यांनी मिटवले असल्याचं बोललं गेलं.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधवांना खास विमानाने औरंगाबाद येथे पाठवून त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला लावला आणि शिवबंधन बांधण्यात आलं. भास्कर जाधवांच्या या युटर्नमुळे सत्तेसाठी त्यांनी पक्ष बदलला असल्याची टीका राष्ट्रवादीने केली.
मोठा विरोध असूनही भास्कर जाधवांनी मात्र गुहागर येथे विधानसभा जिंकून आपली हॅटट्रिक पूर्ण केली.
पण निकालानंतर पुन्हा राजकीय गणिते बदलली. शिवसेनेने भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी, काँग्रेस बरोबर आघाडी केली आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद पटकवलं. भास्कर जाधव यांना मात्र सत्तेत आल्याचा काही लाभ मिळाला नाही. एकेकाळी प्रदेशाध्यक्षपद भूषविलेल्या जाधवांना यंदा साधं मंत्रिपद देखील मिळालं नाही. पुन्हा ते शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. प्रताप सरनाईक यांच्या पाठोपाठ भाजपकडे ओढा असलेल्या नेत्यांमध्ये त्यांच्या नावाची देखील शक्यता असल्याचं बोलून दाखवलं जातं.
हे ही वाच भिडू.
- फक्त सरनाईकच नव्हे तर सेनेत अस्वस्थ असणाऱ्या नेत्यांची एक फौजच तयार झालेय….
- त्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.
- अहमद पटेलांनी नारायण राणेंना तीन वेळा साफ गंडवलं.