कोल्हापूरचे जावयबापू देशाचे गृहमंत्री झाले !

अमित शहा,

Love me or hate me but you can’t ignore me.. 

हे वाक्य तंतोतंत लागू होणारे नेते म्हणजे अमित शहा. काल अमित शहांनी मंत्रीपदाती शपथ घेतली आणि आज ते देशाचे गृहमंत्री झाल्याची बातमी आली. कोणी अमित शहांवर टिका करण्यास सुरवात केली तर कोणी कौतुकसोहळा चालू केला. पण एक गोष्ट नक्की, कोणताच व्यक्ती गृहमंत्री अमित शहा यांचा अनुल्लेख करुन पुढे जावू शकला नाही. कदाचित हित ताकद अमित शहांना “शाह” बनवते.

अमित शहा यांच्या अशाच काही भन्नाट गोष्टी खास गृहमंत्री झाल्यानिमित्त “बोलभिडू” वाचकांसमोर मांडत आहोत.

कोल्हापूरच्या पद्माराजे गर्ल्स हायस्कुलमध्ये शिकलेल्या सोनल शहा यांच्यासोबत त्यांच लग्न झालं. अनेकांना “अमित शहा” या नावातली ताकद समजल्यानंतर समजलं की ते कोल्हापूरचे जावई आहेत. असो तर काही वर्षांपुर्वी त्यांच्या पत्नी सोनल शहा या कोल्हापूरात आलेल्या. शाळेतल्या मैत्रीणांना त्या भेटल्या. कोल्हापुरविषयी बोलताना म्हणाल्या आजही कोल्हापूर तसच आहे. तांबड्या पांढऱ्या रस्स्याच्या अभिमानात अजून एका अभिमानाची भर पडली. 

अख्या कोल्हापूरकरांसाठी ते जावयबापू झाले. हे प्रेम देखील इतक होतं की एकदा चंद्रकांत पाटलांना जाहिर सांगावं लागलं की, बाबांनो मी कोल्हापुरचा आहे म्हणून अमित शहा मला स्पेशल ट्रिटमेंट देतात अस नाय रे !!! 

राजकारणात शहा, शहनशहां, चाणक्य अशा अनेक विशेषणांनी नावाजले जाणारे अमित शहांनी मात्र हे सगळं एकाच दिवसात मिळवलं नाही हे नक्की. प्रत्येक गोष्टींच्या पाठीमागे लावून धरण्याचा एक स्वभाव असतो. महाराष्ट्रात त्याला चिकाटी म्हणलं जातं आणि कोल्हापूरात लावून धरणं म्हणलं जातं. तालमीत अनेक डाव असतात. डाव शिकताना लावून देखील धरावं लागतं. कोल्हापूरचे जावाई म्हणून अमित शहा यात फिक्स बसतात.

१) माणसं हेरणारा माणूस. 

काळ आहे नव्वदीचा. अस सांगितलं जातं की १९९० च्या कुठल्यातरी काळात अमित शहा आणि मोदी गुजरातमधल्या कोणत्यातरी रेस्टॉरंटमध्ये बसले होते. इथेच अमितभाई मोदींना म्हणाले, तुम्ही पंतप्रधान होणार. आजही अनेकांकडून हा किस्सा सांगितला जातो. किस्सा खरा की खोटा हा नंतरचा प्रश्न पण हा किस्सा तयार होतो त्यांची कारण अनेक आहेत. 

अमित शहांचा सदरा म्हणजे सुखी माणसाचा सदरा होता. घरचा मोठ्ठा बिझनेस. अशा वेळी अमित शहा राजकारणात आले. मोदी तेव्हा प्रचारसेवक म्हणून काम पहायचे. १९८२च्या आसपास मोदी आणि शहांची पहिली भेट झाली. त्यानंतरच्या वर्षभरात शहांनी ABVP जॉईन केली होती. १९८५ च्या सुमारास त्यांनी BJP पक्षात सक्रिय सहभाग घेतला आणि त्यानंतरच्या एक वर्षातच मोदींनी BJP पक्षात सहभाग घेतला. तस म्हणायला गेलं तर अमित शहा मोदींना सिनियर. 

पण या माणसात माणसं ओळखण्याची विलक्षण ताकद. मित्र लक्षात ठेवायचे आणि शत्रू विसरायचे नाहीत अस यांच काम चालायचं. त्यातून मैत्री झाली आणि मैत्रीचे किस्से झाले. 

राजकारणातल्या गप्पांमध्ये अनेकजण अमित शहांजवळ रडल्याचं सांगतात, अमित शहा चांगल्याला चांगलच लक्षात ठेवतात. 

Screen Shot 2018 10 22 at 7.27.25 PM

२) जातीच्या विरोधात इकॉनॉमिक्स मॉडेल. 

अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंक. या बॅंकेत कधी काळी पटेल आणि क्षत्रिय समाजाचं वर्चस्व होतं. इथ दूसरा माणूस आत जायचा विचार देखील करायचा नाही. अशा काळात कोणास ठावूक कसे पण अमित शहा या बॅंकेच्या अध्यक्षपदी निवडून आले. एका वर्षात देशातील सर्वात मोठ्या बॅंकापैकी एक असणाऱ्या बॅंकेस फायद्यात आणलं. साहजिक चर्चा तर होणारच !! 

पण चर्चा झाली ती जातीच्या पलिकडच्या इकोनॉमिक्स मॉडेलवर. आर्थिक फायदा हा जातीव्यवस्था टॅकल करण्यासाठी योग्य आहे हे कृतीतून दाखवून दिलं. हाच फॉर्म्युला सक्सेस झाला. थोडक्यात काय कधीकाळी ब्राम्हण आणि बनियांची पार्टी म्हणून ओळख मिळवलेल्या पार्टीच्या पदरात दलित व्होट बॅंक टाकणं सोप्पी गोष्ट नाही. 

३) दूसऱ्या फळीतल्या माणसांना जोडणं. 

१९९५ साली गुजरातच्या मातीत कमळ फुललं. केशभाई पटेल मुख्यमंत्री झाले. याला कारण होतं मोदी आणि शहा. मोदी आणि शहांची सुरवातीची स्ट्रॅटेजी अशी होती की प्रत्येक भागातला दुसऱ्या नंबरचा नेता आपल्या पक्षात घ्या. त्याला ताकद त्या आणि निवडुन आणा. 

मोदी आणि शहांची २०१४ आणि २०१९ ला देखील पद्धत तीच होती. दोन नंबरची माणसं हेरणं त्यांना ताकद देणं. खासदारकीपासून नगरसेवकांपर्यन्त हिच पद्धत अंमलात आणली गेली. त्यातून BJP नवी माणसं दाखलं झाली. चप्पा चप्पा भाजप हे गप्पा मारून होतं नाही. म्हणूनच या पक्षाचा उल्लेख जगातील सर्वात जास्त सदस्य असणाऱ्या पक्षांच्या यादीत घेतला जातो. 

४) २७ वर्षांहून अधिक काळ निवडणुकांची स्ट्रॅटेजी ठरवणारा नेता. 

१९९१ साली अडवाणींच्या प्रचाराची जबाबदारी अमित शहांनी मागून घेतली होती. १९९५ च्या दरम्यान भाजप सत्तेत आणण्यात त्यांचा वाटा देखील होता. त्यानंतर ते पोटनिवडणुकीत निवडून आले. इलेक्शन कस जिंकल जातं यात ते बाकबगार आहेत हे सांगण्यासाठी आज कोणत्याच राजकिय विश्लेषकाची गरज नाही.

मोदींचा उल्लेख आज प्रत्येकजण सर्वात जास्त दौरे आखणारे नेते म्हणून करतात पण या वर्षीच्याच आकडेवारीत सांगायचं तर भाजपा अध्यक्ष म्हणून अमित शहा यांनी वर्षाभरात १५० वरती दौरे पुर्ण केले आहेत. दररोज ६०० किलोमीटर प्रवास करणारा नेता म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. (यात हेलिकॉप्टर आणि विमान देखील येत बर कां) बर इतकं फिरुन ते काय करतात तर पन्ना मंत्री, बुथ असा अभ्यास. तळ ठोकून राहणं आणि अचूक घुसणं हे त्यांना चांगलच जमतं हे आत्तापर्यन्त दिसून आलेलच आहे. 

५) मिनीमंत्रीमंडळ ते वाईट काळ भोगणारा नेता.

सध्याच्या घडीला असे खूप कमी नेते आहेत ज्यांनी चांगल आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी पाहिल्या आहेत. कधी जेल मध्ये राहिलेला नेता, गुजरातमधून तडीपार व्हावं लागणारा नेता ते थेट आज आसेतू हिमालय सत्ताप्राप्तीसाठी झपाटून काम करणारा आणि विजय मिळवणारा नेता अशी ओळख त्यांना मिळाली आहे. २००२ च्या मंत्रीमंडळात गृहखात्यासहित त्यांच्याकडे ११ विभागांचा चार्ज होता.

मोदी पंतप्रधान होताच ते आत्ता गुजरात संभाळतील अशा चर्चा होत असताना त्यांच्याकडे संपुर्ण भाजपची जबाबदारी देण्यात आली. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत “मोदी सरकार” आणण्याच काम त्यांनी निर्विवाद पार पाडलं. आज ते देशाचे गृहमंत्री झाले. त्यांच्याकडून चांगल काम व्हावं हिच सदिच्छा.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.