हरियाणा, पंजाबच्या १३ वर्ष जुन्या निर्णयामुळे आजही दिल्लीचं प्रदूषण रेकॉर्डब्रेक ठरतंय
हिवाळा आला आणि पुन्हा एकदा दिल्लीमधील प्रदूषण वाढायला लागलं आहे. पंजाब, हरियाणा राज्यात खरिपातील धानाची (भात) कापणी आणि रबी हंगामातील गव्हाच्या पिकासाठी जमीन तयार केली जात आहे. गव्हाच्या हंगामासाठी जमीन तयार करण्यासाठी धानाचा पेंढा जाळला जातोय.
पेंढा जळताना निघणारा धूर हवेमुळे हरियाणा, दिल्ली एनसीआरच्या भागात पसरत आहे, त्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर ५०० वर पोहोचला आहे.
आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शहरात वाढणाऱ्या प्रदूषणामुळे दिल्ली शहरातील प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली.
“दिल्ली शहरामध्ये वाढत्या प्रदूषणामुळे काही दिवसांसाठी शहरातील सर्व प्राथमिक वर्ग बंद ठेवण्यात येतील आणि त्यांचे ऑनलाईन क्लास घेतले जाणार आहेत. तर ५ वीच्या पुढच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या मैदानावरच्या ॲक्टिव्हिटी बंद ठेवण्यात येणार आहेत.”
शाळा बंद करण्याच्या निर्णयासोबतच दिल्ली सरकारने आणखी बरेच प्रतिबंध लावले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार हरियाणा राज्यात पेंढा जाळण्यात ३० टक्के घट झालीय. तर पंजाब सरकार सुद्धा पेंढ्याचं व्यवस्थापन करत आहे, पण तरीसुद्धा पंजाब, हरियाणाचे शेतकरी पेंढा जाळतच आहेत.
यामुळे एक प्रश्न पडतो की, भारतात अनेक भागात धानाची शेती केली जाते, पण पंजाब-हरियाणातील शेतकरीच पेंढा का जाळत आहेत.
तर यामागचं कारण म्हणजे, दोन्ही सरकारांनी भूजल उपसा थांबवण्यासाठी घातलेले निर्बंध!
हे वाचून तुम्हाला वाटेल की, काय असं पण कारण असू शकते का? पण हे खरं आहे.
यामागची स्टोरी अशी आहे की, हरितक्रांतीनंतर पंजाबमध्ये भात आणि गव्हाची शेती वाढायला लागली. हळूहळू लोकांनी खरीप आणि रब्बी हंगामध्ये भात आणि गहू हे दोन पीक घेण्याचा पायंडा पाडला. मात्र दोन्ही प्रमुख पीक आहेत, म्हणून दुसऱ्या हंगामासाठी जमीन तयार करायला पुरेसा वेळ मिळावा यासाठी लोकांनी पीक पेरणीच्या कालावधीत बदल केला.
पंजाबमध्ये जून-जुलै महिन्यात पावसाळा सुरु होतो पण शेतकऱ्यांनी कॅनॉलच्या आणि बोरवेलच्या पाण्याचा वापर करून एप्रिल-मे महिन्यातच भाताची पेरणी करायला सुरुवात केली. त्यामुळे धानाचं पीक सप्टेंबर महिन्यात काढणीला यायला लागला आणि गव्हाच्या पेरणीला पुरेसा वेळ मिळायला लागला.
या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना वेळ मिळत होता पण दोन्ही राज्यातल्या भूजल पातळीवर याचा गंभीर परिणाम होता.
शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची गरज वाढली आणि कॅनॉलचं पाणी अपुरं पडायला लागलं, तेव्हा लोकांनी मोठ्या प्रमाणावर भूजल उपसा सुरु केला. भाताच्या पिकाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते. त्यात हे पीक उन्हाळ्यात घेण्यात आल्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणावर जमिनीतील पाणी उपसलं जात होतं.
यावर उपाययोजना करण्यासाठी दोन्ही राज्यांनी भाताची पेरणी ३ आठवडे पुढे ढकलण्याचा नियम लागू केला.
नवीन नियमानुसार भाताची पेरणी ३ आठवडे पुढे ढकलण्यात आली. यामुळे साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीला भाताची लागवड सुरु झाली. भाताच्या पिकाचा कालावधी साधारणपणे ४ ते ४.५ महिन्यांचा असतो. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पीक काढणीला येतं. यापूर्वी हेच पीक सप्टेंबर महिन्यात काढणीला तयार होत होतं.
यंदा ऑक्टोबर महिन्यात भाताच्या काढणीला सुरुवात झाली पण अजूनही काढणी पूर्ण झालेली नाही. पंजाबमधील ४० टक्के पीक अजूनही शेतातच उभं आहे. त्यामुळे पीक काढणे आणि पेंढा जाळण्यासाठी नोव्हेंबर महिना सुद्धा लागू शकतो.
सरकारने पेरणीचा कालावधी तर पुढे ढकललाच सोबतच शेतकऱ्यांनी काढणीच्या आणि मळणीच्या पद्धतीत सुद्धा बदल केला.
भारताच्या इतर भागासह पंजाबमध्ये सुद्धा भाताची काढणी करण्याचं काम पूर्वी हातानेच केलं जायचं. यात हातात विळी घेतलेला मजूर भाताच्या पिकाला बुडापासून कापून सरळ क्रमाने खाली टाकत जायचा. काही दिवस हे पीक पूर्णपणे वाळलं की त्याला एकत्र करून त्याची मळणी केली जायची. यामुळे सर्व पेंढा एकाच ठिकाणी गोळा व्हायचा आणि बाकी जमीन मोकळी व्हायची.
परंतु मशीनच्या वापरामुळे पंजाब, हरियाणात ही पद्धत नष्ट झाली.
भाताची काढणी करणारी मशीन ही पिकाचा अर्धाच भाग कापते आणि त्याच जागी पिकाची मळणी सुद्धा करते. या पद्धतीमुळे पिकाचं अर्ध ओलं देठ जसच्या तसं उभं राहत आणि मळणी केलेला पेंढा सुद्धा तिथेच पडतो. त्यामुळे संपूर्ण शेतात पेंढा पसरलेला असतो. आधीच पेरणी लांबल्यामुळे चिंतेत असलेले शेतकरी हा पेंढा जाळतात आणि त्यातून धूर तयार होतो.
साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात उत्तरेच्या मैदानात वाहणाऱ्या वाऱ्यात बदल होतो. हे वारे पंजाबकडून हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने दक्षिण-पूर्व दिशेला वाहायला लागतात. या वाऱ्यांमुळेच पंजाब, हरियाणामधील धूर दिल्लीच्या भागात वाहून येतो आणि दिल्लीमधील हवेचं प्रदूषण वाढत चालल आहे.
याबद्दल लेखक आणि अर्थतज्ज्ञ संजीव संन्याल यांनी ट्विटरवर एक थ्रेड पोस्ट केला आहे.
This year's Economic Survey had used satellite photos to illustrate the problem. Punjab farmers have shifted their kharif cropping cycle by 3 weeks. As shown below, 15 years ago, they sowed by mid-June and harvested by mid-Oct – hence ready for rabi sowing by early Nov 2/n pic.twitter.com/eIlTDOisiz
— Sanjeev Sanyal (@sanjeevsanyal) November 3, 2022
As shown in image below, kharif sowing only gets going in early July. This means that crops are still standing in late Oct and have to be hurriedly harvested in early Nov. This means that there is just a week to clear the land for rabi sowing – hence crop burning 3/n pic.twitter.com/CE0DpimZck
— Sanjeev Sanyal (@sanjeevsanyal) November 3, 2022
संजीव संन्याल यांनी या थ्रेडमध्ये २००५ आणि २०२१ या दोन वर्षीच्या आर्थिक सर्वेक्षणातील सॅटेलाईट फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पंजाब राज्यातील मोगा जिल्ह्यातले आहेत. शेतीचे २००५ आणि २०२१ मधले सॅटेलाईट फोटो पाहिल्यावर गेल्या १.५ दशकात खरीप पिकांच्या पेरणीच्या काळात कोणत्या महिन्यात कसा बदल झाला आहे हे कळतं.
पूर्वी पीक लवकर काढणीला यायचं त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातच पेंढा जाळला जायचा. सोबतच पेंढा जाळण्याचं प्रमाणही कमी होतं त्यामुळे दिल्ली शहरात धूर पोहचत नव्हता, पण पेरणीचा कालावधी लांबल्यामुळे पंजाबमधील धूर हवेसोबत दिल्लीकडे येतो. पं
जाब-हरियाणा सरकारांनी भूजल उपसा थांबवण्यासाठी पिकांमध्ये बदल करण्याऐवजी पेरणीचा कालावधी लांबवला. तरी पण भूजल पातळी आणखी खालावतच गेली २०१० मध्ये पंजाबमध्ये पावसापूर्वीची सरासरी भूजल पातळी १०० फुटांच्या खाली होती. तर २०२१ च्या आकडेवारीनुसार पंजाबमधील भूजल पातळी पावसापूर्वी १८९ फूट खोलवर गेली आहे तर पावसानंतर १५६ फूट इतकी खोलवर गेलीय. सरकारच्या निर्णयानंतर सुद्धा भूजल पातळी खालावतच गेली आणि दिल्लीच्या प्रदूषणामध्ये सुद्धा वाढ झाली.
हे ही वाच भिडू
- दिल्लीत लॉकडाऊन लागलंय, पण कोरोनामुळं नाही…
- भारताला एकापेक्षा जास्त राजधानी असण्याची मागणी व्यवहार्य आहे का?
- प्रदूषणासाठी उभारलेल्या स्मॉग टॉवरमुळे दिल्लीत आता राजकारण पेटलंय