ती होती छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेली शेवटची लढाई
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत. त्यांच्या शौर्याच्या लढाया, गनिमी कावा, मोहीम फत्ते करण्याच्या नवनवीन चालीरीती, कायदा-सुव्यवस्था या सगळ्याचं गोष्टी आपल्यामध्येचं विचार करायला लावणाऱ्या आहेत.
महाराजांबद्दलचा इतिहास प्रत्येकालाचं चांगलाचं ठावूक आहे. इतिहासकारांनी कथा कादंबऱ्यांतून त्यांची जाणीव आपल्याला करून दिली आहे. पण तरीही फार कमी लोकांना महाराजांच्या शेवटच्या लढाईबद्दल माहित असेल.
तर छत्रपती संभाजी राजे पूर्वनियोजित योजनेनुसार मोगलांच्या दिलेर खानाच्या मौजेतून माघार घेऊन विजापूरला आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सेनापती हंबीरराव यांना संभाजी राज्यांना पन्हाळगडी घेऊन जाण्याचे आदेश दिले.
शिवाजी महाराज ह्या वेळी जलनापुरात मोगलांवर चालून गेले.जालण्याची प्रचंड लूट झाली. ही बातमी मोगल सरदार रणमस्तखान ह्याला समजली, ज्यानंतर तो ताबडतोब महाराजांच्या मागावर निघाला.
दहा हजारांची मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. लूट जास्त असल्यामुळे राजांच्या फौजेची गती संथ होती.
मोगल फौजेने स्वराज्य सेनेवर आक्रमक केलं. संगमनेरजवळच्या रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडली. दि. १८, १९ व २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर आली.
शिवाजी महाराज, सेनापती हंबीरराव, धनाजी जाधव आघाडीवर होते , पण मोगलांचा जोर पाहता हंबीरराव ह्यांनी महाराजांना मागे घेऊन काही फौजेसह पट्टा गड जवळ करण्यास सांगितले आणि स्वतः मोगल आक्रमण थोपवू लागले.
निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराज पट्टा किल्ल्याकडे रवाना झाले. शिवाजी महाराजांनी पट्टा गडावर धावती विश्रांती घेतली म्हणून त्या गडास ‘विश्रामगड’ हे नाव ठेवलं गेलं. हा किल्ला नगर-नाशिक जिल्ह्य़ांच्या हद्दीवर असणाऱ्या अकोले तालुक्यातील ’पट्ट्याची वाडी’ जवळ आहे.
या किल्ल्याचे बांधकाम बहामनी सल्तनतच्या काळात झाले. त्यानंतर याचा ताबा येथील स्थानिक रहिवासी आदिवासी कोळी महादेव जमातीकडे गेला त्यानंतर त्याचा ताबा अहमदनगरच्या निजामशाहीकडे गेला. इ.स. १६२७ मध्ये मुगलांनी हा किल्ला जिंकला होता.
इ.स. १६७१ मध्ये पट्टा हा किल्ला मोरो त्र्यंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता जिंकला व स्वराज्यात सामील झाला.
तर या लढाईनंतर महाराज संभाजी राजांना पन्हाळगडी भेटण्यास गेले. दोघांमध्ये गुप्त चर्चा झाली आणि महाराज रायगडी निघाले. म्हणजे दक्षिण दिग्विजयाची सांगता होता होता “जालण्याची लूट” करताना झालेली लढाई ही महाराजांची शेवटची लढाई.
हे ही वाचं भिडू :
- पुण्याच्या छ. शिवाजी महाराज पुलाच्या बांधकामात एका निरक्षर ठेकेदाराचा सिंहाचा वाटा आहे..
- मनोहर जोशींमुळे सहारा विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मिळाले
- आग्र्याहून निसटलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात कसे परतले?