बाजारात स्टूल टाकून पेशंट तपासणाऱ्या डॉक्टरने दादांच्या उमेदवाराला आमदारकीला पाडलं
गोष्ट आहे साठच्या दशकातली. वसंतदादा पाटील म्हणजे दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं प्रस्थ बनलं होतं. एकेकाळी ब्रिटिशांच्या गोळ्या झेललेला हा क्रांतिकारक. स्वातंत्र्याच्या नंतर यशवंतराव चव्हाणांच्या खांद्याला खांदा लावून सहकाराची चळवळ राज्यात पेरणारा महान लोकनेता.
फाटक्या शेतकऱ्याच्या बांधावर विकासगंगा पोहचवणाऱ्या दादांवर सांगलीची जनता अफाट प्रेम करायची. त्यांचं कार्यकर्त्यांचं जाळं प्रचंड मोठं होतं. शालेय शिक्षण कमी असलं तरी माणसं वाचायला येत असल्यामुळे दादांनी या भागाची बरोबर नस पकडली होती.
दादांच्या लोकसंपर्कामुळे सांगली हा काँग्रेसचा गड बनला होता.
१९६७ साली पुणे बेळगाव रेल्वे मार्गाच्या ब्रॉडगेजचं काम सुरु होतं. त्याकाळी सांगली या रेल्वेमार्गावर नव्हती. पुण्यावरून ताकारीमार्गे माधवनगरहून थेट मिरजेला येत असे. मिरज हे तेव्हा देखील मोठं जंक्शन होतं. संस्थांन काळापासून दोन्ही गावात लोकल शटल रेल्वे चालायची. पण सांगलीला रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणायचं दादांचं स्वप्न होतं.
पण यामुळे एक गोष्ट झाली. मिरजेच्या लोकांमध्ये आपल्या गावातून जंक्शन सांगलीला जाणार अशी अफवा पसरली.
मिरजेचा आर्थिक कणा हे रेल्वे जंक्शन आहे. आसपासच्या छोट्या मोठ्या खेड्यापासून ते सीमेपलीकडे असलेल्या कर्नाटकातून अनेक लोक रोज अनेक कारणांनी मिरजेला येत असतात. तिथला बाजार मोठा आहे, मिशन हॉस्पिटल पासून अनेक छोट्या मोठ्या दवाखाने या गावात उभे राहिले आहेत. तिथले रेस्टोरंट, लॉज, मिरज मार्केट हे सगळं रेल्वे जंक्शनच्या आधारावर उभे आहे.
अचानक हे जंक्शन सांगलीला नेल्यावर अख्ख्या गावाची आर्थिक नाडी बसणार हे स्पष्ट होतं.
गावातले लोक एकत्र आले. यातून मार्ग काढण्यासाठी काय करायचं याचा विचार चालला होता. कोणी तरी आयडिया काढली की निवडणूक लढवायची. पण उमेदवार कोण हा प्रश्न समोर उभा राहिला.गल्ली ते दिल्ली प्रचंड वजन असणाऱ्या वसंतदादांची जबरदस्त पकड असलेला हा भाग. कोणीही राजकीय नेता दादांच्या विरोधात जाण्याचं धाडस करू शकत नव्हता.
अखेर सगळ्या जनतेने मिळून एका बिगरराजकीय माणसाला उभं करायचं ठरवलं. ते म्हणजे डॉ.एन.आर.पाठक.
नरसिंह रामचंद्र पाठक हे मूळचे मिरजेचेच. त्यांचे वडील मिरज संस्थानमध्ये पोलीस होते. पाठक हे मिरजेच्याच मेडिकल स्कुलमध्ये शिकले. त्यांना राजाची विशेष स्कॉलरशिप मिळाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची वॉन्लेस हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून नेमणूक झाली. तिथे येणारे गरीब रुग्ण, त्यांचे हाल बघून पाठक यांचं मन हेलावून जायचं. गोर गरिबांच्या कल्याणासाठी काही तरी केले पाहिजे हे त्यांच्या डोक्यात पक्कं बसलं.
त्यांनी १९४८ साली स्वतःचे पाठक हॉस्पिटल सुरु केले. तिथे येणाऱ्या रुग्णांकडून अतिशय कमी फी आकारली जायची. बऱ्याच रुग्णांना तर मोफत उपचार केला जायचा. काहीकाही जणांना डॉक्टर उपचार झाल्यावर गावी परत जाण्यासाठी आपल्या खिशातून काढून पैसे देत.
एकदा कोणीतरी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एक छोटं अनाथ बाळ आणून दिलं. डॉ.पाठकांनी त्या बाळाचा स्वीकार केला. पुढे एक अनाथाश्रमच सुरु केलं. खुद्द विनोबा भावे या अनाथाश्रमाला भेट देऊन जायचे.
पुढे पुढे तर त्यांनी मिरज परिसरात आठवडी बाजारात ओपीडी चालवायला सुरु केली. गाडीत दोन स्टूल घेऊन औषधांसह आठवडी बाजारात जाऊन पेशंट तपासत असत. मिरजेच्या आसपासच्या गावांच्या आठवडा बाजारात एका स्टूलवर डॉक्टर आणि समोरच्या स्टूलवर पेशंट बसलेला हमखास दिसत. अशा या कर्मयोगी डॉक्टरला निवडणुकीसाठी तयार करण्यात आलं
डॉ.एन.आर.पाठक १९६७ साली निवडणुकीला उभे राहिले. काँग्रेसचे सीटिंग आमदार जी.डी.पाटील यांचे मोठे नाव होतं. डॉ.पाठक यांनी त्यांना जोरदार लढत दिली. काँग्रेसचे दिग्गज नेते त्यांच्या विरुद्ध प्रचाराला आले होते. पण डॉ.पाठकांचा प्रचार लोकांनी स्वतः केला.
६७ सालच्या निवडणुकीत डॉक्टर फक्त ३ हजार मतांनी पडले. पहिल्यांदाच एका अपक्ष उमेदवाराने काँग्रेस विरोधात एवढी मते मिळवली होती. मिरजेच्या जनतेने आपला विरोध वसंतदादांच्या पर्यंत पोहचवला होता. त्यांच्या दबावामुळे पुढे सांगलीला जंक्शन नेण्याची चर्चा बारगळली.
तरीही त्याच्या पुढच्या निवडणुकीत मिरजकरांनी पुन्हा डॉ.पाठक यांना विधानसभेला उभं केलं आणि यावेळी मात्र दादांच्या उमेदवाराला त्यांनी तब्बल ८ हजार मतांनी पाडलं.
डॉ.एन.आर.पाठक यांनी विधानसभेत मिरजेच्या प्रश्नांचा आवाज बुलंद केला. मिरज मेडिकल कॉलेजसाठी वेगळे हॉस्पिटल, मिरजेच्या पूर्वेच्या भागातील दुष्काळी भागासाठी विकास कामे, जंक्शनचा प्रश्न अशा अनेक गोष्टी त्यांच्यामुळे मार्गी लागल्या.
३० नोव्हेम्बर १९८५ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पुढच्या पिढ्यानी त्यांचा वारसा तर जपलाच शिवाय अनाथाश्रमाबरोबर महिलाश्रम व वृद्धाश्रम देखील सुरु करून त्यांचे समाजकार्य पुढे नेण्याचा प्रयत्न चालवला आहे.
हे ही वाच भिडू
- राजाने येताना भोपळा आणला आणि मिरजकरांनी त्याचा सतार बनवून गावाला प्रसिद्ध केलं..
- सूर्यनमस्काराच्या वेडामुळे मराठी राजाला इंग्लंडच्या कोर्टाची पायरी चढावी लागली होती..
- वाहत्या महापुरात क्रांतिकारकांनी उडी मारली. हाकाटी पसरली, वसंतदादाने जेल फोडला
- विद्यापीठ की आकाशवाणी वसंतदादांनी हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला.