जगातल्या पहिल्या इ-रिक्षाचा शोध आपल्या फलटणमध्ये लागलाय!
2004 ला आशुतोष गोवारीकरचा स्वदेस रिलिज झाला. शाहरूखनं साकारलेला मोहन भार्गव नासा मधली नोकरी सोडून स्वदेशाची सेवा करण्यसाठी भारतात येतो हा या पिक्चरचा प्लॉट. या पिक्चरनंतर अनेकांनी अमेरिका सोडून आपल्या मायभूमी भारताची वाट धरली अश्या बातम्या आल्या होत्या. पण हे सगळं कूल ठरण्याच्या आधी एक पठया अमेरिका सोडून थेट आपल्या सातारा जिल्ह्यातील फलटणला आला आणि तिथलाच होऊन गेला.
त्यांचं नाव अनिल कुमार राजवंशी. इलेक्ट्रिक रिक्षा आणि इतर नवकल्पना विकसित करण्याचे श्रेय दिलेले व्यक्ती डॉ अनिल कुमार राजवंशी यांना या वर्षाच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
एक कट्टर गांधीवादी असलेल्या डॉ अनिल यांनी अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर १९८१ मध्ये भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. लखनौमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या डॉ. अनिलने आपले शालेय शिक्षण लखनौमध्ये पूर्ण केले आणि नंतर कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक आणि एमटेक. पुढे फ्लोरिडा विद्यापीठातून पीएचडी पूर्ण करून त्यांनी तेथे अडीच वर्षे अध्यापनही केले.
द बेटर इंडिया य वेबसाईटशी बोलताना डॉ अनिल म्हणतात, “मी 1981 मध्ये वेडेपणा आणि अहंकाराने भारतात परतलो. मला वाटले की मी पुरेसं शिकलो आहे आणि मला परत येऊन भारत बदलायचा आहे. जर माझ्यात अहंकाराची ती ओढ नसती, तर माझ्या इतर मित्रांप्रमाणे मीही अमेरिकेतच राहिलो असतो.”
डॉ. अनिल सांगतात मला लहानपणापासूनच इंजिनिअर व्हायचे होते. मलाही वाफेच्या इंजिनांबद्दल खूप आकर्षण वाटते आणि ते आयुष्यभराची आवड राहिली. याच आवडीने मला आयआयटीमध्ये प्रवेश करण्यास प्रवृत्त केले. विद्यार्थी असतानाच डॉ.अनिल यांची शिक्षकी पेशाची आवड वाढू लागली. त्यांना मग समजले की शिकवण्यासाठी आपल्याला पीएचडी करावी लागेल आणि अशा प्रकारे त्याने डॉक्टरेटसाठी फ्लोरिडा विद्यापीठात प्रवेश घेतला.
भारतात परत येण्याआधी, डॉ अनिल म्हणतात की ते कुठे स्थायिक होऊ शकतात हे समजून घेण्यासाठी त्यांनी एक महिना देशाचा प्रवास केला. ते भारतात परत आल्यावर, IIT मुंबई, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) आणि टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट सारख्या नामांकित संस्थांकडून त्यांना ऑफर येऊ लागल्या. मात्र या सगळ्या ऑफर नाकारत त्यांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्था (NARI) या स्वयंसेवी संस्थेत सामील होण्याचा निर्णय घेतला. “मी भारताच्या आईडीयाशी खूप संलग्न होतो.
1942 मध्ये माझ्या वडिलांना महात्मा गांधींसोबत तुरुंगात टाकण्यात आले आणि त्यामुळे माझ्या जागतिक दृष्टिकोनावर परिणाम झाला. एम के गांधींनी लिहिलेल्या ‘माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ’ या पुस्तकाचाही माझ्यावर खूप खोलवर परिणाम झाला,” आणि यामुळेच डॉ अनिल यांनी फलटणला आपले घर बनवण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्यांनी तिथे काम केले. त्यावेळेचे त्यांचे फलटणचे जीवन खूप कठीण होते. ते सांगतात फलटणमध्ये काहीच उपलब्ध नव्हते आणि प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीसाठी पुण्याला जावे लागत होते.एकदा तर त्यांना पुण्याला चार तासांचा प्रवास करून फक्त लांब पल्ल्याचा फोन कॉल साठी जावे लागले होते. फलटणमध्ये घालवलेले पहिले सहा महिने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. वातावरणाशी जुळवून घेणे अवघड होते. पण काहीतरी वेगळं करण्याची जिद्द इतकी प्रबळ होती की ते पुढे जातच राहिले.
NARI च्या उभारणीतील अनिल यांचे एक महत्वाचे काम म्हणजे फलटणच्या परिसरात उगवणाऱ्या गोड ज्वारी (गोड ज्वारी) वापरून अक्षय इंधन निर्माण करणे. ज्वारी जे एक बहुउद्देशीय पीक आहे, ज्याचे अनेक फायदे आहेत. त्याचा वापर धान्याच्या स्वरूपात अन्न म्हणून आणि त्याच्या स्टेम ज्यूसपासून इथेनॉलच्या स्वरूपात इंधन म्हणून केला जाऊ शकतो.
त्यानंतर 1995 मध्ये त्यांनी इलेक्ट्रिक रिक्षा बनवण्याचे काम सुरू केले. भारतात आणि जगभरातील हे पहिलेच होते.आपण आपल्या आजूबाजूला ज्या काही ई-रिक्षा बघतो त्यांचा जन्म इथेच फलटणमध्ये झाला. 1995 पर्यंत ई-रिक्षांची चर्चाही होत नव्हती. तरीही, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) ने प्रकाशित केलेल्या जर्नलमध्ये अनिल यांनी एक पेपर लिहिल्यानंतरच ती खऱ्या अर्थाने सुरू झाली.
पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत या नवीण आयडियामध्ये 40 टक्के कमी ऊर्जा वापरली जात होती. यात डीसी मोटर (पीएमडीसी मोटर), लीड-ऍसिड बॅटरी, दोन स्पीड खास डिझाइन केलेले गिअरबॉक्स आणि सॉफ्ट स्टार्टसाठी इलेक्ट्रॉनिक कार्ड होत. शिवाय, यात रिव्हर्स गियर पण होते.
ई-रिक्षा 35-40 किमी/तास वेगाने दोन ते तीन प्रवासी सहज घेऊ शकत होती आणि प्रति बॅटरी चार्ज करून 60-70 किमीपर्यंत धावू शकत होती.
मग जगभरातून अनेक लोक ई-रिक्षांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संस्थेला भेट देऊ लागले. काहींनी मॉडेल कॉपी केले, काहींनी त्यावर काम करून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्यांची आईडीया चोरली यावर डॉ. अनिल सांगतात “आम्ही एक लहान संस्था आहोत आणि आयडिया चोरीच्या अशा केसेस कायदेशीररित्या लढण्यासाठी आपल्याकडे संसाधने नाहीत. म्हणून, आम्ही ते जाऊ दिले,”.
अल्कोहोल स्टोव्ह, बायोमास गॅसिफायर आणि ई-रिक्षांसाठी डॉ. अनिल यांच्याकडे गेल्या चार दशकांत सात पेटंट आहेत.
आजच्या पिढीसाठी काय संदेश द्याल यावर डॉ अनिल म्हणतात, “ भारतातील समस्या प्रचंड आहेत आणि त्या प्रत्येकाचे निराकरण करणे आवश्यक आहे. देश सोडून जाण्याचे मार्ग शोधण्यापेक्षा भारतीयांचे जीवन सुधारण्यासाठी एकत्र काम करूया”
हे हि वाच भिडू
- फलटणचे मालोजीराजे नाईक निंबाळकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले नाहीत हे राज्याचं दुर्दैव..
- बंडातात्या कराडकरांनी एकदा राज्य सरकारने केलेली पद्मश्रीची शिफारस नाकारली होती
- जिल्हा बँकेत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे बिनविरोध होण्यामागं किंगमेकर आहेत रामराजे !