G- २२ गटाकडं काँग्रेस सोडली तर एकचं ऑप्शन राहतो, तो म्हणजे तृणमूल काँग्रेस !
काँग्रेसमधली पक्षांतर्गत खलबत संपण्याचं नाव घेत नाहीये. त्यात ५ राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या हालचालींना आणखीनचं वेग आलाय. तर जी- २३ गटाचं आपलंच वेगळं रडगाणं आहे. यामागचं कारण पक्षांतर्गत नाराजी तर आहेच पण कुठे तरी प्रशांत किशोर यांचा पक्ष प्रवेश देखील असल्याचं म्हंटल जातंय. त्यामुळे काँग्रेसच्या डोकेदुखीत दिवसेंदिवस भर पडत चाललीये.
आता जी- २३ मधून जितीन प्रसाद यांनी बाहेर पडत भाजपचा रस्ता पकडला. पण उरलेल्या २२ जणांचं काय अशी चर्चा सध्या राजकीय कॉरिडॉरमध्ये सुरु आहे.
आता खरं तर, जी २३ गटाच्या नाजारीचा सुरूवात झाली ती एका पत्रामूळं. वर्षभरापूर्वीचं जी- २३ ने सोनिया गांधींना पत्र लिहून मागणी केली होती की, पक्ष संघटनेच्या निवडणुका घेतल्या जाव्यात आणि पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष द्यावे. मात्र तसं काही झालं नाही आणि त्यानंतर जे झालं ते सर्वांनाच माहिती आहे.
आता या उरलेल्या जी २२ नेत्यांच्या यादीतले प्रमुख नाव म्हणजे कपिल सिब्बल. जे पक्षातले महत्त्वाचे नेते मानले जातात. पक्षाला सर्वाधिक फंडिंग करण्यातही त्यांचं नाव टॉपला आहे. जर आपण २०१९ – २० ची पक्षाला फंडिंग करणाऱ्यांची यादी बघितली. तर एकट्या कपिल सिब्बल यांनी ३ कोटी रूपये दान केलेत. जे सोनिया गांधी ५० हजार आणि राहुल गांधी यांच्या ५४ हजारांत पेक्षा कित्येक पटीने जास्त आहेत.
पण कपिल सिब्बल यांनी जेव्हा पंजाबमधील गोंधळाबाबत हायकमांडकडून उत्तर मागितलं. त्याचं उत्तर त्यांना वेगळ्या अंदाजात मिळालं. ते म्हणजे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर ‘पार्टी छोडो’चे फलक घेऊन केलेला निषेध, त्यांच्या गाडीची तोडफोड आणि टोमॅटोने हल्ला.
गुलाम नबी आझाद यांची तामिळनाडूमधून राज्यसभेवर पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकत होती. विधानसभा निवडणुकीत केवळ २५ जागांवर उमेदवार उभे केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून द्रमुकने काँग्रेसला राज्यसभेच्या एका जागेचे आश्वासन दिले होते. पण ते आश्वासन विसरले.
जी-२२ सदस्य आणि काँग्रेसचे जुने नेते मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांना महाराष्ट्रातून राज्यसभा जागेचे उमेदवार मानले गेले होते, परंतु हायकमांडने त्यांच्या जागी रजनी पटेल यांची निवड केली.
जरी गांधी कुटुंबाने अनपेक्षितपणे या गटाची मागणी अंशतः मान्य केली तरी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या इच्छेनुसार राहतील. अर्थात काय तर पक्षाची लगाम कुटुंबाच्या हातात राहील. कारण राहुल गांधी युवा नेत्यांना समोर आणण्याच्या नादात काँग्रेसच्या निष्ठावान आणि जुन्याजाणत्या मंडळींना बाजूला सरतायेत. पण प्रियांका यांची याबाबतीत भूमिका थोडी नरमाईची आहे. पण नाही म्हंटल तरी जी- २२ गटाकडे त्यांचंही दुर्लक्ष झालंच आहे.
आता या जी – २२ गटाची अवस्था अशी काही आहे की, गांधी परिवार यांना पक्षात राहू देणार नाही, आणि त्यांची वैचारिक निष्ठा त्यांना पक्ष सोडू देणार नाही. आणि पक्ष सोडायचा जरी विचार केला तरी ते भाजपमध्ये जाणार नाहीत. कारण गेली कित्येक वर्षे काँग्रेस विचारसरणीत रुजलेल्या या नेत्यांना भाजपमध्ये जाऊन आपल्या विचारसरणीशी तडजोड करावी लागेल. जे त्यांच्याकडून तरी शक्य होणार नाही. आणि देशात दुसरा कोणता मोठा राजकीय पक्ष नाही. फक्त काही नेते नवीन पक्ष स्थापन करण्यास सक्षम आहेत.
अशा परिस्थितीत त्यांना एकच ऑप्शन उरलाय तो म्हणजे तृणमूल काँग्रेस. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सूद्धा त्यांना पाठिंब्याचा हात दाखवत आहेत. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, अनेक नेतेमंडळी तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर आहेत, लवकरच ते नेते काँग्रेस सोडू शकतात.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो प्रमाणं, त्या सगळ्यांचाच विश्वास आहे की, तृणमूलचा नेता बनून ते काँग्रेसवासी राहू शकतात, विचारधारा तशीच राहील, जरी नेता सोनिया गांधींच्या ऐवजी ममता असतील. ज्यांना भाजपाला कसं हरवायचं हे चांगलचं माहित आहे.
हे ही वाचं भिडू :
- जी-२३ मधील निम्म्या नेत्यांचे स्वतः निवडून यायचे वांदे आहेत, पण ते नेतृत्वावर टीका करतायत
- ४ पक्ष सोबत होते पण इंदिराजींच्या एका सभेमुळे मुख्यमंत्र्यांचा पोट निवडणुकीत पराभव झाला
- सिद्धूने राजकारणात राजीनामा दिला कि एकाच व्यक्तीला सगळ्यात जास्त टेन्शन येतं