दसरा मेळावा हा ठाकरेंसाठी नाही तर शिंदेंच्या अस्तित्वासाठी महत्वाचा आहे.. 

शिवाजी पार्क मैदानात यंदा दसरा मेळावा घेण्यासाठी कोणालाच परवानगी न देण्याचा निर्णय मुंबई महापालिका घेतल्याचे सांगण्यात येत आहेत. दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटापैकी कुणालाच परवानगी मिळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर दुसरकीकडे शिंदे गटाला BKC मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी MMRDA कडून परवानगी देण्यात आलीय. पण, ठाकरे गटाला परवानगी MMRDA ने नाकारल्याने दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला इतर पर्यायी जागांचा आता विचार करावा लागणाराय.

सत्ता आली मुख्यमंत्रीपद आलं तरिही एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यासाठी आग्रही का आहेत? हा प्रश्न निर्माण होतो.

एकप्रकारे दसरा मेळावा हायजॅक केला तर या कृतीमुळे उद्धव ठाकरेंनाच सॉफ्ट कॉर्नर जाईल अशिही शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे. 

अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या गटामार्फत दसरा मेळावा आयोजित करणं आणि त्यासाठी आग्रही भूमिका का मांडली जातेय याची प्रमुख कारणं निघतात.. 

यातलं पहिलं कारणं म्हणजे कायदेशीर पेचप्रसंग.. 

शिंदे गटाच्या अस्तित्वाचा चेंडू आजही सर्वोच्च न्यायालयात आहे. शिंदे गटामार्फत सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडत असताना पक्षांतर झालेच नाही अशी भूमिका घेतली जात आहे. पक्षांतर्गत बहुमत असल्याची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या गटाने मांडल्यामुळे प्रकरण घटनापीठासोबतच निवडणूक आयोगाकडे गेलेले आहे.

अशा वेळी निवडणूक आयोगाने आजवर दिलेले निर्णय पहावे लागतात. या निर्णयांमध्ये आयोगाने बऱ्याचदा मेजोरिटी टेस्टला प्राधान्य दिलं आहे. अशा वेळी दोन्हीकडच्या गटांच चिन्ह फ्रिज करणं आणि येणाऱ्या निवडणूका घेणं यावर भर दिल्याचं दिसतं. 

साहजिक पक्षावर क्लेम करण्यासाठी आमदार, खासदारांच्या पाठींब्यासोबतच शिवसेना शाखा, पदाधिकारी, कार्यकर्ते महत्वाची भूमिका बजावतात. अशा वेळी पक्षाच्या अस्मितादर्शक गोष्टींना देखील महत्व प्राप्त होते. फुटीर गट आहोत हे दाखवून देणं शिंदे गटाला अडचणीचं ठरणारं आहे, त्यामुळेच शिंदे गटामार्फत दसरा मेळावा आयोजित करणं महत्वाच ठरणारं आहे. 

दूसरा मुद्दा म्हणजे बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेवर नॅचरल क्लेम राखून ठेवणं.. 

पहिल्या दिवसापासून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना असा स्टॅण्ड एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. बाळासाहेबांच्या विचारांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामधील दर्शनी गोष्ट म्हणजे दसरा मेळावा. शिवसेनेमार्फत पक्षाच्या पहिल्या वर्षापासून दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. दसरा मेळाव्याला मोठ्ठा इतिहास लाभलेला आहे. हा इतिहास सोबत आला नाही तर लोकांमध्ये जाताना शिंदे गटाचं वेगळं अस्तित्वच ठळकपणे दिसून येईल. 

एकनाथ शिंदे आणि सोबतच्या आमदारांना मात्र आपलं स्वतंत्र अस्तित्त्व दाखवून द्यायचं नाही. त्यामुळेच हा इतिहास आपणा सोबत आहे दे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना कोणत्याही परिस्थितीत दसरा मेळाव्याचं आयोजन करावच लागणार आहे. 

तिसरं महत्वाच कारण म्हणजे, बेरजेचं राजकारण.. 

राज ठाकरे दसरा मेळाव्यात उपस्थित राहतील अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. नारायण राणे देखील एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यास उपस्थित राहतील अस बोललं जात आहे. तर दूसरीकडे मनोहर जोशी यांना देखील दसरा मेळाव्यास आमंत्रण असेल अशी शक्यता आहे.

उद्धव ठाकरे विरुद्ध मनोहर जोशी अशा राजकारणाला सुरवात झाल्यानंतर दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरूनच जोशींच्या विरोधात घोषणा देवून त्यांनाा सेनेतून बाजूला करण्यात आलं होतं. सध्या मनोहर जोशी सक्रिय राजकारणात नसले तरी त्यांच व्यासपीठावर असणारं अस्तित्व शिंदे गटासाठी नैतिक अधिष्ठान मिळवून देणारं ठरेल. 

शिवसेनेच्या प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्यावरती नाराज असलेल्या गटांना एकत्र आणून बेरजेचं राजकारण दाखवून देण्याची संधी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल. 

चौथ महत्वाचं कारण म्हणजे आलेला गट टिकवून ठेवणं.. 

पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार किमान एक तृतीयांश आमदारांचा पाठींबा एकनाथ शिंदे यांना आवश्यक आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांना विधानसभेत आपलं बहुमत देखील सिद्ध केलेलं आहे. मात्र इतिहासात बंडखोरांनी माघारी घेतल्याची उदाहरणे आहेत. छनग भुजबळांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत 36 आमदारांचा पाठींबा असल्याची सही होती. मात्र जेव्हा ओळख परेड करण्याची वेळ आली तेव्हा 18 आमदारच सोबत राहिले.

त्यानंतरच्या कालखंडात या 18 पैकी 6 आमदार पुन्हा सेनेत गेले. त्या काळात पक्षांतरबंदीचे नियम इतके जटील नव्हते, तरिही भुजबळांची कसरत झाली होती. 

दूसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळ विस्तारामुळे काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या सुरू झाल्या. फुटलेल्या आमदारांपैकी काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतले तर एकनाथ शिंदे यांची देखील कसरत होणार आहे, कारण प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. अशा वेळी सोबत असणाऱ्या आमदारांना बुस्ट देण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर आहे. तिच संभाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांना येणारा दसरा मेळावा महत्वाचा ठरू शकतो. 

पाचवं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकांच्या निवडणूका.. 

मुंबई महानगरपालिका म्हणजे शिवसेनेचा आत्मा. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेवर भगवा ध्वज फडकावूनच राज्यात आपली सत्ता स्थापन केली होती. उद्धव ठाकरेंना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचं आव्हान असणार आहे, तर दूसरीकडे भाजपने कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका आपल्याकडे खेचून घेण्याची तयारी केली आहे.

दसरा मेळाव्यातून मुंबई महानगरपालिकेसंबधीत विधाने करून मोठ्या प्रमाणात जून्या शिवसेना कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचं आव्हान शिंदे यांच्यासमोर असणार आहे.

आणि सहावं व महत्वाचं कारण म्हणजे भाजपच्या पलीकडे जावून स्वत:च अस्तित्व सिद्ध करणं. 

शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे हे पक्षाच्या छत्रछायेखाली होते. मात्र इतकं मोठ्ठं बंड केल्यानंतर, मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आत्ता त्यांना दुहेरी सामना करावा लागणार आहे. एका बाजूला ठाकरेंची शिवसेना तर दूसऱ्या बाजूला आपलं उपद्रव्य मुल्य टिकवून भाजपसोबत डिल करण्याची ताकद संभाळणं अशी दूहेरी कसरत एकनाथ शिंदे यांना करावी लागणार आहे. बंडखोर आमदारांना भाजप जवळची न वाटता एकनाथ शिंदे जवळचे वाटायला हवेत.

ज्या दिवशी बंडखोर आमदारांना भाजप जवळ करेल तेव्हा आपली उपयोगिता संपूष्टात येईल याची पुरेपुर जाणीव एकनाथ शिंदे यांना आहे, त्यामुळे प्रखर ठाकरे विरोध दाखवत राहणं व आपल्या बाजूने डाव मांडण हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे. त्यासाठी राज ठाकरेंपासून ते नारायण राणेंपर्यन्त उद्धव ठाकरे विरोधातल्या नेत्यांना एका व्यासपीठावर आणून दसरा मेळावा साध्य करणं एकनाथ शिंदेंना गरजेचं आहे. 

या कारणांमुळेच ज्या प्रमाणे उद्धव ठाकरेंसाठी दसरा मेळावा महत्वाचा आहे त्याचप्रमाणे कदाचित त्याहून अधिक एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.