चौथ्या पिढीपासून घराणेशाहीच्या ऱ्हासाला सुरवात होते, हा इतिहास आहे…
” माझ्यानंतर येणाऱ्या माझ्या राजवंशांचं भविष्य काय असेल?”
इतिहासकार इब्न खल्दुन याला जगज्जेता तैमूरने एक प्रश्न विचारला होता.
यावर इब्न खल्दुननं एक इंटरेस्टिंग उत्तर दिलं होतं. खल्दुन म्हणाला होता राजवंशाचं वैभव क्वचितच चार पिढ्यांपेक्षा जास्त काळ टिकतं. पहिल्या पिढीचं ध्येय हे जास्तीत जास्त प्रदेश जिंकून आपल्या अधिपत्याखाली आणण्याचं असतंय. दुसऱ्या पिढीचा कल जिंकलेल्या प्रदेशावर प्रशासनाची घडी बसवण्यावर असतोय. आता राज्याची घडी बसल्यानंतर तिसरी पिढी नाच, गाणे, कला, संस्कृती यांना प्रोत्सहन देत आनंदात आयुष्य काढते.
परिणामी, चौथ्या पिढीपर्यंत राजवंशाने आपली संपत्ती तसेच मानवी ऊर्जा खर्च केलीले असते. नवीन काहीतरी करण्याची कोणतीही गरज या चौथ्या पिढीला भासत नाहीआणि घराण्याच्या पतनाला सुरवात होते. महत्वाचे म्हणजे हे सर्व त्रिकालाबाधित सत्य आहे आणि कोणाला टाळता येत नाही.
राजकारण आणि घराणेशाहीच्या या विषयावर २००९ मध्ये प्रसिद्ध झालेले सिमा यादव यांचे द फेथफुल फोर्थ जनरेशन या पुस्तकात पण हाच धागा पकडण्यात आला आहे. या पुस्तकातही अशी अनेक उदाहरणं देण्यात आली आहेत ज्यामध्ये बहुतेक सत्ताधारी राजवंश चौथ्या पिढीपर्यंत पोहचल्यानंतर त्यांची पडझड चालू झालेली आहे. चौथ्या पिढीनंतर जरी घराणेशाहीची अस्तित्व राहिले असले तरी ते नावालाच कारण घराण्याचा लौकिक पाचव्या पिढीपर्यंत धुळीस मिळालेला असतोय.
भारताच्या इतिहासात पार पहिलं मोठं घराणं असलेल्या मौर्य साम्रज्यापासून आपल्याला याचं उदाहरण पाहायला मिळतं.
मौर्य राजवंशाची स्थापना केली चंद्रगुप्त मौर्याने. कौटिल्याच्या मदतीने अगदी शून्यातून त्याने हे साम्रज्य स्थापन केलं होतं. त्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा गादीवर बसला. सम्राट अशोकाच्या काळात पण मौर्य साम्राज्याची ख्याती जगभर पसरली होती. मात्र तिसर्या पिढीनंतर सम्राट अशोकाचे उत्तराधिकारी इतके कमकुवत निघाले की अल्पावधीतच संपूर्ण साम्राज्य नाहीसे झाले आणि परिस्थिती इतकी बिघडली की सम्राटाच्या नातवाला १८७ B.C मध्ये तत्कालीन सेनाप्रमुखाने पदच्युत केलं होतं.
गुप्ता घराण्याचं पण तसंच झालं.
गुप्त राजवंश ज्याची स्थापना चंद्रगुप्त-I ने केली आणि त्याने सुरवातीला एका छोट्या संस्थानावर राज्य केले. या घराण्याला शिखरावर पोहोचवलं ते समुद्रगुप्ताने ज्याला भारताचा नेपोलियन पण म्हटलं जातं. त्याच्यानंतर चंद्रगुप्त-II आणि कुमारगुप्त जे राज्य सत्तेत आले. मात्र कुमारगुप्ताच्या काळातच राजघराण्याच्या ऱ्हासाची बीजं रोवली गेली होती. अखेर स्कंदगुप्ताने इसवी सन ४५५ मध्ये कुमारगुप्ताची जागा घेतली आणि लवकरच साम्राज्य विखुरले. साम्राज्याने आपले वैभव गमावले आणि भारताने आपला सुवर्णकाळ.
पुन्हा मध्ययुगात पण तेच झाले.
गियासुद्दीन तुघलकाने स्थापन केलेल्या तुघलक घराण्याचे आपण उदाहरण घेऊ.
गियासुद्दीन तुघलक, ज्याच्यामुळे तुघलकी फार्मन हा वाक्यप्रचार अस्तित्वात आला तो मुहम्मद बिन तुघलक. त्यांनतर फिरोझ शाह तुघलक हे सुलतान तुघलक राजघराण्याने दिले. मात्र फिरोझच्या मृत्यूनंतर एका दशकाच्या आताच तुघलक हे दिल्लीच्या आसपासच्या एक छोट्या संस्थानात सीमित झाले आणि हे ही संस्थान पुढे तैमूरच्या स्वारीत नाहीसे झाले.
मुघलांच्या घराण्याला पण हा नियम लावता येऊ शकतो.
जरी बाबर आणि हुमायून यांच्याद्वारे मुघलांनी भारतात एंट्री घेतली असली तरी मुघल नावापुढं साम्रज्य लावणं हे अकबराच्या काळातच शक्य झालं. बादशहा अकबर त्यानंतर मग जहांगीर ,शाहजहान आणि मग औरंगजेब. दख्खनेत मराठ्यांशी लढण्यात औरंगजेबाने पूर्ण हयात घालवल्यानंतर मुघल साम्राज्याची एवढी वाट लागायला सुरवात झाली की शेवटचा मुघल, बहादूरशाह जफरच्या काळापर्यंत, त्याच्या साम्राज्याच्या भौगोलिक क्षेत्रापेक्षा त्याच्यापुढं लावण्यात आलेली शाही पदवी मोठी होती.
त्यानंतर ज्या इंग्रजांनी भारतावर राज्य केले त्यांच्या मायदेशात पण घराण्याचे वैभव चौथ्या पिढीच्या पलीकडे टिकू शकले नाही. नॉर्मन प्लांटाजेनेट्स लँकेस्टर फॅमिली, ट्यूडर आणि स्टुअर्ट्स या इंग्लंडमधल्या राजघराण्याचा रुबाबाही चौथ्या पिढीनंतर उतरलाच.
स्वतंत्र भारतातही पुन्हा हाच इतिहास रिपीट होंतोय का अशी आज परिस्थती आहे.
भारतात जवळपास सगळ्याच पक्षात घराणेशाही राहिली असली तरी नेहरू- गांधी परिवाराची कोणाला बरोबरी करता आली नाहीये. आणि याच घराण्याची चौथी पिढी राजकरणात आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू १६ वर्षे २८६ दिवस भारताचे पंतप्रधानपद भूषवले. जो आजपण रेकॉर्ड आहे. त्यानंतर त्यांच्या कन्या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घराण्याची परंपरा पुढे चालवली. ११ वर्षे ५९ दिवस त्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीत बसल्या. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधीच सर्वाधिक वेळ पंतप्रधानपदी बसलेल्या नेत्या आहेत.
त्यानंतर त्यांची पुढची पिढी मुलं म्हणजे संजय गांधी, राजीव गांधी आणि सून सोनिया गांधी हे राजकरणात आले.
त्यापैकी राजीव गांधी यांनी पंतप्रधानपद पण भूषवलं. राजीव गांधींच्या हत्येनंतर राजकरणात आलेल्या सोनिया गांधींनी पण भक्कमपणे काँग्रेसचं नेतृत्व केलं. त्यांच्याच नेतृत्वाखाली आधी २००४ आणि त्यानंतर २००९ असं दोनदा काँग्रेसची सत्ता केंद्रात आली.
त्यांनतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी ही पिढी देशाच्या राजकारणात आहे.
प्रियांका गांधी जरी अलीकडेच सक्रिय राजकरणात आल्या असल्या तरी राहुल गांधींना राजकारणात येऊन बराच कालावधी लोटला आहे. आणि याच कार्यकाळात काँग्रेसची होत असलेली वाताहत आपल्या डोळ्यासमोर आहे.
१९५२च्या पहिल्या लोकसभेत निवडणुकीत ४५% मतं घेणारी काँग्रेस आज १९.४९ टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. २०१४ पासून पक्षाची जी घसरण झाली आहे, त्याचा अंदाज यावरून लावता येतो की नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा नऊ राज्यांत पक्ष सत्तेत होता आणि आता फक्त दोन.
काँग्रेसच्या CWC बैठकीत एका नेत्याने निदर्शनास आणून दिले होते की पक्षाने २०१४ पासून लढलेल्या ४९ पैकी ३९ निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला.
खासदारांची संख्या कमी होत लोकसभेत ५६ आणि राज्यसभेत ३४ वर येऊन ठेपली आहे. नुकत्याच झालेल्या विधासभेतपण पक्षाच्या कामगिरीत कोणतीच सुधारणा झाली नाहीये.
त्यामुळे चौथ्या पिढीला जो शाप आहे तो राहुल गांधींना पण चुकवता आलेला नाहीये अशीच एकंदर परिस्थती आहे. त्यामुळे राहुल गांधी यावर कोणता उपशाप शोधतात की नेहरू गांधी घराणंही इतिहासातल्या इतर घरण्यांसारखं लयाला जातं हे येणाऱ्या काही वर्षांत बघण्यासारखं असणार आहे.
हे ही वाच भिडू :
- सेनेने मुंबईच्या रस्त्यावर फिरू देणार नाही अशी धमकी दिली, राहुल गांधी लोकलने सभेला पोहचले
- राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडल्यानंतर डॉ. मनमोहनसिंग राजीनामा देणार होते…
- भारताची ‘लाडकी बहु’ राहुल गांधीना पराभूत करणाऱ्या राजकीय नेता कशा बनल्या?