MP मधल्या दुर्लभ कश्यपची भाईगिरी पार आपल्या औरंगाबादपर्यन्त पोहचलेय..!!

आपल्या महाराष्ट्रात मध्यंतरी एक घटना घडली, औरंगाबादमधल्या वाळूजमध्ये एका गँगमधल्या गुंडांनी काही लोकांना भररस्त्यात बेदम मारहाण केली. बरं हे प्रकरण रात्रीच्या अंधारात नाही, तर अगदी दिवसाढवळ्या झालं.

रस्त्यावर लोकांची वर्दळ आहे, सामान्य माणसं ये-जा करतायत आणि त्याचवेळी काही गुंड लोकांना मारतायत. आपल्या अंगावर नुसती कल्पना करुन काटा आला असेल, पण या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.

ही मारहाण करणाऱ्या टोळीचा म्होरक्या मध्यप्रदेशमधला होता..

त्याचं नाव दुर्लभ कश्यप जो मागेच ठार झालाय..

आपण आपल्या आजूबाजूला, पुस्तकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये अनेक तरुणांना गुंड होताना पाहत असतो, त्यांचे या कुख्यात मार्गाला लागण्याची कारणं वेगवेगळी असतात आणि मार्गही. दुर्लभ कश्यप गुन्हेगार बनला…

फेसबुक वापरुन.

फेसबुक तर बरेच जण वापरत असतात. फोटो अपलोड करणं, पोस्ट शेअर करणं, लिहिणं ही काम करण्याऐवजी उज्जैनच्या दुर्लभ कश्यपनं फेसबुकला त्याचा अड्डा बनवला होता. फेसबुकवरून तो सुपारी घ्यायचा आणि त्यानुसार काम करायचा. हा दुर्लभ कश्यप आणि त्याची गॅंग हा काय मॅटर आहे, हे जरा डिटेलमध्ये बघू.

दुर्लभ कश्यप हा उज्जैनमध्ये आपल्या आईवडिलांसोबत रहायचा. आई शिक्षिका होती, तर वडील मुंबईत नोकरी करायचे आणि नंतर ते इंदोरला शिफ्ट झाले. दुर्लभ मांजरींचा शौकीन होता. तो रागीट दिसायचा आणि कायम स्वतःच्याच धुंदीत असायचा.

वय वर्षे २०-२१ असताना तो उज्जैनमधला कुख्यात डॉन बनला. फेसबुकचा वापर असाही करता येऊ शकतो, हे फक्त त्यालाच कळलं होतं. फेसबुकवर तो उघडपणे पोस्ट टाकायचा, त्यानं केलेली एक पोस्ट अशी होती की,

कुख्यात बदमाश + हत्यारा + पीवर अपराधी कौनसा भी कैसा भी विवाद करना हो तो मुझे संपर्क करे..!

दहशत निर्माण व्हावी म्हणून, आपल्या फेसबुक अकाऊंटवरून तो हत्यारांसोबत फोटो आणि स्टेट्स टाकायचा.

त्याच्या अकाउंटमुळे लोकांमध्ये दहशत पसरू लागली होती. दुर्लभ कश्यपचं फेसबुक अकाउंट बघून बाकीची पोरं त्याचे चाहते बनले. त्याच्या पोस्टला बघून त्याची गॅंग जॉईन करू लागले. अशा प्रकारे या दुर्लभ कश्यपच्या गँगमध्ये १००-१५० पोरं जॉईन झाली. या टोळीच्या साहाय्यानं तो खंडणी, हाणामारी, हफ्ता वसुली, लुटपाट असे गुन्हे करू लागला.

त्यावेळचे पोलीस अधिकारी सचिन अतुलकर यांनी या गॅंगमधली २४ पोरं अशा गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतली होती. पोलिसी खाक्या दाखवताच ही पोरं दुर्लभ कश्यपच्या गॅंगमधले आहोत म्हणून कबूल झाली होती.

आणखी एक गाजलेली गोष्ट म्हणजे कश्यप टोळीचा ड्रेसकोड

गॅंगमधल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर गोल लाल रंगाचा ठिपका. डोक्यात भडक काजळ आणि गळ्यामध्ये काळा कपडा किंवा मफलर असा युनिक ड्रेसकोड ही दुर्लभ कश्यप आणि त्याच्या गॅंगमधल्या पोरांची ओळख होती.

गॅंगमधल्या लोकांनी दुर्लभ कश्यपची फेसबुक आयडी चालवण्यासाठी एक स्पेशल टीम बनवली होती. या अकाऊंटवरून अनेक धमकावणीच्या पोस्ट पडत असायच्या.

आता इतकी दहशत बसवल्यावर याचा अंत कुठंतरी होणारच होता.

दुर्लभ कश्यपच्या टोळीनं उज्जैनमध्ये धुमाकूळ घातला होता, तेव्हा त्याच्या प्रतिस्पर्धी टोळ्यांनी त्याचा बदला घेण्याचं ठरवलं. लॉकडाऊनमध्ये हिंसाचार उफाळून आला होता. २० सप्टेंबर २०२० रोजी रात्री २ वाजता उज्जैनमधल्या हेलावाडी भागात एका चहाच्या दुकानावर दुर्लभ कश्यप आणि त्याची गॅंग आली होती. त्याचा जुना प्रतिस्पर्धी शाहनवाज आणि शादाबसुद्धा तिथं होते.

जुन्या दुष्मनीमुळं दुर्लभ कश्यपनं थेट पिस्तूल काढून शाहनावाजवर चालवलं. हे दृश्य बघून शाहनवाज आणि शादाबच्या टोळीनं चाकूनं भोसकून दुर्लभ कश्यपची हत्या केली. या हत्येने एकच गोंधळ झाला, बराच काळ हाणामारी आणि पळापळी झाली आणि नंतर सगळीकडे शांतता पसरली.

दुसऱ्या दिवशी पोलीस आले आणि पुढं चौकशी सुरू राहिली. पण दुर्लभ कश्यपची दहशत आणि त्यानं फेसबुकवरून सुरु केलेलं प्रकरण धडकी भरवणारं होतं. त्याच्या हत्येनं अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. पण आजही देशात कुठंतरी काही पोरं हिंसाचार करतात आणि दुर्लभ कश्यपचं नाव पुन्हा एकदा चर्चेत येतं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.