लॉकडाऊनमुळे जास्त माणसं मेली आहेत ती आकडेवारी तशीच खुंटीला टांगून ठेवली तुम्ही
मागच्या काही दिवसात राज्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढलयं. कालच्या एका दिवसाची आकडेवारी बघितली तर तब्बल १७ हजार ८६४ रुग्णांची वाढ झालीय. जानेवारी पर्यंत कमी झालेल्या रुग्ण संख्येमुळं आपली कोरोना मुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरु झाली होती. पण मागच्या काही दिवसात नागपूर, अमरावती सारखी महत्वाची शहर लॉकडाउन करावी लागली.
राज्यातल्या या वाढत्या रुग्णांमुळे आणि काही शहर लॉकडाऊन झाल्यामुळे पुन्हा आपण लॉकडाऊनच्या छायेत जातोय की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आणि नेमका हाच हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांची धडकी भरवत आहे.
त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन बाबत सामान्य नागरिकांची काय मत आहेत हे ‘बोल भिडू’ने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांकडून जाणून घेतलं आहे.
शेती
बार्शीचे शेतकरी विशाल गरड म्हणाले,
फक्त जीव गेला म्हणजे मरण नसतं तर पोटच्या लेकरासारखं वाढवलेलं पिक जेव्हा तुमच्या निर्णयामुळे शेतातच फेकून द्यावं लागतं ते सुध्दा मरण असतं. हे मरण मागच्या लॉकडाऊन मध्ये अनेक शेतकऱ्यांनी भोगलंय. ए.सी मध्ये बसून तुम्हाला निर्णय घेणं सोप्पं असतंय पण रात रात जागून पाणी दिलंय शेतकऱ्यांनी, मागील वर्षीचं पिक मातीत पुरून टाकलंय.
कोरोना पेक्षा जास्त लॉकडाऊनमुळे माणसं मेली आहेत ती आकडेवारी तशीच खुंटीला टांगून ठेवली तुम्ही. दुसऱ्या लॉकडाऊनचा अविचारी निर्णय घेऊ नका ही विनंती.
लॉकडाऊन मध्ये जरी सरकार शेतमाल विक्रीला परवानगी देत असेल तरी व्यापारी मात्र फक्त लॉकडाऊनचे कारण सांगून शेतकऱ्यांकडून कवडी मोल किमतीने माल विकत घेतात. शेतकऱ्याचा दहा रुपये किंमतीचा माल लोकांच्या उंबऱ्यापर्यंत जाईस्तोवर शंभर रुपयांचा होतो. फायदा कुणाला ? तोटा कुणाला ?
शिक्षण
पुण्यात पहिल्या वर्षात शिकत असलेला आणि सध्या मावळ खोऱ्यात आपल्या गावी असलेला विद्यार्थी ऋषिकेश जाधव सांगतो,
शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना ऑनलाई शिक्षण सोयीच वाटत असेल. सरकारलाही ऑनलाई शिक्षण पद्धत बरी वाटत असेल. पण आम्हा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे तोटे सहन करावे लागतात. नेटवर्क समस्येमुळे ऑनलाई लेक्चर्स मध्ये अडचण येते.
सातत्याने येणाऱ्या नेटवर्क समस्येमुळे तसेच अनियमित वीज पुरवठ्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ऑनलाई शिक्षण पद्धतीचा फटका बसत आहे.
त्यामुळे संभाव्य लॉकडाऊन ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मार्क ठरू शकते. सरकारने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करत परिस्थिती आटोक्यात आणून शाळा आणि महाविद्यालये सुरु करायला हवीत.
फोटोग्राफी
फोटोग्राफर राजू मुलानी सांगतात,
कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून राज्य सरकारने लग्नसमारंभासाठी जमणार्या गर्दीवर नियंत्रण आणले आहे. लग्नसमारंभात केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याचे सरकारचे आदेश दिले आहेत. लग्नात जमणारी गर्दी मर्यादित असल्यामुळे फोटो देखील मर्यादितच काढावे लागतात.
तसेच कमी लोक असल्यामुळे व्हिडीओ शुटिंगची वेळ कमी भरते. याचा थेट आर्थिक फटका आम्हा फोटोग्राफर लोकांना सहन करावा लागत आहे.
तसेच इतरही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर सध्या बंदी असल्याने आम्ही नुकसान पचवत आहोत. जेवढे काम पूर्वी होते. आताही तेवढेच आहे. परंतु ग्राहक कोरोनाचे कारण देत कमी पैश्यात काम करण्याचा आग्रह धरतात. सद्ध्या अशी विदारक परिस्थिती आहे. जर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केला तर आम्ही औद्योगिकदृष्ट्या खूप मागे जाऊ शकतो.
हॉटेल उद्योग
छोटे हॉटेल असलेले राजेश सोनी सांगतात,
लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय नव्हे. फक्त लॉकडाऊन करून कोरोना संपणार नाही. लॉकडाऊन केल्यांनतर कर्मचार्यांना संपूर्ण पगार देणे अशक्य आहे, पण त्यानाही कुटुंब आहे. त्यांचाही विचार करावा लागतो.
पण आता काही पर्याय नाही. लाईट बिल, जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार हा सगळा खर्च चालूच असतो. त्यामुळे लॉकडाऊन केल्यांनतर अवघड परिस्थिती निर्माण होईल.
परिस्थिती हाताबाहेर गेली तर सरकारने कडक निर्बंध लागू करावे. ठराविक वेळेतच हॉटेल्स चालू ठेवावेत. पण पूर्ण लॉकडाऊन नको.
होस्टेल
पुण्यात सदाशिव पेठेत हॉस्टेल असलेले कमलेश होनमन्नी म्हणतात,
कोरोनामुळे बहुतांश स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी गावी गेले होते. जानेवारीच्या सुरुवातीपासून पुन्हा विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. आता सध्या होस्टेलमध्ये विद्यार्थी राहत आहेत. मात्र पुन्हा लॉकडाऊन केल्यास विद्यार्थी परत गावी जाऊ शकतात.
त्यामुळे पुन्हा आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. महानगर पालिकेचा कर, आणि वाढीव वीज बिल यांमुळे आर्थिक झळ सोसावी लागत असताना आणखी दुसरे संकट सहन होणारे नाही.
खासगी क्षेत्र
खाजगी क्षेत्रात काम करत असलेले सुमित भुजबळ लॉकडाऊन बद्दल सांगतात,
पुन्हा लॉकडाऊन लागू केल्यास माझ्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. जवळपास एक वर्षापासून कोरोना अंधार दूर होईन या आशेवर गेले. मात्र जे घडतय ते मनाविरुद्धच. मला तर वाटतय जर लॉकडाऊन लागू केला तर कोरोना अगोदर लॉकडाऊनमुळेच लोकं मरतील.
माझ्या सोबतच्या उत्तर भारतीय कामगारांची फारच वाईट अवस्था आहे. लॉकडाऊन झाल्यास त्यांची इथ सोय होणार नाही. इतरही अस्थिर मजुरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पुन्हा लॉकडाऊन नको.
नाट्यक्षेत्र
नवोदित अभिनेता दुर्गेश काळे सांगतो,
लॉकडाउनमुळे नाट्यकर्मी लोकांवर गदा आली होती. पण मधल्या काळात लॉकडाउन निर्बंध शिथिल केल्याने नाउमेद झालेले नाट्यक्षेत्र पुन्हा उभारी घेताना दिसतय. नाट्यगृह कमी किमतीत उपलब्ध होत होती. ही बाब आमच्यासाठी खूप दिलासादायक ठरली. मात्र सुरुवातीला कोरोनाच्या भीतीने प्रेक्षकांनी नाटकाकडे पाठ फिरवली होती.
परंतु अलीकडच्या काळात प्रेक्षक मंडळी ओटीटी प्लॅटफॉर्मला कंटाळली असून नाटकाला मोठी गर्दी करताना दिसून येत आहे. आधीच पन्नास टक्के प्रेक्षक येण्यास परवानगी सरकारने दिली आहे आणि अति गर्दी झाल्यामुळे नाट्यगृह अधिकारी मंडळ नाट्यकर्मींवर बंधनं आणि वारंवार सूचना घालताना दिसतात.
अंशतः काही लोकं नाटक क्षेत्रावर आलेले निर्बंध बघून चित्रपट क्षेत्राकडे वळले आहेत. प्रेक्षकांचा वाढता ओढा आणि पुन्हा लॉकडाउनचं संकट अशा कात्रीत सध्या नाट्यक्षेत्र सापडलं आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करताना सामान्य लोकांचा विचार करणं गरजेचं आहे.
हे हि वाच भिडू.
- लॉकडाऊनमधून घरी जाण्यासाठी या भिडूने लाखो रुपयांचे कांदे खरेदी केले आणि..
- TRAPPED : ३५ व्या मजल्यावर लॉकडाऊन होण्याची गोष्ट
- तुमच्या वॉट्सएपवरच्या एका अफवेमुळं तिकडे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होतयं…