दिलीप कुमारांनी नावात घोळ घातला आणि या नेत्याला मंत्रीपदाची लॉटरी लागली..
ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार. खऱ्या अर्थाने भारतीय सिनेमाचा पहिला सुपरस्टार. जवळपास साठ-सत्तर वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या ऍक्टिंगची नक्कल आजकालचे हिरो करताना दिसतात. खुद्द महानायक अमिताभ बच्चन, शेवटचा सुपरस्टार शाहरुख खान अशा अनेकांनी जाहीरपणे हे मान्य करण्यात कोणताही कमीपणा मानला नाही.
भारतातच नाही तर सीमेपलीकडेही दिलीप कुमार यांचं फॅन फॉलोविंग जबरदस्त होतं. लोकांच्यात इतकी क्रेझ असलेल्या सुपरस्टारला राजकारणात येण्याचा आग्रह झाला नसता तर नवल.
दिलीप कुमार सुरवातीपासून काँग्रेस व गांधी परिवाराच्या जवळचे समजले जायचे. त्यांना अनेकदा निवडणुकीचा आग्रह धरण्यात आला. त्यांच्या मागून येऊन अमिताभ बच्चन यांनी लोकसभा लढवली पण दिलीप कुमार यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून अंतर राखलं.
साधारण नव्वदच्या दशकात मात्र त्यांनी मुस्लिम ओबीसी चळवळीच्या माध्यमातून समाजकारणात कार्य सुरु झालं. मंडल अयोग्य लागू झाला होता, अशा वेळी मुस्लिम समाजातील मागासवर्गीय जाती जमातींना आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून ही संघटना कार्यरत होती.
खरं तर तेव्हा फिल्म इंडस्ट्रीशी निगडित स्टार अशा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयाशी जोडले जाण्यास राजी नसायचे. विशेषतः दिलीप कुमार यांच्यासारखा मोठा कलाकार तर आपल्या इमेजचा विचार करता या सगळ्यापासून दूर राहिला असता. पण तरीही दिलीप कुमार या चळवळीत उतरले.
विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणाशी त्यांचा संपर्क वाढला. शरद पवार मुख्यमंत्री असताना राज्यात मंडल अयोग्य लागू झाला. दिलीप कुमार यांनी प्रयत्न करून मुस्लिम ओबीसींना या आरक्षणात अंतर्भूत करून घ्यायला लावलं. त्या घटनेनंतर देशभरातल्या गोर गरीब मागासवर्गिय मुस्लिम समाजात दिलीप कुमार यांच्या बद्दल विशेष आपुलकी निर्माण झाली होती.
गोष्ट आहे १९९९ सालची. सोनिया गांधींच्या विदेशपणाचा मुद्दा उचलून धरत शरद पवारांनी बंड केलं होतं. त्यांना व त्यांचे सहकारी पी.ए.संगमा, तारिक अन्वर यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरच्या पहिल्याच निवडणूका होत्या त्या म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा.
त्याकाळी केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता होती. शिवसेनेचे नारायण राणे मुख्यमंत्री आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि नव्याने स्थापन झालेलं राष्ट्रवादी काँग्रेस असा तिहेरी सामना होणार होता.
काँग्रेसमधूनच फुटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हक्कांच्या मतांची विभागणी करणार हे निश्चित होतं. हे रोखण्यासाठी काँग्रेसने व्युव्हरचना आखण्यास सुरवात केली. विशेषतः राष्ट्रवादीचा देखील अल्पसंख्यांक मतांवर डोळा होता. विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या काँग्रेस पक्षाने दिलीप कुमार यांच्या ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायजेशन ट्रस्टची मदत मागितली. दिलीप कुमार या साठी तयार झाले. बदल्यात त्यांनी संस्थेच्या काही कार्यकर्त्यांना आमदारकीचं तिकीट मिळवून दिलं. त्यातील कित्येक जण निवडून देखील आले.
मुंबईचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी या काळातला एक किस्सा आपल्या ब्लॉगवर सांगितला आहे.
मुस्लिम ओबीसींच्या आंदोलनामुळे दिलीपकुमार, शब्बीर अन्सारी, हसन कमाल, डॉ. झहीर काझी या सगळ्यांशी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दोस्ती जमली. राज्यसभेची निवडणूक होती. मायनॉरिटी कोट्यातून बरेच काँग्रेसजन प्रयत्नात होते. पण विलासरावांना वाटत होतं की दिलीपकुमारांनी राज्यसभेवर जावं. त्यांनी दिलीपकुमारांना समजावून सांगायची जबाबदारी कपिल पाटील यांना सोपवली.
कपिल पाटील जेव्हा राज्यसभेबद्दल सांगायला दिलीपकुमार यांच्याकडे गेले तेव्हा ते म्हणाले,
‘अरे या निवडणूकीत घोडेबाजार होतो. मी कुठून पैसे आणू?’
कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावून दिला. विलासराव देशमुख दिलीप कुमार यांचं म्हणणं ऐकून मस्त हसले. त्यांना म्हणाले,
‘दिलीपसाब आप को कुछ नही करना है, जिम्मेदारी मेरी है.’
विलासरावजी त्याच दिवशी दिल्लीला निघाले होते. सोबत प्रदेशाध्यक्ष गोविंदराव आदिक होते. आदिक स्वतःच्या प्रयत्नात होते. दिलीपकुमारांचं नाव सांगताच सोनिया गांधी यांनी आनंदाने मान्य केलं.
त्याकाळात विलासरावांच्या मंत्रिमडळाचा आणि दिलीप कुमार यांचा एक किस्सा कपिल पाटील यांनी आपल्या ब्लॉग मध्ये सांगितला आहे.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मंत्रीमंडळात स्थान मिळावं म्हणून आमदार असलेले हुसेन दलवाई यांनी बरेच प्रयत्न केले होते. सोनिया गांधींनी दिलीपकुमार यांना दलवाईंच्या बद्दल विचारलं,
‘हुसेन दलवाई हे नाव कसं आहे?’
दिलीप कुमारांच्या डोक्यात सिनिअर हुसेन दलवाई होते. म्हणजे वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्रिमंडळात असलेले. दिलीप कुमारांचे ते जुने मित्र. त्यांनी एका क्षणात सोनियाजींना सांगितलं,
‘हुसेन दलवाई बिलकुल चांगला माणूस आहे. राष्ट्र सेवा दलात वाढलेला आहे. सज्जन आहे. बिलकुल त्यांना करा.’
सोनिया गांधी यांनी दिलीप कुमार यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात हुसेन दलवाई हे नाव पक्कं झालं. पण तेव्हा त्याच कुटुंबातले एक ज्युनिअर हुसेन दलवाई हे दिलीप कुमारांना माहित नव्हते. ज्युनिअर हुसेन दलवाई म्हणजे युक्रांदवाले. मुस्लिम सत्यशोधक समाजाचे संस्थापक हमीद दलवाई यांचे भाऊ.
हुसेन दलवाई यांच्या नावावरून काँग्रेसमधल्या काही मुस्लिम नेत्यांनी दिल्लीत आक्षेप घेतला. तेव्हा दिलीपकुमारांनी कपिल पाटील यांना विचारलं,
‘अरे माझ्या डोक्यात ते सेवा दलाचे हुसेन दलवाई होते. हे हुसेन दलवाई कोण?’
कपिल पाटील म्हणाले, ‘हे युक्रांदवाले.’
दिलीप कुमार म्हणाले,
‘हे मला माहित नव्हते. मला वाटलं हे सेवा दल वाले हुसेन दलवाई आहेत. म्हणून मी सोनियाजींना तात्काळ हो म्हटलं.’
कपिल पाटील हसले आणि म्हणाले,
‘तुमची जुन्या हुसेन दलवाईंसोबत कशी दोस्ती?’
ते म्हणाले, ‘ते हुसेन दलवाई माझे जुने मित्र. जुन्या सेवा दलातल्या बऱ्याच लोकांना मी व्यक्तिगत ओळखतही होतो. त्यामुळे माझ्या डोळ्यात ते नाव राहिलं.’
ते सिनियर हुसेन दलवाई या हुसेन दलवाईंचे काकाच. चिपळूणमधलेच. आणि सेवा दलाच्या पहिल्या पिढीतले. कोकणामधली बहुतेक मुस्लिम मंडळी सेवा दलात सुरवातीपासून होती. आणि त्यांचं आणि सेवा दलाचं योगदान दिलीप कुमारांना माहित होतं. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रेमाने सोनियाजींना शिफारस केली होती.
या घोळाचा हुसेन दलवाई यांना मात्र मोठा फायदा झाला. विलासरावांच्या मंत्रिमंडळात अल्पसंख्यांक मंत्री म्हणून त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. त्याकाळी पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश व्हायचा. पुढे हुसेन दलवाई केंद्रात राज्यसभेवर खासदार म्हणून गेले. आजही काँग्रेसच्या जेष्ठ मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
हे ही वाच भिडू.
- दिलीप कुमार आणि सायराबानोच्या प्रकरणात मध्यस्थी करणारे शरद पवार !
- मिरजेच्या काँग्रेस आमदाराचं तिकीट दिलीप कुमारनी फायनल केलं होतं
- भुजबळ माळी आहेत आणि मी बागवान, म्हणजे माळीच. आरक्षण दोघांनाही मिळालं पाहिजे