जूनं सेंट्रल विस्टा कोणी तयार केलेलं, आणि कसं होतं..? मोदींनी नेमकं काय बदललं…
आज नरेंद्र मोदी सेंट्रल विस्टा पुर्नविकास प्रकल्पाचे उद्धाटन करत आहेत. दिल्लीतला ऐतिहासिक असा राजपथ आणि सेंट्रल विस्टा परिसराचा पुर्नविकास करण्यात आलेला आहे. या पुर्नविकासोबत राजपथचे नामांतर कर्तव्यपथ असे करण्यात आले आहे.
पूर्वी या रस्त्याचे नाव किंग्स वे असं होतं मात्र भारतीय स्वातंत्र्यानंतर गुलामीची ही ओळख पुसून टाकण्यासाठी रस्त्याचे नामकरण राजपथ असं करण्यात आलं. आत्ता पुन्हा नामकरण करण्यात आलं असून या रस्त्याचं नाव कर्तव्यपथ अस करण्यात आलं आहे.
सेंट्रल विस्टा प्रकल्प नेमका काय आहे..
दिल्ली येथे असणारं राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या दरम्यान येणारा राजपथ व आत्ताचा कर्तव्यपथ या संपूर्ण परिसराला सेंट्रल विस्टा म्हणून ओळखलं जातं. समोरच्या बाजूस असणारे राष्ट्रपती भवन व त्यांच्या एका बाजूला साऊथ ब्लॉक दूसऱ्या बाजूला नार्थ ब्लॉक सोबतच संसद व इतर शासकिय इमारती आहे.
नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात म्हणजेच सप्टेंबर 2019 मध्ये नव्याने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांचा पुर्नविकास करण्याची योजना तयार करण्यात आलेली होती. डिसेंबर 2020 मध्ये कामाची पायाभरणी करण्यात आली. सुशोभिकरण करण्यात आलेल्या या भागाचे आज उद्धाटन होत आहे..
कशा झाला होता सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा जन्म..
1911 साली भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीत हलवण्यात आली. मात्र त्यासाठी नवीन इमारतींची गरज होती. नव्याने राजधानी निर्माण करण्याचं आव्हान ब्रिटीशांपुढे होतं. तत्कालीन व्हॉईसरॉय यांच मुख्यालय, निवासस्थान, संसद अशा गोष्टींची उभारणी करावी लागणार होती..
तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड हॉर्जिंग्स यांनी 1912 मध्ये दिल्ली टाऊन प्लॅनिंग कमिटी तयार केली. या कमिटीकडे सेंट्रल विस्टाचा प्लॅन करण्याची जबाबदारी देण्यात आली. सेंट्रल विस्टाची प्रमुख जबाबदारी होती ती ब्रिटीश आर्किटेक्ट एडविन लुटियन्स (ज्यांच्यामुळे आजही या भागाला लुटियन्स दिल्ली म्हणून ओळखलं जातं) आणि हबर्ट बेकर यांच्याकडे.
भारताचं पुर्ण सरकार चालवल जाईल अशी शासकीय इमारतींची रचना असणारं एक संकुल उभा करणं ही त्यांच्याकडे देण्यात आलेली प्रमुख जबाबदारी होती.
त्यासाठी प्रमुख गरज होती ती जागेची. दिल्लीच्या शहानाबाद पासून ते नारायणा भागापर्यन्त हा शोध घेण्यात आला.
यमुना नदीमुळे त्या काळात दिल्लीत दुर्गध आणि डासांचा खूप मोठ्ठा प्रॉब्लेम येत होता. अशा वेळी जमीनीचा शोध हीच महत्वाची गोष्ट होती. अखेर रायसीना हिल्सची जागा पाहून इथेच नवीन राष्ट्रपती भवन व इतर इमारती उभा करण्यावर एकमत झालं.
राष्ट्रपती भवन, संसद आणि नॉर्थ व साऊथ ब्लॉक सोबत इंडिया गेट आणि आजूबाजूला गार्डन अशी एकूण सेंट्रल विस्टाची रचना करण्यात आली. राष्ट्रपती भवन उभारताना सांचीच्या स्तूपची संकल्पना डोळ्यासमोर ठेवण्यात आली होती.
ज्याप्रमाणे दिल्लीतल्या जून्या इमारती लाल व पांढरा दगड वापरून बांधण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे या इमारती बांधण्यात आल्या. या कामासाठी सुमारे 20 वर्ष लागली आणि 1931 साली सर्व इमारतींचे उद्धाटन करण्यात आले.
नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात याच भागाचा पुर्नविकास करण्यास सुरवात करण्यात आली. नव्याने संसदेची इमारत देखील बांधण्यास सुरवात करण्यात आलेली आहे.
मात्र राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, हैद्राबाद हाऊस, रेलभवन, वायु भवन या इमारतींचा समावेश पुर्नविकासाच्या कामांमध्ये नाही.
तर नवीन संसद, सचिवालय, राजपथ (कर्तव्यपथ) पुर्नविकास, पंतप्रधानांचे निवासस्थान, पंतप्रधानांचे कार्यालय आणि उपराष्ट्रपती इन्क्लेव यांचा समावेश सेंट्रव विस्टाच्या पुर्नविकास प्रक्रियेत करण्यात आलेला आहे. या इमारती 2026 पर्यन्त पुर्ण होतील अस सांगण्यात आलेलं आहे.
हे ही वाच भिडू