प्रेक्षकांना डोळ्यांतून प्रेमाची भाषा शिकवलेला सुपरस्टार म्हणून राज कपूर आजही लक्षात आहे…

आपल्यातून जावून पस्तीस वर्षाचा कालावधी उलटला असला तरी राज कपूरच्या लोकप्रियतेत जागतिक पातळीवर तसूभरही घट झालेली दिसत नाही.

राज प्रामुख्याने ओळखला जातो त्याच्या स्वत:च्या आर के बॅनरमुळे.

वयाच्या २४ व्या वर्षी त्याने १९४८ साली ‘आग’ हा  पहिला चित्रपट आपल्या आर के या चित्रसंस्थेद्वारे बनविला. तिथून पुढच्या तीन दशकात आर के चा जबरदस्त करीष्मा जारी होता.असं असलं तरी राज कपूरने आरकेच्या बाहेरील चित्रपटात ज्या भूमिका केल्या त्या देखील काही कमी मोलाच्या नव्हत्या. या सिनेमांबाबत आणि व्यक्तीरेखांबाबत तसं फार कमी बोललं जातं.

आज राजच्या जयंतीच्या निमित्ताने त्याच्या आर के बाहेरच्या भूमिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात आढावा घेवूयात…

१९४९ साली दिग्दर्शक मेहबूब यांनी राज कपूर दिलीप कुमार आणि नर्गिस या तिघांना एकत्र घेऊन अंदाज या चित्रपटाची निर्मिती केली होती. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये नाविन्याची लाट आली होती आणि या लाटेचे प्रतिनिधित्व करणारा हा चित्रपट होता. शहरी कथानक, कलाकारांचा अप्रतिम अभिनय आणि सुमधुर संगीत यामुळे या चित्रपटाला चांगले यश मिळाले. त्यातील तिन्ही कलावंतांची कामे जबरदस्त झाली होती. विशेषत: राज कपूर याच्यातील अभिनयाचा ‘स्पार्क’ चांगला दिसून आला.

१९५० साली केदार शर्मा यांचा ’बावरे नैन’ हा चित्रपट आला होता. केदार शर्मांचे राजच्या जीवनात स्थान या करीता महत्वाचे होते की त्यांनीच त्यांच्या ’नीलकमल’ (१९४७) द्वारे राजला नायक बनवले होते. ‘बावरे नैन’ मध्ये गीताबाली त्याची नायिका होती. रोशन यांनी संगीत दिलेल्या या चित्रपटातील ‘खयालो में किसीके इस तरह आया नही करते’, ‘सुन बैरी बलम सच बोल’आणि ‘तेरी दुनियामें दिल लगता नही वापस बुला ले’ ही अप्रतिम गाणी या प्रणयी त्रिकोणाच्या सिनेमाला हिट करण्यासाठी पूरक होती.

राज-नर्गीस यांनी एकूण १६ चित्रपटात एकत्र काम केले.त्या पैकी आर के बॅनरचे सहा सिनेमे होते . आर के बाहेरच्या १९५६ सालच्या ’चोरी चोरी’ चा उल्लेख महत्वपूर्ण ठरावा. मूळात हा सिनेमा ’इट हॅपन्ड वन नाईट’या हॉलीवूड च्या सिनेमावर बेतला होता .यातील शंकर जयकिशनची गाणी अतिशय मधाळ आणि मनाला रूंजी घालणारी होती. ’रसिक बलमा’,’आजा सनम मधुर चांदनी में’,’जहां मै जाती हूं वही चले आते हो’, ‘ये रात भीगी भीगी ‘पंछी बनू उडती फिरू’ हि गाणी इतक्या वर्षांनंतर आजही मनाला धुंद करतात.

राजच्या अभिनयाचा खरा कस ज्या सिनेमात लागला तो होता १९५८ च्या ’फिर सुबह होगी’ या रमेश सैगल यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमात…

हा चित्रपट डोस्डोव्हस्कीच्या ‘क्राईम अ‍ॅंड पनिशमेंट’वर आधारीत होता. साम्यवादी विचारांचा उघड उघड प्रचार करणारा हा सिनेमा अप्रतिम जमून आला होता.यात त्याच्या जोडीला माला सिन्हा होती.डाव्या विचारसरणीच्या साहिरच्या आशयघन काव्याला खय्यामचे संगीत होते. ’वो सुबहा कभी तो आयेगी’, ’फिर न किजिए मेरी गुस्ताख निगाहोंका गिला’, ’चीनो अरब हमारा’ या गीतांनी आणि राजच्या अप्रतिम अभिनयाने हा सिनेमा सर्वाथाने वेगळा ठरला.

१९५९ साली ऋशिकेश मुखर्जी यांचा ’अनाडी’ चित्रपट आला यात राज सोबत नूतन होती. यात मात्र राजने आपल्या आर के च्या ट्रॅंपलाच रीपीट केले होते. ’दिल के नजरसे’, ’किसीके मुस्कुराहटो पे हो निसार’, ’तेरा जाना दिल के अरमानोका लूट जाना’, ’सब कुछ सीखा हमने’, ’वो चांद खिला वो तारे हंसे’ हि गाणी व हा चित्रपट राजला त्या वर्षीचे फिल्मफेअर देवून गेला.

यानंतर साठच्या दशकात ’दिल हि तो है’, ’छलिया’, ’आशिक’,नजराना’, ’दुल्हा दुल्हन’ असे रोमॅंटीक सिनेमे येत गेले. पण १९६६ साली आलेला ’तीसरी कसम’ एकूणच सिनेमाच्या इतिहासात एक वेगळा प्रयत्न होता. संवेदनशील मनाच्या शैलेंद्रची हि निर्मिती होती. यात राजच्या जोडीला वहिदा होती.

अतिशय मनापासून बनवलेल्या अभिजात कलाकृती शापीत ठरतात. या चित्रपटाबाबत हाच प्रत्यय आला. यात राजने रंगवलेला भोळा भाबडा हिरामण गाडीवान अप्रतिम होता.

सत्तरच्या दशकात राज चरीत्र भूमिकांकडे वळला खरा पण १९८० सालच्या संजय खानच्या ‘अब्दुल्ला’चा अपवाद वगळता त्याच्यातील अभिनेत्याचा उपयोग फारसा करून घेतला नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.