सांगली कोल्हापूरात आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे ?
सांगली कोल्हापूरातली पुराची परिस्थिती गंभीर आहे. यापुर्वी २००५ ला असा भीषण महापूर आला होता. २००५ साली आलेल्या महापूराची पातळी या २०१९ च्या पुराने ओलांडली असून सांगली कोल्हापूर या दोन शहरांसह दोन्ही जिल्ह्यातल्या नदी पट्यातल्या गावांना पूराचा मोठ्ठा फटका बसला आहे.
दिवसभर घेण्यात आलेल्या माहितीनंतर सांगली कोल्हापूरची आत्ता परिस्थिती काय आहे हे समजून घेवू..
सांगली जिल्हा.
कराड, आटके, शेरे, दुशेरे, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक, नरसिंहपूर, बहे, बोरगाव, ताकारी, मसुचिवाडी, जूनेखेड, शिरगाव, वाळवा, नागठाणे, बुर्ली, शिरगाव, खोलेवाडी आमणापूर, औंदुबर, अंकलखोप, भिलवडी, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, सांगली, सांगलीवाडी, कुरुंदवाड यांच्यासह नदिपट्यातील सर्वच गावांना पुराचा फटका बसला आहे.
कृष्णा नदीसह, वारणा आणि येरळा नदीला देखील पूर आला असल्याने बहुतांश रस्तेमार्ग बंद झाले आहेत.
सांगली शहर.
संध्याकाळी सहाच्या दरम्यान आयर्विन पुलावर असणारी फुटपट्टी संपली असल्याचे सांगण्यात येत आहे. पुल मोजणाऱ्या पट्टीवर ५५ फुटापर्यन्त आकडे असून त्यावरती सहा इंच पाणी गेलं आहे.
प्रमुख रस्ते :
सांगली- इस्लामपूर बंद.
सांगली- कोल्हापूर बंद.
सांगली- पलूस-कराड बंद.
सांगली-पुणे बंद.
सांगली शहराचा पुण्यासोबत संपर्क पुर्णपणे तुटला आहे.
सांगली शहरात मारूती चौकात दहा फुटाच्या वर पाणी आले असून SFC मॉल पर्यन्त पाणी आले आहे. दूसऱ्या बाजूस कलेक्टर बंगल्यापर्यन्त पाणी आल्याच सांगण्यात येत आहे.
आत्तापर्यन्त ७० हजार नागरिकांसोबत संपर्क तुटल्याच सांगण्यात येत असून सांगली जिल्ह्यात एकूण तीन NDRF च्या टिम आल्या आहे. तसच सैन्याच 211 जवान आले असून युद्धपातळीवर मदत करण्यात येत आहे.
सांगली शहरात पुराचा फटका बसलेल्यांची सोय कुठे करण्यात आली आहे.
पूरपट्याच्या बाहेरील शाळा, कॉलेज, महाविद्यालयात रहाण्याची सोय करण्यात आली आहे. KWC कॉलेज, विलिग्डन कॉलेज, कच्छी भवन येथे रहाण्याची करण्यात आली आहे.
(माहिती : पुण्यनगरी उपसंपादक प्रविण शिंदे.)
कोल्हापूर.
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा, वारणा पट्यासह एकूण २०४ गावांना पूराचा फटका बसला आहे. सुमारे ५१ हजार लोकांच आत्तापर्यन्त स्थलांतर झालं असून अजूनही बऱ्याच गावांसोबत संपर्क तुटला असल्याची माहिती मिळत आहे.
कोल्हापूर शहरात काल व्हिनस कॉर्नर त्यानंतर शाहूपुरी आणि आज लक्ष्मीपूरीत पाणी आल्याच सांगण्यात येत आहे. परमाळ सायकल कंपनीच्या दारात पाणी आलय.
कोल्हापूरात बाहेर पडण्यासाठी कोणताच रस्ता शिल्लक राहिलेला नाही.
कोल्हापूरातून कोकणात जाणारे सर्व रस्ते बंद आहे.
कोल्हापूर बेळगाव निपाणीच्या इथं पाणी आल्यानं बंद आहे.
कोल्हापूर-पुणे बंद.
कोल्हापूर-सांगली बंद आहे.
दुधाळी सबस्टेशन पाण्याखाली गेल्यामुळे शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रंकाळा परिसर येथील भागात लाईट नाही. जिल्ह्यातील १ लाख सहा हजार घरांमध्ये लाईट नाही. तसेच प्रमुख उपसासिंचन बंद असल्याने पिण्याच्या पाण्याची सोय देखील नाही. राधानगरी धरण परिसरात पाऊस कमी झाल्याने धरणातून विसर्ग कमी केल्याच सांगण्यात येतय मात्र रात्रभर पाऊस राहिल्यास पाण्याची पातळी वाढू शकते.
इचलकरंजी.
इचलकरंजी शहरात गावभागातले तीस ते चाळीश घरं सोडली तर संपुर्ण पाणी आलेलं आहे. जूना चंदूर रस्ता पाण्याखाली गेलाय. उत्तम प्रकाश टॉकीज,मगदूम दर्गा ते महासत्ता चौकात पाणी आलं आहे.
इचलकरंजी – कोल्हापूर रस्ता बंद आहे.
इंचलकरंजी – सांगली रस्ता बंद आहे
इंचलकरंजी – चिक्कोडी (बोरगाव रस्ता) बंद आहे.
इचलकरंजीतून तुम्ही हातकणंगलेत जावू शकता पण तिथून सांगली आणि कोल्हापूर रस्ते बंद आहेत.
हातकणंगले तालुक्यातील एकूण १७ तर शिरोळ तालुक्यातील ३२ गावांना पुराचा फटका बसला आहे.
इचलकरंजी शहरात राहण्याची गोविंदराव हायस्कुल, कल्याण केंद्र, रिक्रिएशन हॉल, छत्रपती शिवाजी विद्यामंदीर येथे राहण्याची सोय करण्यात आली आहे.
हे हि वाचा.
कर्नाटकातल्या अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरात पूर येतो, हे खरं आहे का ?