एका रेडिओ जिंगलमुळे कैलाश खेर संगीत क्षेत्रातला बाहुबली बनला…….
२००३ मध्ये अल्लाह के बंदे हस दे हे गाणं आलेलं, हे गाणं त्याकाळातलं सगळ्यात लोकप्रिय गाणं होतं. बऱ्याच लोकांच्या मोबाईलची रिंगटोन हे गाणं होतं. या गाण्याचा गायक कैलाश खेर या यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला होता आणि पुढे तो संगीत क्षेत्रातला सगळ्यात मोठा गायक बनला. आज कैलाश खेरचा वाढदिवस
हे यश मिळवणं कैलाश खेरसाठी मुळीच सोपं नव्हतं. आधी व्यवसायाच्या भानगडीत पडलेला कैलास खेर हळूहळू इतका डिप्रेशनमध्ये गेला कि तो आत्महत्या करायला गेला होता. बराच स्ट्रगल वाट्याला आलेल्या कैलाश खेरच्या जीवनातला टर्निंग पॉईंट असलेला किस्सा आपण जाणून घेऊया.
७ जुलै १९७३ रोजी उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये कैलाश खेरचा जन्म झाला. कैलाश खेरच्या वडिलांना लोकसंगीताची आवड होती, लोकगीते ते ऐकत असत आणि स्वाभाविकपणे कैलाश खेरला लहानपणापासूनच संगीताची गोडी लागली. वयाच्या ४-५व्या वर्षापासूनच तो गाणी गायला लागला होता.
वयाच्या १३ व्या वर्षीच कैलाश खेरने ठरवलं होतं कि सुफी संगीतासाठी आपलं योगदान द्यायचं. या वयातच त्याने घर सोडलं आणि गुरूच्या शोधात तो गाणी गात भटकत राहिला. आता घर सोडल्यावर जेव्हा पैशाची निकड भासू लागली तेव्हा त्याने लहान मुलांना संगीताचं शिक्षण देण्यास सुरवात केली. यामुळे कैलाश खेरचा स्वतःचाही रियाज होऊ लागला आणि पैसेही मिळू लागले.
१९९९ मध्ये आपल्या मित्रासोबत कैलाश खेरने हॅंडीक्राफ्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय सुरु केला. हा व्यवसाय इतका डेंजर घाट्यात गेला कि कैलाश खेरचा जगण्याचा कॉन्फिडन्सचं उतरला.
सगळं संपलय या भावनेतून त्याने आत्महत्या करण्याचा प्लॅन केला होता पण नंतर पुन्हा विचार करून कैलाश खेर ऋषिकेश शहरात गेला.
दिल्ली युनिव्हर्सिटीमधून डिग्री पूर्ण केल्यानंतर आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे या भावनेने कैलाश खेर २००१ मध्ये मुंबईत आला. आवाज चांगला असल्याने आपल्याला मुंबईत सहज काम मिळेल अशी कैलाशला आशा होती पण इथं त्याच्या उलट घडलं. इथंही बराच संघर्ष त्याच्या वाट्याला आला.
बराच स्ट्रगल केल्यानंतर संगीतकार राम संपत यांच्याशी कैलाश खेरची भेट झाली. राम संपत यांनी रेडिओ ऍडमध्ये जिंगल गाणार का अशी ऑफर कैलाश खेरला दिली. ती जिंगल गायल्यानंतर कैलाश खेरच्या आयुष्यात मोठा बदल झाला. ती जिंगल आयुष्याला कलाटणी देणारी जिंगल ठरली.
त्यानंतर सगळ्याचं क्षेत्रात प्रसिद्ध होण्याचं कारण ठरलं अल्लाह के बंदे हस दे… या गाण्यामुळे कैलास खेर काय चीज आहे हे सगळ्या भारताला कळलं. या गाण्यानंतर ‘तेरी दिवानी या गाण्याने बरेच विक्रम मोडले. प्रसिद्धीच्या शिखरावर कैलाश खेर पोहचला.
चांद सिफारीश, सैंय्या, तोबा तोबा , मेरे निशान अशी बरीच हिट गाणी कैलाश खेरने आपल्या आवाजात गायली. आवाजाची एक वेगळी स्टाईल आणि शैली हे कैलाश खेरचं वेगळेपण होतं. सुफी संगीत आणि भगवान शंकराची अनेक गाणी त्याने गायली.
तब्बल १८ भाषांमध्ये कैलाश खेरने गाणी गायली आहेत. सुफी संगीता व्यतिरिक्त सुद्धा त्याने बरीच वेगळ्या जॉनरची गाणी गेली आहेत. सिनेमांमध्ये त्याने गायलेली गाणी हि एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे बाहुबली सिनेमातील कैलाश खेरने गायलेली गाणी.
क्या कभी अंबर से सूर्य बिछडता आणि कौन हें वो कौन है या गाण्यांना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळालेली आहे. कैलाश खेरने कैलाशा नावाचा स्वतःचा बँड तयार केला आहे जो भारतातच नाही तर परदेशातसुद्धा गाणी वाजवतो.
आजसुद्धा आपल्या यशाचं श्रेय कैलाश खेर त्या रेडिओ वर गायलेल्या जिंगलला देतो कारण जेव्हा काहीच काम नव्हतं तेव्हा त्या रेडिओ जिंगलमुळे जगभरात नाव कमावता आलं.
हे हि वाच भिडू :
- गावकऱ्यांनी रेडिओवर राडा केला आणि ‘झुमरी तलैय्या’ गाव बॉलिवूडमध्ये फेमस झालं..
- बाहुबलीच्या डायरेक्टरचा नवा हिरो “कुमराम भीम” नक्की कोण होता?
- दृष्टी नव्हती तरी रामायणातील गाणी जिवंत केली. याच गाण्यांनी रामजन्मभूमीचा इतिहास घडवला
- पाकिस्तानी पंतप्रधान भारतीय गर्लफ्रेंडसाठी फोनवर गाणी गायचा आणि हे सिक्रेट पवारांनां कळालं