मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन झालं, त्यांनी घरात बोलावून आदर दिला : अशी होती संस्कृती

मुख्यमंत्र्यांच काय बिघडलं असत जर नवनीत राणांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणली असती तर, अन् नवनीत राणांच तर काय बिघडलं असतं जर त्यांनी हनुमान चालीसा ऐवजी शेतकऱ्यांच्या वीजेच्या प्रश्नासाठी असाच आग्रह धरला असता तर…

पण तस झालं नाही. तस होतही नसतं कारण हे राजकारण असतं.

महाराष्ट्रात चालणाऱ्या या राड्यावरून मात्र एक किस्सा सांगण्यासारखा आहे जो सांगू वाटतो. कारण आंदोलन कशासाठी करायचं असतं आणि आंदोलन कसं मिटवायचं असतं हे सांगणाऱ्या महाराष्ट्राचा हा किस्सा आहे.

तुम्ही सिंहासन सिनेमा पाहीलाय का? या सिनेमात एक सीन आहे. पत्रकार दिगू अर्थात निळू फुले फ्रंन्ट पेजवर फोटो टाकायला सांगताना म्हणतात,

मारला का नाय तुमच्या भीष्माचार्याला बगलेत, खरं सांगू हे परमेश्वराला सुद्धा खिश्यात घालतील

सिनेमातला सीन असा आहे की,

महाराष्ट्राचे पितामह भीष्म म्हणून ओळखले जाणारे तात्या जोशी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर प्राणांतिक उपोषणाला बसलेले असतात. मुद्दा असतो संयुक्त महाराष्ट्राचा. रात्रीच्या वेळी खुद्द मुख्यमंत्री बाहेर येतात. तात्या जोशींच्या पायावर आपले डोके टेकवतात. तुम्ही उन्हातान्हात बसलात तर मलाही इथेच बसावे लागेल म्हणून सांगतात. तुमच्या मागण्या त्या माझ्या मागण्या असा शब्द देवून ते तात्या जोशी यांना घरी घेवून जातात.

पाहूणचाराने तात्या जोशींना आनंद वाटतो. पेपरमध्ये बातमी लागते उपोषण मिटले !!

या  सिंहासन सिनेमाचे डायरेक्टर होते जब्बार पटेल आणि स्क्रिनप्ले लिहले होते विजय तेंडुलकर यांनी. हा सिनेमा १९७९ साली रिलीज झाला होता.

पण हि गोष्ट फक्त सिनेमापुरती मर्यादित नव्हती तर ती वास्तवात घडलेली होती. मुख्यमंत्र्यांच पात्र तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यावर आधारलेलं होतं तर तात्या जोशी यांच पात्र सेनापती बापट यांच्यावर आधारलेलं होतं.

झालेलं अस की २० मे १९६६ ते २५ मे १९६६ दरम्यान सेनापती बापट हे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या निवासस्थानासमोर उपोषणाला बसले होते.

याप्रसंगाबद्दल सांगायचे झाल्यास खुद्द विजय तेंडुलकर यांनीच वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावर लेख लिहला होता. त्या लेखात विजय तेंडुलकर लिहतात,

“सेनापती बापट एकदा वसंतरावांच्या निवास-स्थानाबाहेर उपोषणाला बसले. म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना बसवले. मुख्यमंत्री वसंतराव सेनापतींशी इतक्या लीनतेने आणि आर्जवाने वागले की सेनापतींना वसंतरावांची विनंती मान्य करून निवास-स्थानाबाहेरचे आपले आसन निवास-स्थानात हलविण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. सेनापतींनीच ही हकिकत मला ऐकवली होती आणि ते आदराने उद्गारले होते,

‘हुशार माणूस!’

याच प्रसंगावर सुरेश द्वादशीवार यांनी आपल्या लेखामध्ये लिहलं आहे की,

सेनापती बापटांनी त्याच काळात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर सीमाप्रश्नावर आपले बेमुदत उपोषण मांडले. सेनापतींना सारा महाराष्ट्र भीष्माचार्य म्हणून शिरावर घेणारा होता. स्वाभाविकच सारे राजकारण त्यांच्या उपोषणाने ढवळून निघाले. सेनापतींचा निग्रह आणि राज्य सरकारचा नाईलाज यातून मार्ग कसा निघतो या चिंतेने सार्‍यांना ग्रासले असतानाच वसंतरावांनी सेनापतींची त्यांच्या उपोषणात मंडपात जाऊनच भेट घेतली.

ते ज्या प्रश्नासाठी लढत आहेत त्यासाठी केंद्राकडे स्वत: शिफारस करण्याची तयारी दाखविली. वसंतरावांच्या आर्जवातील प्रामाणिकपणाने सेनापतीच विरघळले. त्यांनी उपोषण तर सोडलेच आणि तेवढय़ावर न थांबता मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्यांचे एक दिवसाचे आतिथ्यही ‘वर्षा’वर जाऊन त्यांनी अनुभवले..

अर्थात या प्रसंगातील दोन्ही लोकं मोठ्ठी होती.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या घरासमोर एखादा उपोषण करत असेल तर राज्याची परिस्थिती बिघडवून न देता यातून मार्ग काढला होता म्हणून ते मोठ्ठे होते ठरले होते तर कोणत्याही अस्मितेसाठी नाही तर “संयुक्त महाराष्ट्रासारख्या” महत्वाच्या व जगण्यामरण्याच्या प्रश्नाला घेवून उपोषण करणारे सेनापती बापट हे देखील तितकेच मोठ्ठे ठरले होते अन् सोबतच मोठ्ठी ठरली होती ती महाराष्ट्राची राजकीय संस्कृती..

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.