कॅप्टन पंजाबमध्ये राष्ट्रवादी आणि तृणमूलच्या पावलावर पाऊल ठेवून काँग्रेसची गोची करणार
कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच पंजाबच्या राजकारणात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत. असे संकेत मिळतायेत की, कॅप्टन आज आपल्या नव्या पक्षाची घोषणा करू शकतात. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) धर्तीवर ते आपला नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले जातेय. यासोबतच पश्चिम बंगालच्या टीएमसीच्या स्टाईलमध्ये पंजाबमध्ये काँग्रेसची जागा घेण्याचा त्यांचा प्लॅन आहे.
कॅप्टनचे निकटवर्तीय खासदार जसबीर सिंग डिम्पा यांनी याबाबत मोठे संकेत दिले. यावरूनच कॅप्टन पंजाबमधील काँग्रेसची जागा रिकामी करून आपल्या पक्षाची जागा निर्माण करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आधीच अंतर्गत वादामुळे त्रस्त असलेल्या काँग्रेससाठी पुढचा काळ आणखी आव्हानात्मक होऊ शकतो.
खरं तर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह हे पदावर असताना पक्षांतर्गत वाद पार हाय कमांडपर्यंत पोहोचले होते. ज्यानंतर अमरिंदर सिंह यांनी आपला राजीनामा दिला.
अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा होती, मात्र आपण भाजपमध्ये किंवा कुठल्याच पक्षांत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्यामुळे ते स्वतःचाच पक्ष स्थापन करणार या बातमीला दुजोरा मिळाला.
या दरम्यान, काँग्रेसमधील नेतेमंडळी विरुद्ध अमरिंदर सिंह हा वाद उफाळून आला. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरूच होते. हा वाद पार पर्सनल आयुष्यापर्यंत गेला. म्हणजे या वादात कॅप्टन यांच्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडला देखील खेचलं गेलं.
त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आणखी एका ट्विटमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ज्यात त्यांनी म्हटल कि,
“वैयक्तिक हल्ल्यांनंतर, आता ते (काँग्रेस) पटियाला आणि इतरत्र माझ्या समर्थकांना धमकावत आहेत आणि त्रास देत आहेत, कॅप्टनने लिहिले. मी माझ्या प्रतिस्पर्ध्यांना सांगू इच्छितो की, इतक्या खालच्या पातळीवरील राजकारणाने हरवू शकत नाही. अशा प्रकारची कृत्य करून ना ही ते मतं जिंकू शकतील ना लोकांची मने.”
‘From personal attacks they’ve now stooped to threats and harassment of my supporters in Patiala and elsewhere. Let me tell my rivals they can’t defeat me with such low-level political games. They will neither win votes nor people’s hearts with such tactics:’ @capt_amarinder 1/2 pic.twitter.com/zFSgQwjzmA
— Raveen Thukral (@RT_Media_Capt) October 26, 2021
पश्चिम बंगालप्रमाणे पंजाबमध्येही काँग्रेसची जागा घेण्याची कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा प्लॅन
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे की,
ते आज त्यांच्या पक्षाची घोषणा करणार आहेत. यासाठी कॅप्टन यांनी सर्व तयारी केली आहे. कॅप्टनच्या पक्षाच्या नावात काँग्रेस हा शब्द नक्कीच वापरला जाईल. ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली आणि शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, त्याचप्रमाणे कॅप्टनही त्यांच्या पक्षाच्या नावात काँग्रेस हा शब्द जोडतील.
७९ वर्षीय कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या ५२ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत ते स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची ही दुसरी वेळ असेल.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी १९९२ मध्ये शिरोमणी अकाली दलापासून फारकती घेऊन शिरोमणी अकाली दल (पंथक) पक्षाची स्थापना केली. मात्र, त्यावेळी स्वत:चा पक्ष काढण्याचा त्यांचा अनुभव कटू होता. १९९८ च्या निवडणुकीत त्यांनी पटियाला आणि तलवंडी साबो या दोन जागांवर निवडणूक लढवली होती, मात्र या दोन्ही जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ते काँग्रेस पक्षात परतले. त्यानंतर ते तीन वेळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि दोन वेळा पंजाबचे मुख्यमंत्री झाले.
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यातून पंजाबच्या राजकारणात नव्या समीकरणाचे संकेत मिळाले आहेत. यातून त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. बुधवारी आपल्या पक्ष स्थापनेने ते काँग्रेससाठी अडचण निर्माण करतील. कॅप्टन परनीत कौर यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि पटियाला येथील काँग्रेस खासदार नव्या पक्षाच्या सदस्य असू शकतात.
नव्या पक्षाच्या स्थापनेच्या निमित्ताने काँग्रेसचे सुमारे अर्धा डझन आमदारही त्यांच्यासोबत येऊ शकतात, अशीही माहिती मिळत आहे. मात्र, ते आमदार नेमके कोण आहेत,याबद्दल माहिती स्पष्ट झालेली नाही. कारण, जेव्हा अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हापासून काँग्रेसचे सुमारे दोन डझन आमदार कॅप्टन यांच्या सतत संपर्कात आहेत.
आता कॅप्टन तर आपला नवीन पक्ष तर काढतच आहेत, पण सगळ्याची नजर याकडं याकडे आहे कि, ते आधीच भारतीय जनता पक्षाशी युती करणार का, शेतकऱ्यांच्या आंदोलनावर योग्य तोडगा काढण्यासाठी कॅप्टन आधी योगदान देणार.
कॅप्टन यांनी स्वपक्षाच्या स्थापनेनंतर पाऊल उचलले तर शेतकरी आंदोलन संपुष्टात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळेच शेतकरी आंदोलनाबाबत काँग्रेस नेते कॅप्टनवर आरोप करत आहेत की, जर कॅप्टनला हा प्रश्न सुटू शकत होता, तर मुख्यमंत्री असताना त्यांनी तसे का केले नाही. ६५ शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट का पाहिली?
कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीदरम्यान काँग्रेस खासदार जसबीर सिंग डिम्पा यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की,
त्रिपुरा आणि गोवासारख्या छोट्या राज्यांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिलेल्या जागा ताब्यात घेण्याची तृणमूल काँग्रेसची रणनीती आहे. यासाठी आपण आगाऊ तयारी केली पाहिजे.
डिम्पा माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या खूप जवळचे आहे. त्यांचे संपूर्ण राजकारण कॅप्टन यांच्या मार्गदर्शनाखालीच गेले आहे. अशा परिस्थितीत पंजाबमध्येही काँग्रेसची जागा रिकामी होत असल्याचे त्यांचे ट्विट संकेत देत आहे.
कॅप्टन यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यावर पंजाबमधील राजकीय परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. कारण २१ वर्षांपासून काँग्रेसच्या सक्रिय राजकारणात कॅप्टनचा मोठा वाटा आहे. या काळात ते तीन वेळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि दोनदा मुख्यमंत्री होते. ५२ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक मित्र बनवल्याचे कॅप्टनने आधीच सांगितले आहे.
अशा स्थितीत कॅप्टन काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित. काँग्रेस सध्या राजकीयदृष्ट्या अस्थिर असल्याने. प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे नवज्योत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे. त्याचवेळी पंजाबमधील मतभेदांमुळे काँग्रेसचा आलेख खाली जात आहे. अशा स्थितीत काँग्रेसची राजकीय स्थितीही कॅप्टनसाठी अनुकूल दिसत आहे. त्यामुळे कॅप्टनलाही भाजपचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे.
यामुळे कॅप्टन यांच्या मार्गातला हा अडथळा बऱ्याच प्रमाणात मोकळा असून आता फक्त नवीन स्टियरिंग हाती घायचं बाकी असल्याचं बोललं जातंय.
हे ही वाचं भिडू :
- अमरिंदर सिंग यांनी आपल्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडच्या व्हिसासाठी अर्ज केला होता
- सिद्धू-अमरिंदर वादात भाजपला पंजाबमध्ये निवडणुकांच्या तोंडावर नवीन पार्टनर मिळणार?
- आता नवीन पक्षाची घोषणा केल्यानं फिक्स कळालंय अमरिंदर सिंग कोलांटी उडी मास्टर आहेत