कोरोनामुळे दोन तास बंद झालेलं शेअर मार्केट अंबानीने तीन दिवस बंद पाडून दाखवलं होतं

तारिख होती १८ मार्च १९८२ ची. रोजच्या प्रमाणे शेअर मार्केट सुरू होणार असा अंदाज होता. तेव्हा कोणाला अंदाज पण नव्हता की हा दिवस इतिहासात कोरला जाणार आहे.

नेमकं या दिवशी काय झालं हे समजून घ्यायला आपल्याला काही दिवस पाठीमागे जायला लागतं. 

झालेलं अस की रिलायंस टेक्सटाईल इंडस्ट्रिजचे सुमारे साडेतीन लाख शेअर्स मारवाडी ब्रोकर लोकांनी एकत्रित विकण्यास सुरवात केली. तेव्हा शेअर्सची किंमत १३१ रुपये इतकी होती. एकत्रित इतक्या मोठ्या प्रमाणात शेअर्स विकून शेअर्सची किंमत पाडायची आणि त्यानंतर कमी किंमतीला शेअर्स विकत घेवून फायदा मिळवण्याचा प्लॅन या टोळीने आखला. 

शेअर्स मार्केट ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी सांगतो,

शेअर्समार्केटमध्ये ही खरेदीविक्री तोंडी होत असते. विक्री करणाऱ्याकडे किंवा खरेदी करणाऱ्याकडे वास्तविक शेअर्स नसतात. मात्र प्रत्येक दूसऱ्या शुक्रवारी सर्व ब्रोकर तोंडी शेअर्सचं वास्तविक भूगतान करत असतात. तेव्हा जर तोंडी विकलेला शेअर्स नसेल तर प्रती शेअर्स ५० रुपये बदला द्यावा लागतो. 

या शेअर्स मार्केटचे पण काही नियम असतात म्हणजे समजा रिलायन्सचे शेअर्स विकले जात आहेत आणि त्यामुळे शेअर्सची किंमत कमी होत आहे अशी वेळी तिच कंपनी हे शेअर्स विकत घेवू शकत नाही. त्यामुळे शेअर्स मार्केटमध्ये लांबून पहाताना त्या कंपनीचा संबंध दिसत नाही. पण अशा कंपन्या आपल्या ब्रोकरमार्फत थर्ड पार्टीच्या नावावर बऱ्याच गोष्टी मॅनेज करत राहतात. 

दलालां धिरूभाई अंबानीला हलक्यात घेत होते. सहज शेअर्स विकून किंमत पाडून परत तेच शेअर्स घ्यायचा प्लॅन आखण्यात आला. 

पण धिरूभाई मुळातच लय हूशार माणूस. त्याला शेअर्सच्या विक्रीची कुणकुण लागली. जसेजसे शेअर्स विकण्यास सुरवात करण्यात आली तसेतसे धिरूभाईने आपल्या ब्रोकरच्या मार्फत शेअर्स विकत घेण्यास सुरवात केली. 

एका बाजूला कलकत्तामध्ये बसलेले दलाल मुंबई स्टॉक एक्सेंज मधले रिलायन्स टेक्सटाईलचे शेअर्स विकत होते तसे भारतभर बसलेले वेगवेगळे ब्रोकर हे शेअर्स विकत घेवू लागले. हे सगळं काम धिरूभाई अंबानी यांनी घडवून आणलं. दिवस संपत आला तेव्हा शेअर्स १२५ रुपयांवर आला. पुढच्या काही दिवसात हाच प्रकार झाला.

एकूण ११ लाख शेअर्स विकण्यात आले आणि अंबानीच्या ब्रोकर लोकांनी त्यापैकी साडेआठ लाख शेअर्स विकत घेतले. 

आत्ता मात्र शेअर्सची किंमत वाढू लागली. आत्ता मारवाडी गॅंगच धाब दणाणलं. त्यांच्या लक्षात येवून चुकलं की आपण आपल्याचं जाळ्यात सापडलोय. १३१ रुपये तोंडी विकलेला शेअर्स आत्ता वाढला तर होता. दूसरा शुक्रवार आला. आत्ता प्रत्यक्षात शेअर्सचा व्यवहार करायचा होता. पण मारवाडी गॅंगकडे तर शेअर्स नव्हते.

त्यांच्याकडे तेव्हा दोनच पर्याय शिल्लक राहिले. एकतर मार्केटमधून चढ्या किंमतीला शेअर्स घेवून देणे नाहीतर प्रतिशेअर्स पन्नास रुपये दंड देणं. 

मारवाडी गॅंगने नांग्या टाकल्या आणि धिरूभाईंकडून वेळ वाढवून मागितला. धिरूभाई त्याचीच वाट बघत होते. त्यांनी तात्काळ वाढीव वेळ मिळणार नाही म्हणून सांगितलं. आत्ता झकमारत उंची किंमतीला मारवाडी गॅंगला रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स विकत घ्यावे लागणारे होते. त्याचा परिणाम म्हणजे शेअर्सची किंमत पुन्हा वाढू लागली. पुढच्या तीन दिवसात शेअर मार्केट सुरू व्हायचं आणि बंद व्हायचं. याचा परिणाम असा झाला की रिलायन्सचा शेअर्स ढगात जावून पोहचला.

त्या वेळी ज्या ज्या लोकांनी शेअर्स विकले ते मालामाल झाले. हा सगळा प्रकार १८ मार्च १९८२ साली सुरू झाला आणि १० मे १९८२ रोजी संपला. 

सगळं कांड पुर्ण झालं तेव्हा मार्केटचा नवा बादशहा जन्माला आला होता तो म्हणजे धिरूभाई अंबानी. गीता पीरामल यांच्या बिझनेस महाराजास या पुस्तकत या किस्साबद्दल लिहण्यात आलय, 

त्यामध्ये त्या म्हणतात त्यांच्यामुळे तीन दिवस मार्केट बंद राहिलं. त्यांनी ब्रोकरला झुकायला भाग पाडलं या कौतुक होतच पण त्याहून अधिक म्हणजे त्यांनी सामान्य गुंतवणूकदारांच्या विश्वास निर्माण केला. रिलायन्सचे शेअर्स कोणीही हलवू शकत नाही हा सामान्य गुंतवणूकदाराला दिलेला विश्वास अधिक मोठ्ठा होता. याचा एकंदरित परिणाम म्हणजे ९० च्या दशकापर्यन्त रिलायन्सकडे २४ लाख इन्वेंस्टर जोडले गेले होते. त्यामुळे रिलायन्स आपली वार्षिक बैठक मुंबईच्या स्टेडियमवर आयोजिक करावी लागत होती. 

धिरूभाईबाबत एक किस्सा सांगितला जातो तो म्हणजे दुबईच्या एका अरब व्यक्तीने गुलाब लावण्यासाठी धिरूभाईंना भारताची माती मागितली तेव्हा त्यांनी ही माती देखील विकली होती. लोक आजही त्यांच्यावर या गोष्टीवरून टिका करतात पण धिरूभाई पक्का बिझनेसमॅन होता. ते म्हणत समोरच्या ज्या ज्या गोष्टीसाठी पैसे देतो ते मी विकू शकतो. 

शून्यातून त्यांनी विश्व उभा केलेलं म्हणूनच ते स्वत:ला झिरो क्लब चा मेंबर म्हणवून घ्यायचे. या माणसाने बरेच झोल केले असतील त्यांच्यावर तसे आरोप पण झाले. पण या माणसाच्या डोक्याचा नाद मात्र कोणीच करु शकलं नाही हे ही तितकच खरं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.