कांशीरामांच्या फॉर्म्युल्यावर भाजप मुंबई महापालिकेचं मैदान मारणार?

१९८४ साली कांशीराम यांनी निर्णय घेतला की, आता बामसेफ आणि डीएस-4 या संघटनांसोबत आता एका राजकीय पक्षाची स्थापना करायची. त्यावेळी त्यांचं मत होतं होतं कि,

‘राजकीय सत्ता हि एक अशी चावी आहे जी सगळी कुलूप खोलू शकतो.’

यानंतर त्यांनी मायावतींना सोबत घेत बहुजन समाजवादी पक्ष अर्थात बसपाची स्थापना केली, आणि प्रत्यक्ष निवडणूकीच्या राजकारणात उडी घेतली. पण त्यावेळी झालं असं कि इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभुतीच्या लाटेत बसपच्या हातात काहीही लागलं नाही. तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना एक कानमंत्र दिला.

“पहला चुनाव हारने के लिए, दूसरा चुनाव हरवाने के लिए. और फिर तीसरे चुनाव से जीत मिलनी शुरू हो जाती है”

हा कानमंत्र होता उमेदवारांना आणि पक्षांना सत्तेच्या मार्गावर नेणारा. याच कानमंत्रानुसार पुढे राजीव गांधी यांच्या काळात झालेल्या उत्तरप्रदेशमधील पोटनिवडणूकांमध्ये कांशीराम यांनी मायावतींना उतरवलं. एकदा बिजनोर, एकदा हरिद्वार. पण सलग तीन पराभव झाल्यानंतर १९८९ च्या लोकसभा निवडणूकांमध्ये बसपाचं खात उघडलं. मायावती लोकसभेत पोहोचल्या.

आता हा संदर्भ देण्याचं कारण म्हणजे आता याच कानमंत्रानुसार भाजप मुंबई महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागला आहे असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. 

कारण येत्या १९ तारखेपासून मुंबईतुन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरु होणार आहे. सोबतच नारायण राणे यांनाच मुंबई महापालिकेच्या भाजपच्या ‘मिशन ११४’ ची जबाबदरी देण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. पहिल्याच दिवशी ते विमानतळ ते कुलाबा असा प्रवास करणार आहेत.

आता प्रश्न असा कि कांशीराम यांचा फॉर्म्युला भाजपला कसा लागू होतो?

तर होतो. जरी मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक भाजपसाठी तिसरी निवडणूक नसली तरी हा फॉर्म्युला लागू होतो. कारण भाजपची ताकद वाढवून देणारी हि तिसरी निवडणूक आहे. त्यामुळे. कारण २००७ पासूनची जर मुंबई महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीची राजकीय समीकरण बघितली तर ती काहीशी अशी होती.

२००७ च्या निवडणुका : 

२००७ साली महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी शिवसेनेनं १५८ जागा तर भाजपनं अवघ्या ६९ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी शिवसेनेचे ८४ आणि भाजपचे २८ नगरसेवक निवडून आले होते आणि युतीची सत्ता स्थापन झाली. त्या निवडणुकीत शिवसेनेला ८ लाख ७७ हजार ३१३ आणि भाजपला ३ लाख ३५ हजार ६६४ मतं मिळाली होती.

२०१२ च्या निवडणुका :

२०१२ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत रामदास आठवलेंचा रिपाई हा नवा भिडू आल्यानं युतीची महायुती झाली होती. त्यावेळी शिवसेना १३५, भाजप ६३ आणि रिपाई २९ अश्या नव्या फॉर्म्युल्यासोबत निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे ७५, भाजपचे ३१ तर रिपाईचा ०१ असे नगरसेवक निवडून आले आणि महायुतीची सत्ता आली.

थोड्यात काय तर भाजपच्या वाट्याला जागा कमी येऊन देखील त्यांच्या नगरसेवकांची संख्या वाढली होती. त्यानंतर पुढे २०१७ च्या निवडणुकांपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. या काळात २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेत भाजपने देशाची सत्ता मिळवली होती. त्यानंतर त्या वर्षीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने सर्वाधिक जागा जिंकत महाराष्ट्राची सत्ता मिळवली होती. 

त्यानंतर याच वाढलेल्या ताकदीच्या जोरावर भाजपने २०१७ च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला जागा वाढवून मागितल्या होत्या. मात्र जागांच गणित न जुळ्याने भाजपने स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेला ९७, भाजपला ८३ जागा मिळाल्या. एकूणच त्यावेळी भाजपने काँग्रेस सह इतर पक्षाच्या जागा पडत स्वतःची ताकद वाढवली होती. मात्र सत्तेपर्यंत पोहोचू शकली नव्हती.

२०२२ ची तयारी 

मात्र आता २०२२ ची निवडणूक म्हणजे भाजपने महापालिकेत आपला महापौर बसवायचा असा चंगच बांधला आहे. त्यासाठी मिशन मुंबई हाती घेतलं आहे.

सोबतच काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार ‘मिशन ११४’ या अंतर्गत नारायण राणे यांच्याकडे मुंबई महापालिकेची जबाबदारी सोपवली आहे. याच मिशन ‘११४’ चा एक महत्वाचा भाग म्हणूनच नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद देऊन त्यांची ताकद वाढवली असं सांगितले जाते. यानंतर याच मिशन ११४ चा एक भाग म्हणून नारायण राणे १९ तारखेला मुंबईमध्ये जनआशीर्वाद यात्रा काढत आहेत.

मुंबई महानगरपालिकेचे प्रभारी आणि भाजपचे आमदार अतुल भातखळकर याबाबत ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,

नक्कीच नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आम्हाला मुंबई महापालिकेसाठी फायदा होईल. केवळ मुंबईसाठीच नव्हे तर नारायण राणे हे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या यात्रेचा आणि प्रचाराचा आम्हाला महाराष्ट्रभरासाठी फायदा होईल.

त्याच बरोबर मागच्या काही काळात देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ प्रमाणेच स्वतः या निवडणुकांमध्ये लक्ष घातलं आहे. त्यासाठी त्यांनी पक्षाच्या नेत्यांच्या अनेकदा बैठका देखील घेतल्या आहेत. २ दिवसांपूर्वीच याच मिशन मुंबई महापालिका याचा एका म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या घरी भाजपच्या कोअर कमिटीची एक बैठक पार पडली होती. यात महापालिकेच्या दृष्टीने बरीच खलबत झाली होती.

याच मिशन मुंबई बाबत अधिक बोलण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी ‘बोल भिडू’ने भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यय यांना संपर्क केला. ते म्हणाले,

भाजपच्या मिशन मुंबईची सध्याची तयारी म्हणजे २ ते ३ पातळ्यांवर सुरु आहे. यात पहिली गोष्ट तर म्हणजे भाजप सध्या आपल्या संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यात बूथ लेव्हल पासूनची यंत्रणा ऍक्टिव्ह होतं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या जे मुंबईच्या नागरिकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी देखील भाजप मागच्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे.

यात मग अगदी रस्त्यावरच्या खड्ड्याचे आंदोलन, मुंबईतील पाणी तुंबणे, लोकांच्या घरातील साफ सफाई आणि लोकलसाठीचे आंदोलन अशा छोट्यातील छोट्या गोष्टींपासून ते मोठ्यातील मोठ्या गोष्टींसाठी आंदोलन करत आहे. त्यातुन लोकल सारखे प्रश्न देखील सोडवले आहेत. सोबतच प्रचाराच्या माध्यमातून २०१९ पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुंबईसाठी झालेली काम लोकांसमोर आणत आहोत.

मात्र आता या सगळ्या प्रयत्नानंतर देखील भाजप मुंबई महापालिकेचं मैदान मारून तिथं सत्ता आणण्यात यशस्वी होणार का हे बघणं महत्वाच आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.