गुजरातचा “गे” राजा समलैंगिकांना दिल्या जाणाऱ्या Conversion Therapy विरोधात लढा देतोय

जग बदलतं तशा त्याच्या परंपरा पण बदलत जातात. कोणतीच गोष्ट कायम म्हणून तशीच राहत नाही.

आता राजपीपला या राज्य- संस्थानाचं उदाहरण घ्या.

भारतातल्या स्थानिक लोकांनी गुजरातमध्ये स्थापन केलेलं मोठं आणि अजिंक्य संस्थान. गुजरातमधलं हे एक देशी संस्थान होतं जिथं गोहिल राजवंशाच्या लोकांनी ६०० हुन जास्त वर्षे राज्य केलं.

या राज्याला प्रचंड मोठा वारसा आहे. सतत मोठमोठ्या शत्रूंचा वेढा असायचा, पण हे राज्य कुणाच्याच ताब्यात आलं नाही. १३४० ला त्यांचं शासन सुरु झालं ते भारत स्वतंत्र झाल्यावर १९४८ साली १० जून ला भारतीय संघराज्यात राजपीपलाचं विलीनीकरण करण्यात आलं.

राजपीपलाच्या गोहिल राजवंशाच्या लोकांनी मध्ययुगात अहमदाबादचा सुल्तान, मुघल सत्ता, बडोद्याचे गायकवाड आणि इतकंच नाही तर ब्रिटिश शासनाशीही झुंज दिली.

पण इथं एक नवी सुरुवात झाली, ती मानवेंद्र गोहिल यांच्या रुपानं. राजपीपलाच्या गोहिल राजवंशाचे घराण्यातले सध्याचे वंशज असणाऱ्या मानवेंद्र गोहिल यांनी आपल्या राजवाड्यात LGBTQA समुदायासाठी एक कम्युनिटी हाऊस सुरू केलं. त्यानंतर मानवेंद्र गोहिल आणि राजपीपला प्रचंड चर्चेत आलं होतं.

पण सध्या मानवेंद्र गोहिल पुन्हा एकदा चर्चेत आलेत, ते त्यांनी पुकारलेल्या लढ्यामुळं.

आपल्या देशात अनेक ठिकाणी LGBTQA समुदायातल्या लोकांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. काहीवेळा तर लोक यांना कुठलातरी आजार आहे अशा गैरसमजात असतात आणि त्यांच्यावर उपचार करण्याचे विचित्र प्रयत्नही करतात.

शारीरिक, तांत्रिक आणि मानसिक उपचार करुन त्यांना पुन्हा भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटण्यासाठी केल्या जाणाऱ्या या उपचारांना ‘Conversion Therapy’ असं म्हणतात.

विशेष म्हणजे, वैद्यकीय तज्ञ या उपचार पद्धतीचा काहीच फायदा होत नसल्याचं आणि ही थेरपी घातक असू शकते असं सांगतात.

कुटुंबाकडून जबरदस्ती ही थेरपी लादली गेली, म्हणून आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणंही आहेत.

याच Conversion Therapy’ वर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी मानवेंद्र गोहिल यांनी केली आहे. पण मानवेंद्र यांना स्वतःलाही अनेक अडचणींना, विरोधाला आणि अशा प्रकारच्या विचित्र उपचारांना सामोरं जावं लागलं होतं.        

काही वर्षांपूर्वी मानवेंद्र गोहिल यांनी आपण समलैंगिक असल्याचं जाहीर केलं होतं. यावर राजपीपलाच्या गोहिल राजवंशाच्या लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तिथले लोक रस्त्यावर उतरले आणि मानवेंद्र गोहिल यांना राजघराण्याच्या वारसा हक्कातून वगळण्याचाही प्रयत्न झाला होता.

त्यांचं गे असणं हा आजार समजून त्यांना वेगवेगळ्या डॉक्टर्सकडे, तांत्रिक-मांत्रिक यांच्याकडे नेण्यात आलं. हा ‘आजार’ जावा असं म्हणून, विजेचे झटके देण्यात आले. घरातल्या लोकांनी बोलणं टाकलं, तर त्यांना हद्दपारही करण्यात आलं. मात्र इतका त्रास सहन करुनही राजे मानवेंद्र खचले नाहीत.

पुढे मात्र त्यांच्या आईवडिलांना आपली चूक समजली आणि त्यांनी मानवेंद्र यांना परत बोलावलं.

राजपीपलाच्या गोहिल राजवंशाच्या लोकांनी आपल्या संस्थानात एक प्रचंड मोठा राजवाडा बनवला आहे. हा वाडा विंड्सर कॅसल या इंग्लंडच्या बर्कशायर कौंटीमध्ये राणी एलिझाबेथच्या किल्ल्याच्या हुबेहूब स्वरूपात बनवलेला आहे.

लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसप्रमाणे या किल्ल्यालाही महत्त्व आहे. त्यामुळे गोहिल राजवंशाच्या लोकांनी हा किल्ला प्रचंड संपत्ती खर्चून बनवला होता.

हनुमंतेश्वर भागात १५ एकरांमध्ये हा राजवाडा उभारलेला आहे. नर्मदा नदीच्या किनारी सन १९२७ मध्ये राजे महाराजा विजयसिंग गोहिल यांनी हा बनवून घेतला होता. महाराजा विजयसिंग गोहिल हे राजे मानवेंद्र गोहिल यांचे पणजोबा. काळाच्या ओघात नर्मदेच्या पुराने या जागेचं मोठं नुकसान झालं होतं.

भारताचा व्हॉईसरॉय लॉर्ड वेलिंग्टन हा बराच काळ या राजवाड्यात राहिला होता. या जागी हनुमानाने अवतार घेतला होता अशी स्थानिक लोकांची श्रद्धा असल्यानं या जागेला फार महत्त्वही आहे.

याच राजवाड्यातली काही जागा राजे मानवेंद्र यांच्या वडिलांनी त्यांना भेट दिली आणि तिथं त्यांनी LGBTQA समुदायासाठी कम्युनिटी हाऊस बांधलं. विशेष म्हणजे राजे मानवेंद्र यांच्या वडिलांनीच कम्युनिटी हाऊस बांधण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केलं होतं. हनुमान मंदिरातल्या पुजाऱ्यांनी हा विधी संपन्न केला होता.

“भारतात समलैंगिक समुदायाकडे अजूनही संशयास्पद दृष्टीने बघितलं जातं. त्यामुळे या लोकांच्या राहण्याची व निराश्रित लोकांच्या रक्षणाची सोय या कम्युनिटी हाऊसमध्ये केली जाते. मला पुन्हा घरच्यांनी स्वीकारलं असलं, तरी इतर घरातील मुलांना असं भाग्य मिळत नाही. 

त्यांना त्वरित घरातून हाकलून लावलं जातं. मुलांवर दबाव टाकला जातो. अनेकांचं विरुद्धलिंगी व्यक्तींशी बळजबरीनं लग्न लावलं जातं. या विचारांना मान्य न केल्यास त्यांना घरातून बाहेर फेकण्यासही लोक कमी करत नाहीत.”

असं राजे मानवेंद्र सांगतात, पुढं ते असंही म्हणतात की,

“मुलंही आपल्या पालकांशी मानसिकरीत्या जोडलेली असतात. पोट भरण्यासाठी त्यांच्याकडे इतर कुठलंही साधन उपलब्ध नसतं. सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य बिघडून अनेक लोक स्वतःचं जीवन संपवतात. त्यामुळे अशा लोकांना निवाऱ्याची आणि मदतीची गरज असते.”

“या केंद्रात भाषा, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, इंग्रजी, आजारांवरती उपचार करण्याच्या पद्धती, संगीत शिकवलं जातं.  इथं अनेक कार्यक्रम झाले असून त्याला बॉलिवूडमधले कलाकार, नेते, सरकारी अधिकारी, विद्यार्थ्यांच्या समूहांनीही हजेरी लावली होती. LGBTQA नसणाऱ्या लोकांनी आमची भावना समजून घेतली तरी समाजात बराच फरक पडेल.”

LGBTQA ही Lesbian Gay Bisexual Trans Queer Allies यांच्या अद्याक्षरांपासून बनलेली एक व्याख्या आहे.

समलैंगिक समुदायामधील लोकांच्या लैंगिक ओळखी वेगवेगळ्या असतात. त्यामुळं पुरुष आणि स्त्री सोडून इतर ६० हुन अधिक प्रकारचे लिंगभाव माणसांमध्ये असतात. ही प्रक्रिया निसर्गाकडून येणारी असते.

६ सप्टेंबर २०१८ रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं ही गोष्ट मान्य केली होती. त्यानुसार या लोकांची माफी मागत समलैंगिकता हा गुन्हा ठरवणारं भारतीय दंडविधानातलं कलम ३७७ देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवलं होतं.

यानंतर राजे मानवेंद्र यांनी कम्युनिटी हाऊस तर सुरू केलंच, पण ऐषोआरामात जगणं शक्य असूनही ते LGBTQA समुदायातल्या लोकांच्या हक्कासाठी झगडतायत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.