अण्णाद्रमुक, लोकजनशक्ती पार्टी आणि अपना दलाच्या पक्षफुटींमध्ये भाजपची भूमिका राहिली आहे
शिवसेनेमध्ये झालेली बंडाळी अजून काय थांबण्याचं नाव घेत नाहीये. आमदारांच्या फुटीने सत्ता गेल्यानंतर आता नगरसेवकांनी नंबर लावला आहे आणि त्यानंतर खासदारदेखील बंडाचा झेंडा हातात घेतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
त्यात डॅमेज कंट्रोलमध्ये उतरत शिवसेनेनं भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला मात्र राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाला भाजपने बैठकीसाठी निमंत्रण दिले आहे. शिंदे गटाकडून दीपक केसरकर हे दिल्लीच्या बैठकीला जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळं आधी शिवसेनेतून शिंदे गटाला बाहेर काढण्यात आणि आता शिंदे गटामागे सर्व ताकदीनिशी उभं राहण्यात भाजप पुढं असणार आहे.
मात्र याआधी जर भाजपने बाकीच्या पक्षपुटींमध्ये घेतलेली भूमिका पहिली तर तुम्हाला यात काय वेगळं वाटणार नाही.
अपना दल
आता पार्टी तेवढी फेमस नाहीये त्यामुळं म्हणत असाल तर तुम्ही या पक्षाला जरा जास्त हलक्यात घेताय. एनडीएमध्ये घटक पक्ष असलेल्या अपना दल (सोनेलाल) पक्षाचे उत्तरप्रदेश विधानसभेत १२ आमदार आहेत आणि पक्षाच्या प्रमुख अनुप्रिया पटेल या मोदी मंत्रिमंडळात मंत्री आहेत. तर अपना दल (कमेरावादी) या गटाचा एकच आमदार असला तरी तो उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांना हरवून निवडून आला आहे.
पक्षात हे दोन गट पडले होते भाजपशी युती झाल्यानंतर.
बहुजन समज पक्षातून बाहेर पडल्यानंतर सोनेलाल पटेल यांनी उत्तरप्रदेशमधील कुर्मी व्होट बँक संघटित करण्यासाठी स्वतःचा पक्ष स्थापन केला. २००९ मध्ये सोनेलाल पटेल यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांची पत्नी कृष्णा पटेल यांनी अपना दलाची कमान हाती घेतली. कृष्णा पटेल यांच्यासोबत त्यांची मुलगी अनुप्रिया पटेल हिने वडिलांचे राजकारण पुढे नेण्यासाठी राजकीय संघर्ष सुरू केला.
२०१२ मध्ये अनुप्रिया पटेल आमदार देखील झाल्या. २०१४ मध्ये अपना दलाने भाजपशी युती केली. त्यानंतर अनुप्रिया पटेल मिर्झापूर इथून खासदार म्हणून निवडून गेल्या.
मग अनुप्रिया पटेल यांच्या विधानसभेच्या जागेवर लढण्यासाठी त्यांच्या आई कृष्णा पटेल उत्सुक होत्या मात्र अनुप्रिया पटेल त्यांच्या नवऱ्याला या जागेवरून उमदेवार देण्याच्या बाजून होत्या.
त्यामुळे आई विरुद्ध सक्खी पोरगी असा पक्षात संघर्ष चालू झाला. विधानसभा तिकीट भेटूनही कृष्णा पटेल यांना जिंकता आला नाही. अनुप्रिया पटेल आपल्या आईच्या प्रचारासाठी तर आल्याच नाहीत उलट त्यांनी आईच्या विरोधात काम केलं. या कारणामुळे कृष्णा पटेल यांनी अनुप्रिया पटेल यांची पक्षातून हकालपट्टी केली.
त्यामुळे पक्षात मग दोन गट पडले.
आई आणि मुलगी अशा दोन गटात पक्ष विभागला गेला.
कृष्ण पटेल या पक्षाच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी भाजपाला आम्हीच खरंच अपना दल असल्याचं कळवलं होतं. मात्र भाजपने कोणाची बाजू घ्यायचं हे फिक्स केलं होतं.
भाजपने अनुप्रिया पटेल यांना २०१६ थेट केंद्रीय मंत्री केलं.
त्याचबरोबर पटेलांची व्होटबँक एनडीएकडे ओढण्यासाठी भाजपने अनुप्रिया पटेल यांना बळ देण्यास सुरवात केली. अनुप्रिया पटेल यांनी अपना दल (सोनेलाल) असा आपला नवीन पक्ष उभा केला.
२०१९ मध्ये पुन्हा अनुप्रिया पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला. आजही अनुप्रिया पटेल एका बाजूला आणि त्यांची बहीण आणि आई एका बाजूला हा संघर्ष युपीमध्ये पाहायला मिळतो. यामध्ये अनुप्रिया पटेल या भाजपच्या पाठिंब्यावर क्लियर विनर असल्याचं दिसतं.
लोकजनशक्ती पार्टी
अपना दलात जसा आई आणि पोरगा संघर्ष होता तसा लोकजनशक्ती पार्टीमध्ये काका आणि पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळाला आणि पक्षात फूट पडली. अगदी हवामान शास्त्रज्ञासारखं रामविलास पासवान यांनी सत्तेचं हवा कोणत्या बाजूने ओळखलं आणि त्यानुसार नेहमी सत्तेत राहिले आणि पक्ष वाढवला.
मात्र त्यानंतर पक्षात उभी फूट पडली. पशुपतीनाथ पारस यांनी पक्षातील सहा पैकी ५ खासदारांना आपल्यासोबत घेऊन चिराग पासवान यांची पक्षातून हकालपट्टी केली.
”पंतप्रधान माझ्या हृदयात राहतात. मी त्यांचा हनुमान आहे. हनुमानासारखी माझी छाती फाडून पहिली तर तुम्हाला माझ्या हृदयात पंतप्रधान मोदीच दिसतील”
अशा वल्गना करणाऱ्या चिराग पासवान यांना भाजप यामध्ये आपल्याला मदत करेल अशी अपेक्षा होती.
मात्र पुन्हा भाजपने आपल्या सोयीची स्टॅन्ड घेत पशुपतीनाथ पारस यांची बाजू घेतली.
लोकजनशक्ती पार्टीची दोन शकलं झाल्यानंतर मोदी मंत्रिमंडळात पशुपतीनाथ पारस यांचा समावेश करण्यात आला. आज पशुपतीनाथ यांचा पक्ष भाजपच्या पाठिंब्याच्या चिराग पासवान यांच्या गटापेक्षा मजबूत स्तिथीत आहे.
अण्णाद्रमुक
तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक हा जयललिता यांच्या नेतृत्वाखाली एक शक्तिशाली पक्ष होता. अगदी वाजपेयी सरकार पाडण्यात जयललिता यांचा रोल पाहता राष्ट्रीय राजकारणातही पक्ष दबदबा राखून होता असं दिसतं. मात्र त्यांच्या मृत्यूनंतरही ते अन्नद्रमुकला उतरती कळा लागली.
जयललिता यांच्यानंतर पक्षात पाहिलं बंड झालं ते जयललिता यांच्या सहकारी शशिकला यांनी बंड केल्यानंतर. त्यानंतर ओ. पनीरसेल्वन आणि इ. पलानीस्वामी हे दोन नेते अण्णाद्रमुकचं नेतृत्व कोण करणार यावरून एकमेकांविरोधात उभे ठाकले.
भाजपची तामिळनाडूमध्ये मर्यादित ताकद होती त्यात अण्णाद्रमुक एनडीएचा भाग होती. भाजपने यामध्ये मग बरोबर संधी साधली आणि अण्णाद्रमुकच्या पक्षांतर्गत बाबींमध्ये इंटरफेअर करण्यास सुरवात केली.
भाजपने टाकलेल्या दबावामुळे तत्कालीन मुख्यमंत्री इ. पलानीस्वामी यांना ओ. पनीरसेल्वन यांच्याशी जुळवून घेणं भाग पडलं . इ. पलानीस्वामी आणि ओ. पनीरसेल्वन हे दोघेही तितके लोकप्रिय नाहीत. एआयएडीएमकेचा कणा असलेले गौंडर्स आणि थेवरचे दोन समुदाय नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळं त्यांनीही भाजपने सांगितलेली अरेंजमेंट मान्य केली.
मात्र राज्यातली सत्ता गेल्यानंतर इ. पलानीस्वामी आणि ओ.पनीरसेल्वन यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटला.
त्या द्रौपदी मुर्मू यांचा फॉर्म भरताना ओ.पनीरसेल्वन यांना पक्षाचे प्रतिनिधी म्हणून बोलवलं होतं. मात्र त्यांनंतर इ. पलानीस्वामी यांनी इंटरेम जनरल सिक्रेटरी हे पद आपल्याकडे घेतलं आणि ओ.पनीरसेल्वन यांना त्यांच्या कॉर्डीनेटर जे पक्षातलं आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठं पद होतं त्यावरून काढून टाकलं आहे.
ओ.पनीरसेल्वन हे भाजपच्या बाजूचे म्हणून ओळखले जातात तर इ. पलानीस्वामी गटाने सत्ता गेल्यानंतर भाजपच्या विरोधात भूमिका घेण्यास सुरवात केली आहे.
मात्र इ.पलानीस्वामी यांची ताकात पाहता आणि अण्णाद्रमुक अजूनही एनडीएचा सदस्य असल्याने भाजप दोघांनाही आहे. मात्र जर इ.पलानीस्वामी जर भाजपच्या विरोधात गेले तर भाजप ओ.पनीरसेल्वन आणि शशिकला याना एकत्र आणून इ.पलानीस्वामीयांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुकला आव्हान उभं करू शकतं असं विश्लेषक सांगतात.
हे ही वाच भिडू :
- म्हणून लोकं म्हणतायत, “मोदींचा सिंह आणि सम्राट अशोक यांचा सिंह वेगळाय..”
- चिं. वि. जोशींनी पानशेतच्या पुराबद्दल जे लिहून ठेवलय तसं लिहणं कोणालाच जमणार नाही
- बिचुकले तर किरकोळ ; राष्ट्रपती पदासाठी पहिल्यांदा अपक्ष फाईट देणारे गणेश थत्ते माहितायत का.?