मोदीजी लक्ष द्या ! तिबेटी बेरोजगार चिनी सैन्यात भरती होतायत.
भारतात सध्या बेरोजगारांची खूप समस्या सुरु आहे. आपल्याकडं पोलीस भरती, सैन्यातली भरती अवसेपूणवेतून निघते. त्यात पण आणि सिलेक्ट झालो नाही झालो, हा मुद्दा लांबचा. पण भारताच्या ईशान्येकडील सीमावर्ती भागात राहणाऱ्या तरुणांना जॅकपॉट लागलाय. चक्क चीन या बेरोजगार तरुणांना त्यांच्या सैन्यात भरती करून घ्यायला लागलय. खरं कुठं चाललीय ही भरती?
तर खाली वाचा कुठं चाललीय ही भरती
तिबेटला लागून असणाऱ्या सिक्किम जवळच्या सीमावर्ती भागातल्या स्थानिक, बेरोजगार तरुणांना चिनी सैन्यदलाने ‘वॉलिंटियर मिलिशिया’ मध्ये सक्रियपणे भरती करण्यास सुरवात केली आहे. अशी माहिती गुप्तचर अहवालातून समोर आली आहे.
या भरतीबद्दल आपले भारतीय लष्करी तज्ञ म्हणतात की अशी भरती सुरु असली तरी भारताला चिंता करण्याची गरज नाही. परंतु आपण यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे.
भारताची ३,४८८ किमी लांबीची चीन सीमा लडाखपासून अरुणाचल प्रदेश आणि तिबेटला लागून आहे. आता अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेट असल्याचा दावा चीन करतो आहे. याच भागात वॉलिंटियर मिलिशिया म्हणजेच स्वयंसेविकांची भरती ही खूप आधीपासून सुरु आहे. म्हणजे लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या भांडणाच्या जवळपास एक वर्षाआधी ही भरती सुरू झाली आहे.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आणि पोलिस अधिकारी सिक्कीमच्या अगदी जवळच्या भागातले यादोंग काउंटीमधील बेरोजगार तरुण या स्वयंसेवक पदासाठी भरती करीत आहेत. या स्वयंसेवकांना सैन्याच प्रशिक्षण दिल्यानंतर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पोलिस आणि पीपल्स लिबरेशन आर्मी केंद्रांवर पाठवले जात आहे.
यादोंग काउंटी आज जरी चिनचा भाग असली तरी हा प्रदेश भारत आणि चीनच्या वादाचा आहे. दोन्ही देश त्याच्यावर आपला अधिकार सांगतात. त्यामुळे इथे सुरु असलेली सेनाभरती आपल्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते.
आता हे प्रशिक्षण देऊन या तरुणांना वाहन तपासणी, पोस्ट ड्युटी, सीमावर्ती भागातल्या पोलिस ठाण्यात वर्दी देणे अशी काम लावली जातील. त्याचबरोबर चीनी राष्ट्रपति शी जिनपिंग यांच्या सुपीक डोक्यातून आलेल्या ‘ज़ियाओकांग’ या गावांत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल.
२०१३ मध्ये शी जिनपिंग म्हंटले होते की,
‘संपूर्ण देश चांगल्याप्रकारे चालवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या सीमा चांगल्याप्रकारे सुरक्षित करता आल्या पाहिजेत आणि त्या सीमा भागांवर चांगल्याप्रकारे राज्य करण्यासाठी आपल्याला प्रथम तिबेटमध्ये स्थिरता सुनिश्चित केली पाहिजे.
त्यामुळे, पीपल्स लिबरेशन आर्मी द्वारे प्रशिक्षित तरुणांना आवश्यकता भासल्यास अतिरिक्त चिनी सैन्याच्या तुकड्या तैनात केल्या जाऊ शकतात.
गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे की, चीन सीमावर्ती भागात लक्ष देण्याच्या हेतूने स्वयंसेवक भरती करीत आहे. सीमावर्ती भागातल्या रहिवाशांवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टिकोनातूनच पीपल्स लिबरेशन आर्मीतर्फे भरती केलेल्या तरुणांना प्रशिक्षित केले जात आहे. त्यांना सीमावर्ती भागांमधील बाजारात आणि ज़ियाओकांग गावात कर्तव्यासाठी तैनात केले जाऊ शकते.
गुप्तचर विभागाला यावर्षी एप्रिलमध्ये अशी माहिती मिळाली होती की, तिबेटी स्वायत्त प्रदेशात तिबेटी सैन्याचे विशेष युनिट तयार करण्याच्या योजनेसह चीनने आपली भरती मोहीम वाढवली आहे.
या स्वयंसेवक मिलिशियाच्या भरतीचा भारतावर तसा फारसा परिणाम होणार नाही. पण, हे सुनिश्चित केले पाहिजे की दोन्ही बाजूंच्या लोकसंख्येचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होणार नाही.
यासंदर्भात द प्रिंट या बातमी स्थळाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य लेफ्टनंट जनरल एस.एल. नरसिम्हन (सेवानिवृत्त) यांना वॉलिंटियर मिलिशिया बद्दल विचारले तेव्हा नरसिम्हन सांगताना म्हणाले की,
हा सीमाभाग असा आहे की कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची गुप्त बातमी गोळा करणे फार कठीण काम आहे.
ते म्हणतात की, ‘सीमाभाग आपल्या सैनिकांनी चांगल्याप्रकारे ताब्यात घेतला आहे. भारताच्या क्षेत्रात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. आणि महत्त्वाच्या माहितीपर्यंत पोहोचणे कोणत्याही स्वयंसेवक गटाला शक्य नाही. पण एलएसीच्या (लाईन ऑफ ऍक्चुअल कंट्रोल) काही भागात, जेथे भारतीय सैन्य पण पोहोचू शकत नाही, तिथं कोणत्या प्रकारची माहिती चीन गोळा करणार आहे, हे त्यांचं त्यांना माहिती.
लेफ्टनंट जनरल नरसिम्हन पुढे म्हणाले की, आपल्यासाठी थांबणे आणि लक्ष ठेवणे शहाणपणाचे असेल, परंतु या निर्णयामुळे कोणतेही मोठे परिणाम होणार नाहीत असा त्यांचा विश्वास आहे.
१९५४ मध्ये तिबेटबरोबर झालेल्या व्यापारी करारामध्ये तिबेट हा स्वायत्त प्रदेश आणि चीनचा एक भाग असल्याचे स्पष्टपणे नमूद केले गेले होते. तर, चीन या क्षेत्रातील तिबेटी तरुणांची भरती करत असेल तर हा त्यांचा निर्णय आहे. पण भारताने एलएसीवर सातत्याने देखरेख केली पाहिजे.
गेल्या अनेक दशकांमध्ये चिनी सरकारने तिबेटी लोकांच्या संस्कृती आणि परंपरेला धोक्यात आणल्यामुळे बरेच तिबेटी लोक भारतात पळून आले आहेत. सध्या तिबेटचे निर्वासित सरकार ही भारतातल्या धर्मशाला इथून काम करत आहे.
आता भारताला आपले घर म्हणणारे हजारो तिबेटी शरणार्थी भारताच्या एका विशेष संरक्षण युनिटचा भाग बनले आहेत. गेल्या वर्षी एलएसीवर भारतीय सैन्याने सुरु केलेल्या स्पेशल फ्रंटियर फोर्स (एसएसएफ) मध्ये या शरणार्थींनी भाग घेतला होता. तसेच अनेक मोहिमांमध्ये ते सहभागी झाले होते.
हे ही वाच भिडू
- लडाखला जाण्यासाठी किती रुपये लागतात ?
- लडाखला जाताय तर हे वाचून जा !!! नाहीतर पश्चातापाची वेळ येईल !!!
- गलवानच्या हद्दीत घुसताना चिन्यांना आता दहा वेळा विचार करावा लागेल !